हा हिंदुत्वाचा हुंकार आहे..!

    02-Apr-2022
Total Views |

Kashmir
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षारंभ आणि हिंदू संघटनाचा मंत्र देणार्‍या संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती. त्याच औचित्याने आद्य सरसंघचालकांनी पाहिलेल्या हिंदू संघटनाच्या, हिंदुत्व जागरणाच्या संबंधातील जागतिक पटलावरील सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...गेल्या एक-दीड महिन्यांत अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशियाने युक्रेनवर आक्रमण केले.


त्यानंतर साधारण दोन-चार दिवसांत युक्रेनचा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र, तसे झाले नाही. ‘नाटो’ देश आणि अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेनसारखा लहानसा देश, आज 37 दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. 1) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि 2) दि. 11 मार्चला ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला. विधानसभांच्या निकालांनी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली की, उत्तर प्रदेशसारख्या महाकाय राज्यातली जनता हिंदुत्वाचे समर्थन करणार्‍या भाजपच्या मागे उभी आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ने मात्र जणू एखाद्या क्रांतीची सुरुवात केली. सुमारे 14 कोटींचा हा चित्रपट. भारतीय चित्रपट जगताच्या भाषेत बोलायचे, तर सर्वार्थाने ‘लो बजेट फिल्म’. पण, या चित्रपटाने इतिहास घडविला. फक्त 630 ‘स्क्रीन्स’वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चक्क 4.25 कोटी रुपये कमावले. या यशाला या दृष्टिकोनातून बघता येईल - काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘अंतिम’ या चित्रपटाला 3 हजार, 200 पडद्यांवर प्रदर्शित केले गेले होते. या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे उत्पन्न होते, फक्त पाच कोटी रुपये! या पार्श्वभूमीवर ‘द काश्मीर फाईल्स’चे यश झळाळून दिसतेय.

अगदी पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट ‘लोकांचा चित्रपट’ झाला. सर्वसामान्य चित्रपटात असणार्‍या ‘मसाल्याचा’ पूर्ण अभाव. गाजलेली गाणी नाहीत की, खूप गाजलेले कलावंतही नाहीत. चित्रपट गंभीर. अंगावर येणारा आणि तरीही हा चित्रपट रोज यशाचे नवनवीन कीर्तिमान स्थापित करत होता. चित्रपट संपल्यावरही लोकांनी आपापल्या खुर्च्यांवर बसून राहणे; त्याच स्थितीत अनेक ठिकाणी कोणी तरी हृदयाच्या तळातून आलेल्या आत्यंतिक आवेशाने, या चित्रपटाच्या निमित्ताने सद्यःस्थितीवर भाष्य करणे; हिंदूंच्या भविष्याबद्दल बोलणे, शहराशहरांतून, गावागावांतून लोकांनी चक्क मोर्चे काढत, गटागटाने घोषणा देत, भगवे ध्वज नाचवत हा चित्रपट बघायला जाणे, हे सारे अद्भुत होते. या देशात प्रथमच घडत होते. हिंदी चित्रपटसृष्टीला जबरदस्त हादरे देत होते..!

या देशाच्या एका भागात हिंदूंवर भयानक आणि अमानुष अत्याचार होत होते आणि या देशातील बहुतांश हिंदूंना त्याची माहिती नव्हती, जाणीव नव्हती. या जळजळीत सत्याने अनेक जण अस्वस्थ होत होते आणि या वेदनेतूनच जणू काही या देशातील हिंदू खडबडून जागा झाला. त्याला हिंदू एकोप्याची, संघटित ताकदीची गरज जाणवायला लागली. अखिल विश्वात हिंदूंना संघटित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाले आणि त्यातूनच, जेव्हा काही चित्रपटगृहांत, हा चित्रपट संपल्यावर एक-दोन स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हणू लागले, तेव्हा त्या गच्च भरलेल्या चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्तीने अत्यंत अनुशासित पद्धतीने संघाची प्रार्थना म्हटली. हे असे विलक्षण या देशात पहिल्यांदाच घडत होते.



दोन आठवड्यात 250 कोटी रुपये गोळा करणार्‍या या चित्रपटानंतर आला, दक्षिणेतला ‘बिग बजेट’ चित्रपट - ‘आरआरआऱ.’ तेलंगणमधील दोन क्रांतिकारकांच्या जीवनावरील हा चित्रपट विशुद्ध भारतीय रंगात रंगलेला होता. याचे नायक आणि इतर अभिनेते चक्क भारतीय पद्धतीने धोतर नेसलेले आणि कपाळावर गंध लावलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आदर्श पुरुषांच्या रुपात दाखवले होते. महत्त्वाचे म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो भारताचा राष्ट्रध्वज बनविला होता आणि मॅडम भिकाजी कामा यांनी विश्व मंचावर जो सर्वप्रथम प्रदर्शित केला होता, तो भगवा ध्वज यात अभिमानाने दाखविला होता.



या चित्रपटानेही उत्पन्नाचे सर्व कीर्तिमान उद्ध्वस्त केले. यापूर्वी दणदणीत यश मिळवलेला, प्राचीन भारतीय परिवेशातला ‘बाहुबली’ चित्रपट या एस.एस राजमौलींचाच. पण ‘आरआरआऱ’ने त्याचाही विक्रम मोडला. या सर्व गोष्टींचा हिंदी चित्रपटसृष्टीवर परिणाम होतच होता. फक्त ‘पैसा’ आणि ‘यश’ या दोनच गोष्टी समजणार्‍या ‘बॉलीवुड’ला पुरते कळून चुकले की, यापुढे या देशाच्या संस्कृती आणि परंपरेशी फटकून असलेला कोणताही चित्रपट, या देशात चालू शकणार नाही आणि म्हणूनच या कालावधीत सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान ही खान गँग बिळात लपून बसली होती. अक्षय कुमारने, त्याच सुमारास प्रदर्शित झालेल्या, त्याच्या ‘बच्चन पांडे’ या मार खाल्लेल्या चित्रपटावर फारसे काही न बोलता, त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. दसरा-दिवाळीत प्रदर्शित होणारा त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट, पृथ्वीराज चौहानवर केंद्रित आहे आणि संपूर्णतः भारतीय रंगात रंगलेला आहे!


हे सर्व सविस्तर सांगायचे कारण म्हणजे हिंदुत्वाबद्दल गेल्या महिन्या-दीड महिन्यांत दिसलेली ही प्रचंड अनुकूलता आणि जनजागरण. हिंदू मूल्य, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा याबद्दल देश-विदेशात प्रचंड कुतूहल निर्माण झालेले आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ‘आज तक’ या वाहिनीवर युक्रेनच्या आंद्रे (अपवीश) नावाच्या सैनिकाची, भारतीय वार्ताहर महिलेने घेतलेली मुलाखत बघितली असेल. रशियन-युक्रेन युद्ध प्रारंभ होऊन तीन आठवडे झाले होते. आपल्या देशासाठी लढणार्‍या त्या युक्रेनी सैनिकाने सांगितले की, त्याला युद्धाची भीती वाटत नाही. तो निर्भयतेने लढतोय. कारण त्याची श्रद्धा आहे-‘भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी आहेत.’ तो सैनिक आपल्या जवळची जपमाळ त्या वार्ताहर महिलेला दाखवतो आणि सांगतो की, “अगदी युद्धाच्या धामधुमीतही मी भगवान श्रीकृष्णाचा जप करत असतो. त्यामुळे मला आत्मिक बळ मिळते.”


हा सैनिक अपवाद नाही. अगदी रशियन सैन्यातही असे जपमाळ घेतलेले सैनिक सापडतील. रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अनेक देशांमध्ये ‘इस्कॉन’चे मोठे काम आहे. हिंदुत्वाकडे आकर्षित झालेल्या लोकांसाठी ‘इस्कॉन’ हे माध्यम ठरत आहे. मध्य पूर्वेत आणि युरोपियन देशांत रविशंकर, माता अमृतानंदमयी वगैरे संतांचे अनुयायी वाढताहेत. अनेक ठिकाणी ख्रिश्चन/इस्लामी पूजा पद्धती आणि हिंदू जीवन पद्धती हे त्यांच्या जीवनाचे सूत्र बनत चाललेय. अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक चर्चेसचे रुपांतर मंदिरांमध्ये होत आहे.

हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचा (ठर्शीीीसशपलश) हा प्रतिसाद अक्षरशः जगाच्या कानाकोपर्‍यातून मिळतोय. विशेषतः कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांनी योग आणि आयुर्वेद यांचा स्वीकार केला, त्यामुळे या हिंदू जीवन पद्धतीकडे, हिंदुत्वाकडे आकर्षित होण्याचा कल वाढत आहे. गेल्याच वर्षी इंडोनेशियामध्ये सुकार्नोपुत्री मेघावती यांनी त्यांच्या 28 हजार अनुयायांसह इस्लामचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश केला होता. त्यापूर्वी, साधारण वर्षभर आधी, जावा प्रांताच्या राजकुमारीने तिच्या अनुयायांसह हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. इंडोनेशियामध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची संख्या दरवर्षी वाढते आहे.


जवळपास हीच परिस्थिती घानासारख्या आफ्रिकन देशातही आहे. 70च्या दशकात स्वामी कृष्णांनंदांनी भारतातून जाऊन तिथे हिंदू धर्माचा प्रसार केला होता. आज त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचा शिष्य परिवार वाढत आहे. सुमारे 40 हजारांपेक्षा अधिक कडवे आफ्रिकन हिंदू आज घानामध्ये आहेत. अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन विद्यापीठांमध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ (खपवळरप घपेुश्रशवसश डूीींशा - खघड) चे अनेक पाठ्यक्रम चालू आहेत. हे पाठ्यक्रम नॉन-ग्रेडेड असले तरीही फार मोठ्या संख्येत विद्यार्थी ते निवडताहेत. अनेक विद्यापीठांमध्ये ‘आयकेएस’ हा परवलीचा शब्द आहे. जगभरात शास्त्रशुद्ध पद्धतीने योग शिकवणार्‍या लोकांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय. अस्सल आयुर्वेदिक औषधांच्या निर्यातीत जबरदस्त वाढ झालीय...



हे सर्व फार सुखद आहे. हे ‘हिंदुत्वाचे वैश्विक पुनरुत्थान’ (ॠश्रेलरश्र कळपर्वी ठर्शीीीसशपलश) आहे. अनेक गोष्टी जुळून आलेल्या आहेत. अनेक गोष्टी जुळून येताहेत. राजकीय पटलावर योगींच्या पुन्हा झालेल्या विजयामुळे हिंदुत्वाचा राजकीय आधार सशक्त झालाय. ‘द काश्मीर फाईल्स’मुळे हिंदू खडबडून जागा झालाय. जागतिक पातळीवर भारत विश्व नेतृत्व करण्याच्या दिशेने दमदार पावले टाकतोय. आजच्या या वर्षप्रतिपदेला हिंदुत्वाचे सुखद चित्र समोर येत आहे. संघ संस्थापक डॉ. केशवराव बळीरामपंत हेडगेवार यांच्या जयंतीच्या दिवशी सार्‍या जगात हिंदुत्वाचा जयघोष दुमदुमतोय. होय, हा हिंदुत्वाचा हुंकार आहे...!


- प्रशांत पोळ 

9425155551