नाल्यांतील गाळ काढणे, चर पुनर्बांधणीसाठी ५४५ कोटी प्रशासकांची मंजुरी

    01-Apr-2022
Total Views |
 

mumbai  
 
मुंबई : मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधील गाळ काढणे आणि रस्त्यांवरील चर पुनर्बांधणी या दोन कामांची निकड लक्षात घेता त्यासाठीच्या मिळून एकूण ३० निविदांना महापालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. या सर्व निविदांच्या कामांसाठी सुमारे ५४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार अहेत. कार्यादेश देवून पावसाळ्यापूर्वी होणारी कामे विहित वेळेत पूर्ण होतील, असा दावा प्रशासकांनी केला आहे.
नाल्यांमधील गाळ काढण्यासाठीच्या कामांचा विचार करता मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या सुमारे ७१ कोटी रुपयांच्या आहेत व लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदा संमत झाल्या आहेत. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ आणि पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ याप्रमाणे मंजूर झाल्या. मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींच्या प्रस्तावांना प्रशासकांनी मान्यता दिली आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांवरील चर पुनर्बांधणीचीही कामे करण्यात येणार आहेत. परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशा ७ निविदांनाही संमती मिळाली. त्यांची एकत्रित किंमत ३८३ कोटी रुपये इतकी आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी मंजुरी मिळाल्याने उपयोगिता संस्थांना कार्यादेश देवून तातडीने कामे सुरु करण्यात येणार आहे, असा दावा महापालिका प्रशासकांनी केला आहे.