मुंबई: मुंबईमधील पवई तलावाच्या सुशोभीकरणासाठी उभारण्यात येणाऱ्या कारंज्यांच्या खर्चाने पालिकेच्या खिशाला मोठे भगदाड पडणार आहे. या कारंज्यांचा खर्च दुपटीने वाढला असून पालिकेकडून होणारी मुंबईकरांच्या पैश्यांची उधळपट्टी अजून किती दिवस चालणार हा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. या सुशोभीकरणाच्या कामांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यांमुळे याचा ६३ लाख ४४ हजारांचा खर्च दुप्पट होऊन आता १ कोटी ४४लाखांवर पोहोचला आहे.
गेल्याच वर्षी क्लासिक फाउंटन्स या कंपनीला या कामाचे कंत्राट दिले होते. या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून तलावाच्या काही भागांमध्ये पाण्याची खोली कमी असल्याने उच्च दाबाची विद्युत वाहिनी बसवावी लागणार आहे. या तयार झालेल्या नवीन कामामुळे मूळ नियोजित खर्चात वाढ झाली आहे. निव्वळ सुशोभीकरणाच्या नावाखाली सामान्य मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी पालिका अजून किती दिवस करणार? हा गंभीर प्रश्न उभा राहत आहे.