केंद्र दडपशाहीने कारवाई करत आहे, सूडबुध्दीने कारवाई सुरू आहे, केंद्र सरकार कडून नाहक त्रास दिला जात आहे ही व अशा आशयाची विधाने काल पाटणकर यांच्या सदनिका जप्त केल्यावर सुरू झाल्या. खरतर ही कारवाई भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या काळ्या पैशाची गुंतंवणूक केलेल्या सदनिकांविरोधातील होती, हे स्पष्ट असूनही त्यास राजकीय रंग देऊन आकांडतांडव सुरू आहे, मात्र नेमके प्रकरण काय हे समजून घेऊया.
सक्तवसुली संचालनालयाने २२ मार्च रोजी ठाणे येथील श्री. साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीच्या मालकीच्या ११ सदनिकांवर केलेली जप्तीची कारवाई हा मार्च २०१७ मधील कारवाईचाच पुढील टप्पा असल्याने, नोटाबंदीच्या दरम्यान रोख रकमेची हेराफेरी करून काळा पैसा अन्यत्र वळविण्याचा एक उच्चभ्रू धंदा या कारवाईतून उघड झाला आहे.
विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी, ६ मार्च २०१७ रोजी ईडीने नोटाबंदीसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मे. पुष्पक समूहाच्या कंपनीवर कारवाई करून २१.४६ कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केल्यानंतर तेव्हा मूग गिळून गप्प बसलेले राजकीय नेते आता या कारवाईस राजकीय रंग देऊ लागल्याने या प्रकरणाचे धागेदोरे कोठे पोहोचले आहेत, याविषयी जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे.
उच्च्भ्रू वर्गात वावरणाऱ्यांचे भ्रष्ट व्यवहार उघडकीस येऊ लागल्याने राजकीय आकांडतांडव करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेस कदापिही पटणार नाहीत.
एका बाजूला स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून निष्ठेने व नेत्यावरील विश्वासाने झोकून देणारे पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला याच निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जिवावर नेतेपद मिळवून आपल्या परिवारांवर सोन्याची कौले चढविणारे नेते असे लांछनास्पद व्यवहार उघडकीस येऊ लागले असून, कितीही कांगावा केला तरी महाराष्ट्राची प्रामाणिक जनता अशा भ्रष्टाचाराची पाठराखण करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी, २२ मार्च २०२२ रोजी सक्तवसुली संचालनालयाने पुष्पक समूहातील मे. पुष्पक बुलियन या कंपनीची ६.४५ कोटींची स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली. ठाणे येथील नीलाम्बरी प्रकल्पातील श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या व त्यांच्या ताब्यात असलेल्या ११ सदनिकांचा त्यामध्ये समावेश आहे. पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असल्याने, ईडीच्या या कारवाईनंतर अनेक हितसंबंधीयांनी त्यास राजकीय रंग देण्यास सुरुवात केली.
मात्र, ही कारवाई भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या काळ्या पैशाची गुंतंवणूक केलेल्या सदनिकांविरोधातील होती, हे स्पष्ट असूनही त्यास राजकीय रंग देऊन आकांडतांडव सुरू झाले. पुष्पक समूहावरील गेल्या पाच वर्षांपासून याच संदर्भात सुरू असलेल्या कारवाईचाच हा एक भाग असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
मार्च २०१७ मधील कारवाईनंतर समोर आलेल्या बाबींना अनुसरून सुरू असलेल्या या कारवाईतून हेही उघडकीस आले की, पुष्पक बुलियनचे महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या इसमाशी हातमिळवणी करून २०.०२ कोटींची रक्कम चतुर्वेदीशी संबंधितांकडे वर्ग केली.
अनेक बनावट कंपन्या चालविणाऱ्या या चतुर्वेदीने हमसफर डीलर प्रा. लि. नावाच्या त्याच्या एका बनवाट कंपनीद्वारे ३० कोटी रुपयांचे विनातारण कर्ज मे. साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीस दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे, महेश पटेल याने नंदकिशोर चतुर्वेदीमार्फत साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीत आपला पैसा वळविल्याचे तपासातून समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.
धर्म, जातीचे रंग देऊन भ्रष्टाचारास राजकीय पाठबळ देण्याचे प्रकार वाढत आहेत. ते चालवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशारा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर, ईडीच्या या कारवाईनंतर राजकीय गदारोळ करून जनतेच्या मनात संभ्रम माजविणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही.
- केशव उपाध्ये