नवी दिल्ली: पंतप्रधान राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. पंतप्रधान राजपक्षेंच्या वडिलोपार्जित घराला आंदोलनकांकडून आग लावण्यात आली आहे. आतापर्यंत या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला असून १५०हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. फक्त राजपक्षेच नव्हे तर त्यांच्या मंत्र्यांच्या घरांनाही आंदोलनकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.श्रीलंकेत उसळलेला हा हिंसाचार रोखण्यासाठी ठिकठिकाणी कर्फ्यू लावले गेले असले तरी जनता रस्त्यांवर उतरली असल्याने हा कर्फ्यू उठवला गेला आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून भारतीय लोकांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्यात आली असून हेल्पलाईन नंबर जारी केला केला गेला आहे.
प्रचंड वाढलेली महागाई, चलनवाढ यांमुळे जीवनावश्यक वस्तूंसाठीही लोकांना वणवण फिरावे लागत आहे. राजपक्षे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याची भावना जनतेत आहे त्यामुळे राजपक्षेंच्या विरोधात प्रचंड असंतोष उसळला आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आर्थिक आणीबाणी, त्यानंतर संपूर्ण आणीबाणी यांसारखे उपाय योजले गेले पण लोकांच्या प्रखर विरोधामुळे हे उपाय कुचकामी ठरले आहेत. लोंकाच्या प्रचंड विरोधानंतर पंतप्रधान राजपक्षेंनी अखेर सोमवारी राजीनामा दिला पण त्यातून कुठलाही फरक पडलेला नाही असेच या परिस्थितिवरून दिसत आहे.