रत्नागिरीतील नद्यांमधून १४०० पाणमांजरे आणि २४५ मगरींची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2022   
Total Views |
 ott



मुंबई (प्रतिनिधी) :
 रत्नागिरी जिल्ह्यात १४०० पाणमांजरे आणि २४५ मगरींचा अधिवास असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या साहाय्याने पुण्यातील 'इला फाऊंडेशन'कडून यासंबधीचा अभ्यास प्रकल्प राबवण्यात आला होता. वातावरणात होणारे बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारा अधिवासाचा ऱ्हास हे रत्नागिरीतील पाणमांजरे आणि मगरींसाठी प्राथमिक धोके असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
 
कोकणातील खाडीक्षेत्रात पाणमांजर आणि मगरींचा अधिवास आढळतो. स्थानिक भाषेत पाणमांजरांना उद, उद्या, गिऱ्हा अशा नावाने संबोधले जाते. तर मगरींसोबत सहजीवन करणारी अनेक गावे खाडीपट्यात आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील या दोन्ही जीवांच्या अधिवासावर अभ्यास करुन त्यांची संख्या मोजण्याचे काम 'इला फाऊंडेशन'कडून करण्यात आले आहे.  यापू्र्वी २०१७ मध्ये या फाऊंडेशनकडून एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५०० पाणमांजरांची नोंद केली होती. त्यानंतर  एप्रिल २०१९ ते जुलै २०२१ या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात पाणमांजर आणि मगरींच्या अधिवासासंबंधीचे सर्वेक्षण करण्यात आले. कॅमेरा ट्रॅप आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्वेक्षण पार पडले. सर्वेक्षणाअंती 'सर्व्हे ऑफ ऑटर अँड क्रोकोडाईल स्पेसीज इन मॅन्ग्रोव्ह हॅबिटॅटस ऑफ रत्नागिरी, महाराष्ट्र' या नावाने एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात रत्नागिरीतील १० नद्या,  खाड्या आणि सिंचन तलावांमध्ये 'स्मूथ काॅटेड' या प्रजातींच्या पाणमांजरांची संख्या १,४३५ असून मगरींची संख्या २४५ असल्याचे म्हटले आहे.


"पाणमांजर या सस्तन प्राण्याचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. तसेच सागरी क्षेत्रात अधिवास असलेल्या मगरींची पुरेशी नोंद झालेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील या प्रजातींच्या संख्येची आणि सद्यस्थिती सर्वसमावेशक आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या अहवालाच्या  आलेल्या माहितीनुसार आपण या दोन्ही प्रजातींचे अधिक अधिक चांगल्या रीतीने संरक्षण करू शकतो, अशी माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. पाणमांजरांच्या अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आहोत. तसेच या प्रजातींची संख्या कमी होऊ न देण्यासाठी  किनारपट्टीच्या भागात राहणारे नागरिक आणि संशोधकांच्या मदतीने या जीवांच्या संरक्षणासाठी आमचे प्रयत्न केंद्रीत करू, असे त्यांनी सांगितले. शिवाय अशाच प्रकारचा अभ्यास मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याांमध्येही करण्यात येईल, असे नमूद केले. या संशोधनात सतीश पांडे, अंनत गोखले, राम मोने, राजकुमार पवार, सुधन्वा राजूरकर आणि राहुल लोणीकर यांचा सहभाग होता. 'कांदळवन हा इतर प्राण्यांना देखील सुरक्षित अधिवास देते, जे पाणमांजराच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असते." असे संजय पांडे यांनी सांगितले.


@@AUTHORINFO_V1@@