औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी तिला महाविद्यालयाच्या जवळून ओढत नेले आणि चाकूने तिच्यावर सपासप वार केले. एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाली. दिवसाढवळ्या एका मुलीचा खून होतो, पण कुणीही मध्ये पडत नाही. खुन्यालाही खून करताना पूर्ण खात्री आहे की कोण अडवणार? राज्यकर्ते औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करू शकणार नाही. पण, येथील नागरिकांना आपण औरंगजेबाच्या राज्यात राहतो, असे तरी किमान वाटता कामा नये. औरंगाबादच काय तर राज्यभरात हत्या आणि आत्महत्येचे भयानक सत्र सुरू आहे.
दि. १९ एप्रिल रोजी नाशिकमध्ये जगदीश जाधव आणि त्यांचा मुलगा प्रणव जाधव यांचा मृत्यू? जगदीश जाधव यांच्या पत्नीने याबाबत पोलिसांकडे खुलासा केला. दि. २० मे रोजी याबाबत माहिती कळली की, जगदीश जाधव यांनी स्वत:च्याच मुलाचा म्हणजे प्रणव जाधव याचा गळा दाबून खून केला आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. कारण, प्रणव आईवडिलांना उलट उत्तरे द्यायचा. शिवीगाळ करायचा आणि हातही उगारायचा. दि. १८ मे रोजी औरंगाबादची आणखी एक घटना. एका तरुणाने आत्महत्या केली. चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात लिहिले, “पत्नीला नीट साडी नेसता येत नाही, ती नीट चालतही नाही आणि तिला चांगले बोलता येत नाही. मी तिच्यासोबत राहू शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहेत.”
अमरावतीमध्ये दि. ११ मे रोजी विजय आडोरकर या पोलीस कर्मचार्याने आत्महत्या केली. त्यांच्या घरच्यांचे म्हणणे की, विजय यांना त्यांचे वरिष्ठ निलंबनाच्या धमक्या देत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वी बुलढाणा येथे महेंद्र बेलसारे नावाच्या व्यक्तीने लग्न होत नाही म्हणून आत्महत्या केली. गेल्या वर्षी तर मुंबईमध्ये एका महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केली. कारण होते, तिने घरी स्वयंपाक बनवला असताना पतीने बाहेरून पाणीपुरी खायला आणली. वर सांगितलेल्या घटनांमध्ये ज्या कारणांनी आत्महत्या झाल्या, ती कारणे खरेच खूप मोठी होती का? माणूस इतका हळवा आणि निराश का झाला आहे? आपण तर मरू. मात्र, उर्वरित कुटुंबाचे काय होणार, याचा विचार त्याला का येत नसावा? महाराष्ट्रात नैराश्याची लाट येण्याचे कारण काय? महाविकास आघाडी सरकार याकडे लक्ष देईल का?
बळीराजाचे सोयरसुतक नाही
कीडामुंगीही जीव वाचवण्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करतात. मात्र, महाराष्ट्रात शेतकरी बांधव स्वत:हून मृत्यूला कवटाळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सातत्याने शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. दि. १९ मे रोजी आसाराम सांगळे या शेतकर्याने आत्महत्या केली. त्यापूर्वी चारच दिवसांपूर्वी त्याच्या लेकीचा विवाह झाला होता. आत्महत्या करताना या शेतकर्याच्या मनात काय आले असेल? किती हताशता, किती विवशता... जमीन नापीक होत आहे, पूर तर कधी अवर्षण, कधी वादळ, त्यातच कोरोनाची भयानक दोन वर्षे. त्यातून उभारी घेत पुन्हा शेतीभातीसाठी घेतलेले कर्ज. व्याज भांडवल चुकतं न केल्यामुळे होणारी तगमग. गावात भावकीत इज्जत जाईल म्हणून आलेली निराशा आणि या सगळ्यांना टाळण्यासाठी त्याने केलेली आत्महत्या.
त्या आधीही दि. १२ मे रोजी बीडच्या हिंगणगावात नामदेव जाधव यांनी स्वत:ला जाळून घेतले. उसाचे गाळप होत नाही म्हणून नामदेव यांनी जाळून घेणे हे त्यातून बरेच काही सांगून जाते.२०२० साली ‘एनसीआरबी’ने एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार देशभरात होणार्या आत्महत्यांमध्ये शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सात टक्के आहे. १०,६७७ शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. त्यामध्ये ४,००६ महाराष्ट्र, २,०१६ कर्नाटक, ८८९ आंध्र प्रदेश, ७३५ मध्य प्रदेश, ५३७ छत्तीसगढमध्ये झाल्या होत्या.
या बळीराजाच्या आत्महत्येचे कुणालाच सोयरसुतक नाही. जो अन्नधान्य पिकवून सगळ्यांना जगवतो, त्याचे जगणे-मरणे कुणाच्याच खिजगणतीत नाही? २०१९ पूर्वी राजकीय पक्षांनी शेतकर्यांना अनेक आश्वासने दिली. त्यापैकी महाविकास आघाडी राज्य सरकारच्या मंत्र्यांचे आश्वासन तर भारीच होते. शेतकर्यांना बांधावर जाऊन मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. आता शेतकर्यांच्या बांधावर जायला तर सोडाच, पण स्वत:च्या वातानुकूलित कार्यालयात, घरात बसूनही संबंधित मंत्री शेतकर्यांच्या प्रश्नांवर विचार करताना दिसत नाहीत. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी नेते म्हणून(?) दुधाचे टँकरच्या टँक ओतणारे, ट्रकभर टोमॅटो रस्त्यावर फेकणारे ‘ते’ नेते कुठे गायब झाले? बळीराजाला जगावेसे वाटेल, अशी परिस्थिती कशी निर्माण होईल?