नाशिक: महाराष्ट्राचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मनमाड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. याप्रसंगी त्यांचे भाषण सुरु असतानाच दोन वेळेस कार्यक्रमाची वीज खंडित झाली. नेमके यावेळी तनपुरे हे राज्यातील ऊर्जा संकटाबद्दलच बोलत होते. यामुळे या कार्यक्रमाला आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच हसे झाले.
या भाषणातून तनपुरे यांनी आजच्या या ऊर्जा संकटासाठी फडणवीस सरकारलाच जबाबदार धरले आहे. "फडणवीस सरकारच्या काळात एकही नवीन ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात आला नाही की आहे त्या प्रकल्पांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न झाले. केंद्र सरकारकडून मागणी इतका कोळसा पुरवठा होत नसल्याने राज्य सरकारला चढ्या भावाने वीज खरेदी करावी लागत आहे" असा आरोप तनपुरेंनी या प्रसंगी केला.