मुंबई : "माझे मुंबईत स्वतःचे घर नाही, तरीही आमदारांना मोफत घरे देणे मला मान्य नाही. सरकारने आमदारांना घरे देण्यापूर्वी शेतकऱ्यांना व एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावेत.", असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मविआ सरकारला फटकारण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत तीनशे घरे कायमस्वरुपी देण्याबाबत घोषणा शुक्रवारी (दि. २५ मार्च) विधानसभेत केली. त्याबद्दल चंद्रकांतदादा पाटील पत्रकारांशी बोलत होते.
“आमदार सोडून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर वर्षाव करणे चालू आहे. मतदारसंघाचा विकासनिधी मुळात दरवर्षी दोन कोटी रुपये होता, तो कोरोनाच्या काळात चार कोटी केला व आता पाच कोटी. आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार वाढविला, सहायकाचा पगार वाढविला. आमदारांना घरे देणार अशी घोषणा केली. घर पाहिजेत कशासाठी? माझे मुंबईत घर नाही. तरीही मी आग्रही असेन की तुम्ही मला जे घर देणार त्या पैशामध्ये शेतकऱ्यांना पैसे द्या, एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या. माझ्यासारखे काहीजण सोडले तर अनेकांची घरे आहेत. घरे विकत घेण्याची त्यांची क्षमता आहे. मुळात कोणी कोणाला आमदार होण्यासाठी नारळ देऊन निमंत्रण दिले नव्हते. मला हे मान्य नाही. तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या, एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या, मग आमदारांना घरे द्या.”, असे चंद्रकांत दादा यावेळी म्हणाले.