नागपूर : वीज तोडणी आणि जादा वीजबिल आकारणीला कंटाळून सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने जीवन संपविल्याची घटना पंढरपुरात घडली. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही, असं सुरज मृत्यूपूर्वी म्हणाला होता. या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्रालय काही धडा घेणार आहे का? ऊर्जा मंत्रालयाकडून राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का? असा प्रश्न राज्याचे माजी ऊर्जामंत्री, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
"दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी मिळेल, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करू, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊ, ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी मिळेल, शेतकरी आत्महत्या थांबतील अशी आश्वासनं महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. पण, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही कमी झालेल्या नाहीत, २०२० मध्ये महाराष्ट्रात एकूण २ हजार ५७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ या काळात २ हजार २०७० शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. अशातच आता तर चक्क वीज तोडणीला कंटाळून सुरज जाधवने आपलं जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ऊर्जा मंत्रालयाने तात्काळ हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे.", असे आ. चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. तसेच वीज तोडणी थांबवण्याबाबतची विनंतीही त्यांनी केली आहे.
"महावितरण कर्जबाजारी झाल्याचे सांगत राज्यात १६ विभागाअंतर्गत ४४ सर्कल अधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वेठीस धरला जातोय. सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, गडगडलेले शेतमालाचे दर, एकरकमी एफआरपीसाठी संघर्ष, दुधाचा घसरलेला दर, जनावरांचा चारा, शेतीची मशागत अशा चहुबाजूनी राज्यातला शेतकरी अडचणीत सापडला आहे. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी व मुलांच्या भविष्यासाठी तो दिवसरात्र झगडतोय. तरीही, शेतातील पिकाला पाण्याची जोड मिळाल्यास त्याला या संकटातून बाहेर निघण्यास मदतच होणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने तात्काळ यात लक्ष घालण्याची गरज आहे.", असेही ते पुढे म्हणाले.