मुंबई : शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर काल गुणरत्न सदावर्ते आणि अन्य १०९ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून यासोबतच इतर १०९ आरोपींना देखील न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
जयश्री पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्याना प्रवाहात राहण्यासाठी असे आरोप करायची सवय आहे. हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो असे स्पष्टीकरण देत एसटी कर्मचाऱ्यांनी शांततेने सहकार्य करावे असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले आहे. त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यामुळे हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे तरी अंमलबजावणी करावी असे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच "कोणाच्यातरी भडकाव्याने कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये. या सर्व प्रकरणात प्राथमिक स्वरूपाची माहिती समोर आलेली असून या प्रकरणाचा तपास करून त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल," असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.