‘नवीन सामान्य’ किंवा ‘न्यू नॉर्मल’ हे जगात अस्थिरता आणि अनिश्चितता या पार्श्वभूमीवर स्थिरावणार आहे. त्यामुळे विकसित, विकसनशील आणि अविकसित असे सगळेच देश काही महत्त्वाच्या आर्थिक राजकीय निर्णयाचा नवा मार्ग निवडतील, हे निश्चित. विविध देशांची सरकारे काही योजनांची अंमलबजावणी समाजाला आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करतील. याव्यतिरिक्त ‘कोविड’ काळात ज्यांच्यावर अधिक परिणाम झाला आहे, अशी लोकसंख्या असलेल्या गटांना अधिक समर्थन मिळेल.
महामारीच्या काळातील आतापर्यंतच्या शास्त्रीय संशोधनात असे दिसून आले आहे की, ‘कोविड-१९’ या विषाणूने राजकीय, आर्थिक आणि सामाजिक लय वैयक्तिक आणि सामाजिक या दोन्ही पातळीवर बदलून टाकली. जे प्रभावात्मक बदल आपण आजपर्यंत जगात झालेले पाहिले आहेत, त्याच्या विपरित या विषाणूच्या साथीने अल्पावधीत पूर्ण विश्वात व्यापक, गंभीर आणि बर्याच अंशी क्रांतिकारी बदल घडवून आणले. अनेक विशेषतज्ज्ञांच्या मतानुसार, हे नवीन बदल इतके खोलवर रुजलेले आहेत की, आपण आजवर पारंपरिकदृष्ट्या करत असलेल्या प्रचलित अशा जुन्या गोष्टींपासून हे नवीन सामान्य बदल समाजात अंकुरित आहेत, हे सहज लक्षात येऊ शकते. या जलद आणि प्रबळ अशा बदलांचा केंद्रबिंदू म्हणजे, केवळ आपल्या भारत देशातच नव्हे, तर जगभरातील सर्व देशांत आरोग्यसेवा प्रणाली दैनंदिन व्यवहारात गतिमानरित्या आणि मूलभूत पातळीवर ज्या बदलांना सामोरी गेली ती प्रक्रिया. कोरोना काळात मृत्यूचे थैमान माजलेले असताना जी अघटित उलथापालथ वैश्विक पातळीवर झाली, त्यामध्ये वैद्यकीय आणि जैविक शास्त्रज्ञांचा फायदा आरोग्य यंत्रणेच्या संस्थांनी व नेत्यांनी, भले तो तणावाखाली असेल पण घेतला.
त्यात या महामारीला आवर घालताना शास्त्रीय कौशल्य आणि ज्ञान याचा फायदा जगासाठी मुक्तपणे करुन दिला, ती एक अजरामर वैश्विक घटना आहे. दोन वर्षांच्या आता एक जीवघेण्या विषाणूच्या साथीला आवर घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी लसनिर्मिती केली. ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारीक घटना म्हणावी लागेल. आजपर्यंत महामारीच्या काळात जी काही नवीन धोरणे आणि प्रक्रिया निर्माण झाल्या, त्या जागतिक आरोग्याला आज आधारस्तंभ झाल्या आहेत. विविध विभाग आणि क्षेत्रे, ज्यामध्ये व्यावसायिक आणि उद्योगक्षेत्रेसुद्धा आहेत, ती सगळी आज ज्या पद्धतीने, ज्या शास्त्रीय सिद्धांतांची उत्पत्ती करुन तांत्रिक पद्धतीचा वापर करून, नव्या जोखमी पत्करून जुन्या सिद्धांतांना आव्हान देऊन आरोग्य विभागाने जी हिरीरी दाखवली, जी विधायकता, आशा जोपासली, त्या सगळ्या अनुभवांकडे आणि मानांकाकडे एक अफलातून आणि प्रभावी प्रयोग व अनुभव म्हणून पाहत आहेत.
‘कोविड-१९’च्या प्रलयथैमानाला आवर घालणे हे आजपर्यंतच्या जीवशास्त्रात संशोधकांनी अनुभवलेले सर्वात अद्भुत आणि अचाट शास्त्रीय आव्हान आहे. त्यात प्रयोग फसण्याचे आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोकाच होता. कोरोनाच्या दोन लाटांत जगाला मृत्यूच्या विळख्यात लपेटण्याचा प्रयत्न करताना आपण सगळ्यांनी पाहिले, पण त्याचवेळी जगभराची सरकारे आणि त्यांचे नेतेसुद्धा शास्त्रज्ञांना प्रोत्साहित करत कोरोनाला बांध घालत राहिले. सोशल मीडियाचा वापर करुन तळागाळाच्या निष्पाप जनतेला जागृत करुन कोरोनाला आवर घालण्यात जग यशस्वी झालेच. पण, वार्याच्या वेगाने लसनिर्मिती करून लाखो-कोट्यवधी लोकांचे आयुष्य वाचविण्यात शास्त्र, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीयतज्ज्ञही यशस्वी झाले. या अनोख्या अभूतपूर्व विजयात ‘नवीन सामान्या’चे बियाणे रुजलेले आहे. जग वेगात विधायकरित्या बदलू शकते, हे सिद्ध झाले आहे.
‘नवीन सामान्य’ किंवा ‘न्यू नॉर्मल’ हे जगात अस्थिरता आणि अनिश्चितता या पार्श्वभूमीवर स्थिरावणार आहे. त्यामुळे विकसित, विकसनशील आणि अविकसित असे सगळेच देश काही महत्त्वाच्या आर्थिक राजकीय निर्णयाचा नवा मार्ग निवडतील, हे निश्चित. विविध देशांची सरकारे काही योजनांची अंमलबजावणी समाजाला आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करतील. याव्यतिरिक्त ‘कोविड’ काळात ज्यांच्यावर अधिक परिणाम झाला आहे, अशी लोकसंख्या असलेल्या गटांना अधिक समर्थन मिळेल. सामाजिक कल्याणाच्या योजना या देशोदेशी अधिक प्रभावी नियोजनांतून वितरित केल्या जातील, तशी या काळात अशासाठी गरज आहे की, कोरोनाचा नकारात्मक प्रभाव पुढची १०-१२ वर्षे लोकांचे राहणीमान आणि जगण्याचा दर्जा खालावून देणारा आहे. काही देशांमध्ये कोरोना काळातले आरोग्यसंकट हळूहळू कमी होत चालले असताना आर्थिक पुनर्वसन सुरू करण्यासाठी देशोदेशींचे अर्थतज्ज्ञ आता प्रयत्नशील आहेत.
आर्थिक पुनर्प्राप्ती करताना फक्त नियमित अर्थव्यवस्था आणि दैनंदिन उपजीविका या पुन्हा समृद्ध मार्गावर याव्यात, इतका या पुनर्प्रस्थापित योजनेचा भाग नसावा. आता सर्व देशांनी एकत्रित येऊन दीर्घकाळ संवर्धित होणारी अर्थसमृद्धी आणि आयुष्याची एकंदरीत गुणवत्ता वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचा अर्थ जागतिक पातळीवर आर्थिक नियोजन अर्थगुंतवणूक आणि विधायक-सामाजिक बदल, ‘नवीन सामान्य’ योजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे किंवा तशा योजना सरकारी पातळीवर राबविता आल्या पाहिजे. आतापासून यापुढे भविष्यात येऊ घातलेले जागतिक धोके, जे अमर्याद आर्थिक अडचणी निर्माण करतात, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
- डॉ. शुभांगी पारकर