ठाणे (प्रतिनिधी): राज्यातील छुप्या भारनियमनाविरोधात भाजपच्यावतीनेरविवारी ठाण्यात कंदील आंदोलन करण्यात आले. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी विजेचे भारनियमन व वाढीव सुरक्षा ठेवींचा निर्णय रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय जाहीर केला. महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच, राज्यातील जनतेला भारनियमनात ढकलल्यासंदर्भात निषेध व्यक्त केला. तसेच, सक्तीची वसुली थांबविण्याचीही मागणी केली. या आंदोलनात भाजपचे शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, रमेश आंब्रे, बाळा केंद्रे, वीरसिंग पारछा, कृष्णा भुजबळ, विक्रम भोईर, ओमकार चव्हाण, भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर, महिला आघाडीच्या श्रुती महाजन, स्वप्नाली साळवी, श्रुतिका मोरेकर, सुषमा ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
“गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे, अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे,” असा आरोप आ. डावखरे व आ. केळकर यांनी केला.