आयुष्यभर ज्या भगवंताचे साधे नावही वाचेने उच्चारले नाही, ज्याचे कधी चिंतन केले नाही, तो भगवंत राम मृत्यूसमयी कसा आठवेल? मरणकाळी तर जीवाला सोडवणारा भगवंतच आहे, असे आपले तत्त्वज्ञान सांगते. ‘तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी’ हे स्वामींनी पुन्हा एकदा मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. 85 मध्ये सांगितले आहे. हा रघुवीर म्हणजेच भगवंत तुम्हाला अंतकाळी सोडविणारा आहे. हे एकदा नक्की ठरले की, मग इतर गोष्टींसाठी कशाला उगीच त्रास करुन घ्यायचा? अहंकार सोडून देऊन भगवंताचे नामस्मरण करण्यात जीवाचे सार्थक आहे.
आपले नेमके हित कशात आहे, ते ठरवण्यात माणसाचा आयुष्यातील बराच काळ निघून जातो. सर्वसाधारण माणसाला सुखी जीवन हवे असते. पण, त्यासाठी निवडलेला पर्याय हितकारकअसेलच नाही. त्यामुळे माणूस आयुष्यात वेगवेगळे प्रयोग करीत असतो. एक प्रयोग फसला की दुसरा, तोही फसला, तर आणखी वेगळा. असे करण्यात आयुष्य पुढे जाते. काळाचा अपव्यय होतो आणि हाती काहीच लागत नाही. समर्थांनी यापूर्वीच्या श्लोकात (श्लोक क्र. 22) मध्ये मनालाच विनंती केली आहे की, “हे मना सज्जना, आता तूच ते माझ्या हिताचे आहे ते कर.” मनाच्या श्लोकातील स्वामींचे विचारधन हे ‘राघवाचा पंथ’ अर्थात ‘भक्तिपंथ’ समजून सांगण्यासाठी आहे, हे उघड आहे. अर्थात, त्यात पारमार्थिक हिताचा उपदेश केलेला आहे. त्यानुसार पारमार्थिक हित साधून राघवाचा म्हणजेच भगवंताचा शोध घेता येतो आणि त्यातून अक्षय सुखाची प्राप्ती करून घेता येते. हे ध्येय सुखकारक व हितकारक असते. आराध्याप्रमाणे मनाच्या श्लोकातील काही विचारांना तत्कालीन ऐतिहासिक संदर्भही असतात, पण ते उघडपणे दिसत नाहीत. त्यासाठी त्या विचारांतील सांकेतिकता ओळखल्यावर ते संदर्भ उलगडतात, याविषयी सविस्तर विचार पुढे केव्हातरी करता येईल. तूर्त पारमार्थिक अर्थ बाजूला ठेवून त्या व्यावहारिक संबंधाने विचार करून व्यवहारातसुद्धा जे काही मिळवायचे आहे, त्यासंबंधी ध्येय निश्चित करावे लागते. त्यात धरसोडपणा न करता वृत्ती ध्येयावर केंद्रित करावी लागते. ध्येयवस्तूवर पूर्ण विश्वास असावा लागतो. ध्येयाविषयी मनात संशय न घेता, त्याचा पाठपुरवठा करावा. त्यासाठी कष्ट घेतले तर व्यवहारातील ध्येय साध्य करता येते. समर्थांचा प्रयत्नवादावर विश्वास आहे. आध्यात्मिक क्षेत्रातही एकदा आपण रामाच्या, भगवंताच्या प्राप्तीत आपले हित आहे, हे निश्चित केले की, मग पुढे काय करायचे, हे स्वामी सांगत आहेत.
न बोले मना राघवेंवीण कांहीं।
जनीं वाउगे बोलतां सुख नाहीं।
घडीने घडी काळ आयुष्य नेतो।
देह्यांती तुला कोण सोडूं पहातो॥23॥
थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपल्या ध्येयाचा विसर न पडता, मनाला त्याचा ध्यास लागला पाहिजे. त्याच्याशिवाय इतर काही सुचू नये. भक्तिमार्गात एकदा राम म्हणजेच भगवंत हे आपले साध्य निश्चित झाले की, मग त्याच्याविषयी बोलावे, त्याचाच विचार करावा, त्याचे चिंतन करावे, त्यांच्या गुणांचे चिंतन करावे, असे केले तर आपल्या ध्येयाशी एकनिष्ठता साधता येते. ही एकनिष्ठता साधत असताना आपल्या लक्षात येते की, लोकांबरोबर वायफळ बडबड करण्यात काही सुख नाही. पण, ध्येय नसलेली माणसे मात्र यात सुख मानीत असतात. आजकाल सभोवती इतक्या सामाजिक, राजकीय घडामोडी घडत असतात की, त्यासंबंधी आपले मतप्रदर्शन करण्यात बर्याच लोकांना आनंद मिळत असतो. ते वायफळ बोलण्यात आपला वेळ घालवतात. त्या गप्पांत अगदी जागतिक घडामोडींवर रशियाचे पुतीन आणि युक्रेनचे झेलेन्स्की यांना शहाणपणाचे सल्ले देण्यापर्यंत लोक बोलत असतात. भारतीय, राज्यस्तरीय राज्यकर्त्यांनाही हे लोक उपदेशाचे डोस पाजत असतात. असो. लोकांच्या हे लक्षात येत नाही की, आपण आपल्या आयुष्याचा वेळ फुकट घालवत आहोत. इकडे क्षणाक्षणाला काळ आपले आयुष्य मरणाकडे ओढून नेत आहे, हेही आपण विसरतो. अशा रितीने आपल्या आयुष्यातील दिवस-वर्षे वायफळ बडबड करण्यात संपत चालली, तर अंतकाळी आपल्याला भगवंताचे स्मरण राहील का? आयुष्यभर ज्या भगवंताचे साधे नावही वाचेने उच्चारले नाही, ज्याचे कधी चिंतन केले नाही, तो भगवंत राम मृत्यूसमयी कसा आठवेल? मरणकाळी तर जीवाला सोडवणारा भगवंतच आहे, असे आपले तत्त्वज्ञान सांगते. ‘तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी’ हे स्वामींनी पुन्हा एकदा मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. 85 मध्ये सांगितले आहे. हा रघुवीर म्हणजेच भगवंत तुम्हाला अंतकाळी सोडविणारा आहे. हे एकदा नक्की ठरले की, मग इतर गोष्टींसाठी कशाला उगीच त्रास करुन घ्यायचा? अहंकार सोडून देऊन भगवंताचे नामस्मरण करण्यात जीवाचे सार्थक आहे. तोच पुढील श्लोकाचा आशय आहे-
रघुनायकावीण वायां सिणावें।
जनासारखें वेर्थ कां वोसणावें।
सदासर्वदा नाम वाचें वसों दे।
अहंतामनीं पापिणी ते नसों दे॥24॥
प्रपंचात अनेक विषयावर आपण केलेली वायफळ बडबड, अनावश्यक घटनांमध्ये आपण केलेला हस्तक्षेप, ज्ञानीपणाचा आव आणून आपण लोकांना दिलेले फुकटचे सल्ले या सार्या गोष्टींनी आपल्याला शिणवटा येणार आहे. रघुनायकाला आपल्याला तारणार्याला सोडून वरील फालतू बाबींचा शिणवटा ओढून घेणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही, असे स्वामी वरील श्लोकात सांगत आहेत. खरंतर हा शिणवटा म्हणजे वाणीचा दुरूपयोग आहे. मागील एका लेखात वाणीच्या सामर्थ्यावर चर्चा केली आहे. शब्द आणि भाषा मानवनिर्मित असली तरी ते ईश्वरदत्त वाणीवर परिणाम घडवीत असतात. यासाठी आपल्या शब्दांत भाषेत भगवंताचे कल्याणकारी नाम असेल तर ते आपल्या वाणीत उतरेल. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणीच्या चार अवस्था आहेत. नामस्मरणाच्या अभ्यासाने नाम परावाणीत पोहोचले की, ते अंतकाळी उपयोगी पडणारे आहे. प्रपंचात आणि इतरत्रही लोकांप्रमाणे व्यर्थ बडबड करण्यात आपल्या शब्दांचा, भाषेचा व्यय केला, तर त्यातून अहंकार निर्माण होणार आहे. लोक अनावश्यक विषयांवर बोलून त्यात आपले मतप्रदर्शन का करीत असतात, याचे कारण येथे दिसून येते. ते म्हणजे अहंकार. मनातील हा अहंभाव माणसाला स्वस्थ बसू देत नाही. या अहंभावाच्या म्हणजे ‘इगो’च्या समाधानासाठी माणूस बडबड करून माझेच म्हणणे कसे बरोबर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. या अहंकाराचा अतिरेक झाला, तर दुसर्याचे चांगले विचारही ऐकण्याची माणसाची तयारी नसते. दुसर्याचे हितकारी विचारही न ऐकण्याची मानसिकता तयार झाली तर त्यात आपलेच नुकसान आहे. त्याने आपला मानसिक व बौद्धिक विकास खुंटतो. म्हणून स्वामी या अहंकाराला ‘पापीण’ म्हणतात - माझ्याशिवाय इतरांना अक्कल नाही, अशी अहंकारी वृत्ती दुष्ट आणि घात करणारी आहे, म्हणून ती ‘पापीण’ होय. ही वृत्ती पापांची वृद्धी करते. म्हणून स्वामी मनाला स्पष्टपणे सांगतात की, ‘अहंता मनीं पापिणी ते नसो दे’ ही अहंता दूर ठेवण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा सोपा उपाय नाही.
वरील श्लोकांतील, ‘राघवशिवाय काही बोलू नयें’, ‘रघुनायका वाचून वाया कष्ट कां करावे’ तसेच श्लोक क्र. 38 ते 42 यात सांगितलेले ‘मना सज्जना राघवी वस्त कीजे’ या ओळींतील सांकेतिकता व त्यामागे दडलेले तत्कालीन ऐतिहासिक संदर्भ काय आहेत, यावर पुढील लेखात पाहू.
-सुरेश जाखडी