वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय संगीत, नाट्य संगीतात काम करत असूनही लतादीदींनी सिनेसंगीताची निवड केली व त्यातच त्या पुढे गेल्या. भाषा कोणतीही असो, संगीतप्रेमींना त्या आपल्या दैवी आवाजाची अनुभूती देत राहिल्या. मराठी भाषिक असूनही लतादीदींनी हिंदी चित्रपटांत सर्वाधिक गाणी गायली आणि अमराठी जनमानसावरही आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवले.
आपल्या स्वर्गीय स्वरांच्या परीसस्पर्शाने प्रत्येक गीताला अजरामर करणार्या ‘भारतरत्न’ लता मंगेशकर गेल्या अन् भारतीय संगीतसृष्टीचा आत्मा हरपला. गेल्या आठ दशकांपासून हिंदी, मराठी, बंगालीसह अनेक भाषांमधील हजारो गाणी गाणार्या लतादीदींचे स्वर रसिकांना तृप्त करत आले. लतादीदींनी गीत गावे अन् आपण कानांच्या ओंजळी करुन त्या स्वरगंगेचा फक्त आस्वाद घेत राहावे, ही कोट्यवधी भारतीयांची दिनचर्या झालेली होती. पण, लतादीदी इथपर्यंत पोहोचल्या त्या अतिशय खडतर मार्गावरुन प्रवास करून. लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी झाला. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर मंगेशी सोडून नाटकांत-संगीतात कारकिर्द घडवण्यासाठी गावाबाहेर पडले. त्यांनी अनेक संगीत नाटकांची निर्मिती केली, त्यात अभिनय आणि गायनही केले. लतादीदींना त्यांच्या वडिलांकडूनच संगीताचा, गायकीचा वारसा मिळाला. पण, लतादीदी आणि भावंडं अगदी पोरवयात असतानाच त्यांच्यावरील वडिलांचे छत्र हरपले. तेव्हा लतादीदी फक्त १३ वर्षांच्या होत्या. त्यावेळी स्वतःसह भावंडांची, कुटुंबाची जबाबदारी थोरल्या असल्याने लतादीदींवरच आली. पण, त्या परिस्थितीतही लतादीदी डगमगल्या नाही. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय संगीत, नाट्य संगीतात काम करत असूनही लतादीदींनी सिनेसंगीताची निवड केली व त्यातच त्या पुढे गेल्या. मराठीसह हिंदी चित्रपटांत गाण्यासाठी त्या प्रयत्न करू लागल्या. तथापि, लतादीदींना तत्काळ चित्रपटांत गाण्याची संधी मिळाली नाही.
बारीक आवाज आणि हिंदी-उर्दू भाषेवरील प्रभुत्वाच्या शंकेने कितीतरी संगीत दिग्दर्शकांनी त्यांना नकार दिला. त्या काळी नूरजहाँ, शमशाद बेगम यांसारख्या जाड आवाजांच्या गायिकांचा, हिंदी-उर्दूची जाण असणार्यांचा चित्रपटसृष्टीत दबदबा होता. पण, लतादीदींनी प्रयत्न सोडला नाही अन् त्यांना पहिली संधी मिळाली ती मराठी चित्रपटात. १९४२ सालच्या ‘किती हसाल?’ या चित्रपटात लतादीदींनी आपले पहिले गाणे गायले, पण ते प्रदर्शित झाले नाही. त्यानंतरही लतादीदींचे चित्रपटात गाणी गाण्यासाठीचे प्रयत्न सुरुच होते. तथापि, लता मंगेशकरांच्या हिंदी-उर्दू भाषेच्या जाणतेपणाविषयीचा संशय मिटलेला नव्हता. एकदा संगीतकार अनिल विश्वास यांनी लता मंगेशकरांची भेट दिलीप कुमार यांच्याशी करुन दिली. तेव्हा लता मंगेशकर मराठी असल्याचे समजल्यावर, “ती मराठी आहे, तिला उर्दूची काय माहिती असणार,” असे दिलीप कुमार म्हणाले. दिलीप कुमार यांची टिप्पणी लतादीदींनी सकारात्मकतेने घेतली आणि उर्दूसह हिंदी शिकण्याची जिद्द धरली. त्यासाठी शिकवणी लावली आणि “मी मराठी असले तरी हिंदी चित्रपटात गाणी गाऊ शकते,” या विश्वासाने आपली भव्यदिव्य कारकिर्द घडवून दाखवली. १९४९ साली आलेल्या ‘महल’ या हिंदी चित्रपटातील त्यांचे ‘आयेगा आने वाला’ गाणे अफाट लोकप्रिय झाले आणि लतादीदींचा आवाज आपल्या चित्रपटासाठी, गाण्यासाठी हवा असे जवळपास सर्वच चित्रपट दिग्दर्शकाला, संगीतकाराला वाटू लागले. तेव्हापासून गेली ८० वर्षे लतादीदी गात राहिल्या. भाषा कोणतीही असो, संगीतप्रेमींना आपल्या दैवी आवाजाची अनुभूती देत राहिल्या. मराठी भाषिक असूनही लतादीदींनी हिंदी चित्रपटांत सर्वाधिक गाणी गायली आणि अमराठी जनमानसावरही आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवले, ते अखेरपर्यंत टिकवून ठेवले, हे त्यांचे वैशिष्ट्य.
‘मैं तो तुम संग नैन मिला के’पासून ते ‘गपुची गपुची गम गम’ असो वा ‘यशोदा का नंदलाला’पासून ‘दिल दिवाना बिन सजना के माने ना’ असो वा ‘यारा सिली सिली’पासून ‘जॅक अॅण्ड जिल वेन्ट अप द हिल...’ वेगवेगळ्या प्रकाराची, चालीची गाणी लतादीदींनी गायली. काळानुरुप बदलत गेल्याने, काळाशी जुळवून घेतल्याने लतादीदी प्रत्येक दशकातील खेमचंद प्रकाश, हुस्नलाल-भगतराम, शंकर-जयकिशन, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, नौशाद, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, राम-लक्ष्मण, ए. आर. रहमानपर्यंतच्या संगीतकाराबरोबर गाऊ शकल्या. परिणामी, लतादीदींनीच गायलेल्या ‘तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा’ याप्रमाणे त्यांचा आवाज काळ जसा जसा पुढे सरकत होता, तसा तसा कायम राहिला, लोकप्रिय झाला. मात्र, लतादीदींनी गायलेली चित्रपटगीते लोकप्रिय होतानाच त्यांनी गायलेली देशभक्तीपर गाणीही सर्वांनीच पसंत केली. त्यातलेच लतादीदींनी गायलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों’ गाणे ऐकले की, डोळ्यांच्या कडा पाणावणार नाही, अशी भारतीय व्यक्ती विरळाच. १९६२ सालच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ रचलेल्या या गाण्यात लतादीदींनी जीवंत केलेल्या भावना संपूर्ण प्रसंग अगदी आपल्यासमोर घडत असल्याचेच दाखवून देतो. दि. ६ फेब्रुवारी हा या गाण्याचे गीतकार कवी प्रदीप यांचा जन्मदिन अन् याच दिवशी लतादीदी अनंताच्या प्रवासाला निघाल्या, हा अजब योगायोग.
हिंदीबरोबरच लतादीदींनी मराठीत गायलेली चित्रपट गीते, लावणी, भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय झाली. ‘अखेरचा हा तुला दंडवत’पासून ‘ऐरणीच्या देवा तुला’ असो वा ‘असा हा बेभान वारा’पासून ‘चांद मातला मातला’ असो वा ‘नववधू प्रिया मी बावरते’पासून ‘माजो लवताय डावा डोळा...’ लतादीदींची किती आणि कोणती गाणी सांगावीत? दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके अशा प्रथितयश संगीतकारांबरोबर लतादीदींनी काम केले. मात्र, सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही ऐकली जातात. त्यात ‘गीत रामायणा’तील गाण्यांचाही समावेश होतो. मराठीत गाणी गातानाच लतादीदींनी ‘आनंदघन’ नावाने अनेक गीतांना संगीतबद्धही केले. ‘राजाच्या रंगम्हाली’, ‘रेशमाच्या रेघांनी’पासून ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ ही त्यापैकी काही गाणी. चित्रपटसृष्टीत असूनही लतादीदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक कवितांना आपल्या अलौकिक आवाजाने घराघरांत पोहोचविले. ‘जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले’, ‘सागरा प्राण तळमळला...’ यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवनकार्याचे सांगीतिक चित्रण करणारे ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ ही आरती, ‘गुणी बाळ असा जागसी का रे’ ही अंगाई, ‘हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’, या स्फूर्तिगीतासह समर्थ रामदास स्वामींच्या ‘निश्चयाचा महामेरु’चा समावेश असलेले ‘शिवकल्याण राजा’देखील अवतरले. देशभक्ती, शिवभक्ती अखेरपर्यंत त्यांच्या हृदयात होती, याचेच दर्शन घडवणारी ही गीते.
विशेष म्हणजे, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज व शिवचरित्रातील अनेक व्यक्तिरेखांवर चित्रपट निर्मिती करणार्या ‘चित्रतपस्वी’ भालजी पेंढारकरांबरोबरील आपले नाते कधीही लपवून ठेवले नाही, हे लतादीदींचे वेगळेपण. त्यांची हीच गीते मराठी माणसाच्या मनात सदैव भारतप्रेमाची रुजवण करतील. दरम्यान, लतादीदींनी मराठीत भक्तिगीते गातानाच संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांसह अनेक संतांच्या अभंगांना आपला आवाज दिला आणि ती गाणी मंदिरात, सणा-उत्सवांत सर्वत्र वाजू लागली. त्यातली ‘अगा करुणाकरा’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी’, ‘पसायदान’, ‘पैल तो गे काऊ कोकताहे’, ‘मोगरा फुलला’ आदी रचना तर आजही ऐकेल त्याला भक्तिरसात चिंब करतात. दरम्यान, लतादीदींनी एकल गीते गातानाच युगूल गीतेही गायली. त्या त्या काळातील प्रसिद्ध पुरुष गायकांबरोबर लतादीदींनी गायलेली हजारो गाणी लोकप्रिय झाली. लता-रफी, लता-किशोर, लता-तलत, लता-हेमंत कुमार, लता-मन्ना डे, लता-उदित नारायण, लता-कुमार सानू अशा एकाहून एक गायकांसोबत लतादीदींनी गाणी गायली. लतादीदी तब्बल आठ दशके मराठीसह हिंदी, बंगाली भाषांमध्ये गात राहिल्या आणि रसिकांनी त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले. जुन्या काळात मिळणार्या रेडिओ, कॅसेट्स, सीडी प्लेअरवर तर लतादीदींची गाणी ऐकली गेलीच, पण नव्या काळात युट्यूब, मोबाईल अॅपसारखी नवी माध्यमेही आली. त्यातही लतादीदींच्या गाण्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. इंटरनेट आणि वेगवेगळ्या ऑडिओ स्ट्रिमिंग अॅप्सवर लतादीदींना ऐकणारा चाहतावर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे, या नवमाध्यमांचा वापर करणार्यांत युवा वर्ग सर्वात आघाडीवर आहे. पण त्यांनाही लतादीदींची गाणी ऐकल्यावाचून राहवत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजेच, वय कोणतेही असो लतादीदींचा आवाज, लतादीदींनी गायलेली गाणी चिरतरुण असल्याचे दिसते. दरम्यान, लतादीदींची देदीप्यमान, दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक सन्मानाने झळाळणारी कारकिर्द पाहता त्यांनी बाबुजी अर्थात सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात गायलेले ‘ज्योति कलश छलके’ गीत समर्पक ठरते.
घर आंगन वन उपवन उपवन
करती ज्योति अमृत के सींचन
मंगल घट ढल के
ज्योति कलश छलके...
लता मंगेशकरांचा अद्भुत स्वर वरील गीताप्रमाणेच अमृताचे सिंचन करत आला. आज त्या नश्वर देहाचा त्याग करुन या जगातून गेल्या असल्या, तरी त्यांनी गायलेल्या गीतांच्या ज्योती नेहमीच तेवत राहतील, हेच यातून स्पष्ट होते. लतादीदींना दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली!