अमरावती : शिवसेनेच्या 'शिवभोजन थाळी' संदर्भात असलेला धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार मंगळवारी एका व्हिडिओतून उघडकीस आला. यवतमाळ मधल्या महागाव येथे एका शिवभोजन थाळी केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी जेवणाची ताटं चक्क शौचलयातल्या पाण्याने धुतली जात असल्याचे समोर आले आहे. राज्यातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील गरजू व्यक्ती उपाशी न राहता त्यांना कमी दरात पोषक आहार मिळावा, या उद्देशाने शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र यवतमाळ मधल्या शिवभोजन थाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आल्याने शिवभोजन थाळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. संबंधित शिवथाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीकडून चालवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. किमान जनतेच्या आरोग्याची काळजी पाहता घडलेल्या प्रकाराबद्दल ठाकरे सरकारची भूमिका काय असेल? संबंधित केंद्रावर कारवाई होणार का? असे प्रश्न सध्या उद्भवू लागले आहेत.