मुंबई: कांदिवली येथील एकता नगर भागातील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टॅन्कची सफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही सफाईची कामे करणाऱ्या कामगारांची आवश्यक सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारीसुद्धा घेतली जात नसल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे हे मॅनहोल्स या कामगारांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
सफाई कामगारांना या मॅनहोल्स मध्ये किंवा स्वच्छता टाक्यांमध्ये उतरावे लागू नये यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन यंत्रणा बसवल्या आहेत. तरीसुद्धा कामगारांचे असे जीव जाणार असतील तर असल्या यंत्रणा काय कामाच्या? असा सवाल विचारला जात आहे. "हे कामगार अशिक्षित आणि असंघटित असल्याने त्यांना त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या कुठल्याही सुरक्षा नियमांची कल्पना नसते आणि त्यांच्या कडे पालिकेकडूनही दुर्लक्षाच होते. त्यामुळेच त्यांच्याकडून वाटेल तसे काम करून घेतले जाते. या कामगारांना त्यांच्यावरच्या अन्यायाची साधी दादही मागता येत नाही. हा प्रमुख प्रश्न आहे" अशी प्रतिक्रिया कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी दिली आहे.