मुंबई : कोरोनासह अन्य महामारी मुंबईत कमी झाल्यामुळे मास्क वापरण्यासंबंधीची सर्व बंधने मुंबई महापालिकेने मोकळी केली आहेत. ‘मास्क नाही, मग दंड आकारणीही नाही, ’अशी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका पालिकेने गुरुवारी जाहीर केली. या निर्णयामुळे मुंबईकरांना किंवा बाहेरुन येणा-यांना मास्क बाळगण्याचे बंधन नाही. मास्क नसल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करत होती. मात्र ही कारवाई यापुढे होणार नाही.
गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातून हे आदेश देण्यात आले आहेत, असे महापालिकेला कळवण्यात आले. ‘बाहेर रस्त्यावर आलेल्या व्यक्तीने स्वत:हून मास्क लावावा, अशा मार्गदर्शक सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘मुंबई तरुण भारत दिली. याआधी मास्क न वापरणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिस यांच्या समन्वयाने होत होती. मास्क न लावणा-यांना हटकणे आणि त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासाठी ‘मार्शल’ नेमण्यात आले होते. १ एप्रिलपासून दंड आकारणीकरीता नवीन एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरु होती. परंतू एजन्सी नेमण्याची आवश्यकता नाही, असेही काकाणी म्हणाले.