मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लाँडरींग प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. ठाण्यातील निलांबरी प्रकल्पाच्या ११ सदनिकांवर ईडीने टाच आणली आहे. यात एकूण ६.४५ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. या सर्व सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावे आहेत. श्रीधर माधव पाटणकर म्हणजेच रश्मी ठाकरेंचे बंधू यांच्यावर ही कारवाई झाल्यामुळे आता थेट मातोश्रीपर्यंत याचे धागेदोरे आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळेबाजांना सोडणार नाही, असे म्हणत ट्विट केले आहे.
ईडीने या प्रकरणात ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. नोटबंदीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारामुळे पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीज् या कंपनीच्या ६.४५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणल्याचे यात म्हटले आहे. श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरेंचे मेव्हणे, यांच्यावर मनी लाँडरींग प्रकरणात कारवाई झाली आहे. शेल कंपन्यांच्या वापरामुळे ईडीने या संपत्तीवर टाच आणल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल २१ कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. ईडीने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे.
या प्रकरणाची भुयारी गटारं मातोश्रीवर
आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात प्रतिक्रीया दिली आहे. भ्रष्टाचाराची पाळंमुळं खोलवर आहेत. ही भुयारी गटारं मातोश्रीपर्यंत जाणार आहेत. सरळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकाचेच नाव आता यात आले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी आता राजीनामा द्यायला हवा, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.