भारताबाहेरील मराठी मंडळींनी, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ‘जीएमबीएफ ग्लोबल!’ मराठी बांधवांना आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा, त्यांचाही व्यवसाय वाढावा, त्यासाठी मराठी माणसाला माहिती देण्यासाठी, अडचणीत मदत करण्यासाठी, दुबईमधील मराठी उद्योजकांनी ‘जीएमबीएफ ग्लोबल’ संस्थेची स्थापना केली. संस्थेचे कार्य दुबई येथून नियंत्रित होते. ‘जीएमबीएफ ग्लोबल’ अर्थात ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’ या संस्थेविषयी थोडसं...
डॉ. सुनील मांजरेकर हे विस्तारित दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’(जीएमबीएफ ग्लोबल) संस्थेचे अध्यक्षपद भूषवित आहेत, तर संस्थेचे महासचिव म्हणून विवेक कोल्हटकर त्यांना भक्कम साथ देत आहेत. राहुल तुळपुळे तसेच, चिरंतन जोशी संस्थेच्या उपाध्यक्षपदी राहून संस्थेचा वटवृक्ष आणखी मोठा कसा करता येईल, यासाठी झटत आहेत. यांना साथ देण्यासाठी दिलीप खेडेकर, अशोक सावंत, दिलावर दलवाई, विष्णू राऊत, महेश शुक्ला आणि माझे बंधुतुल्य परममित्र प्रसाद दातार वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत. ‘कोविड’ काळात माणसं नोकरी गमावून अक्षरशः रस्त्यावर भुकेली फिरत होती. आपल्यातर्फे आपण अशा लोकांना जेवण दिलं. ज्यांच्या नोकर्या गेल्या होत्या त्यांच्याकडून आपण जेवणाचे डबे बनवून घेतले, त्यांना व्यवसाय दिला. या काळात अक्षरशः रोज एक हजार लोकांना आपण जवळपास दीड वर्षे जेवण देत होतो. हे सहस्र भोजन रोज घालायला आपल्याला मदत करणारा भक्कम मराठी हात म्हणजे ‘जीएमबीएफ ग्लोबल!’ मी या सर्वांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही. मलाही त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल.
याच संस्थेचा आणखी एक समाजोपयोगी उपक्रम म्हणजे दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘महाबिझ’ (Mahabiz) हा उपक्रम! थोडक्यात, व्यापारी परिषद. यात जगातील जवळपास १५ देशांतील उद्योजक सहभागी होतात. ज्या मराठी माणसाला व्यवसायात उतरून मोठी झेप घ्यायची आहे, अशा मराठी माणसांसाठी ही एक खूप मोठी संधी असते. या परिषदेमध्ये फक्त बिझनेस बिझनेस न खेळता इथे जमलेली सर्व मंडळी सहृदयपणे माणसांच्या हितासाठी आणखी समाजोपयोगी काय काम करता येईल, याचासुद्धा विचार करत असतात. वर्षभरात त्याप्रमाणे नियोजन करून ही संस्था अनेक समाजोपयोगी काम करत असते. देशातील ज्या मराठी माणसांनी समाजाच्या हितासाठी काही काम केलं असेल, त्यांना स्वखर्चाने दुबईमध्ये ‘महाबिझ’ या परिषदेमध्ये बोलावून संस्था त्यांचा सन्मान करते. पुरस्कार देते. पाठीवर हात ठेवते. ऑक्टोबर २०२१ या महिन्यातील, एका वारी प्रसाद दातार हे माझे स्नेही, दुबईहून प्रत्यक्ष भारतात येऊन भेटले आणि म्हणाले, “ ‘महाबिझ २०२२’ ला होणार्या पुरस्कार सोहळ्यासाठी, तेथील आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी आम्ही तुमचे नाव निश्चित केले आहे. सर्व खर्च आमचा. तुम्ही आणि डॉ. मनीषा, दोघांनी फक्त १६ ते २१ फेब्रुवारी वेळ काढायचा.”
ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळी आम्ही पोहोचलो दुबईमध्ये. पहिले दोन दिवस स्वतंत्र कार आणि शोफर देऊन प्रसाद दातार यांच्या माध्यमातून संपूर्ण दुबई पहिली. समुद्रात स्वतंत्र क्रूझ आम्हाला फिरण्यासाठी दिली होती. येथील चमकदमक पाहून डोळे दीपून गेले. परंतु, त्याहीपेक्षा डोळे दीपले ते इथल्या ‘जीएमबीएफ ग्लोबल’च्या मराठी माणसांच्या प्रेमळ, अगत्यशील, आदरातिथ्यामुळे. पुरस्काराचा दिवस उजाडला. दि. १९ फेब्रुवारी, २०२२. ज्या महाराजांनी तळागाळातल्या पीडितांचे दुःख आधी जाणले, त्यांच्याच जयंती दिवशी, त्यांच्याच महाराष्ट्रातल्या एका सामान्य मावळ्याचा, परदेशात आंतरराष्ट्रीय सन्मान व्हावा, हा निव्वळ योगायोग असेलही, मी त्याला महाराजांचा आशीर्वाद समजतो! कार्यक्रम ठरला होता, ’Hotel Grand Hayatt’ या सप्त तारांकित हॉटेलमध्ये. सप्ततारांकित हॉटेल, तेही दुबई मधलं. आम्हाला आमच्या खुर्च्यांवर सन्मानाने बसवण्यात आलं.
आलिशान स्टेजवर दुबईमधील राजेशाही घराण्यातील मंडळी आणि तेथील मंत्री उपस्थित होते. यांच्याच हस्ते आज आम्हाला पुरस्कार मिळणार होता. ज्यांना आपण ‘अरब’ म्हणतो तीच ही मंडळी. मी संपूर्ण स्टेज न्याहाळत होतो. एकेकाळच्या ‘मिस इंडिया’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होत्या. कार्यक्रमाला देश-विदेशातले अनेक प्रतिनिधी आले होते. माझी नजर भिरभिरत होती. कार्यक्रमाला ‘ईशा फाऊंडेशन’चे श्री सद्गुरू येणार होते. भारतातील सर्व ‘अक्षरधाम मंदिरां’चे प्रमुख श्री ब्रह्मविहारी स्वामी येणार होते. भारतातून खा. नितीन गडकरी, खा. विश्वजित कदम, याव्यतिरिक्त दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीमधील इतर अनेक राजे, मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तसेच अनेक देशातील मोठी मोठी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. इतक्यात, ‘मिस इंडिया’ सूत्रसंचालकांनी घोषणा केली, “आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला हार घालून केले जाईल.” पांढर्या झग्यातील हे अरब लोक मग समोर आले, त्यांनी महाराजांना हार घातला आणि ते नतमस्तक झाले. अरबांच्याच देशात जाऊन अरब लोकांच्याच हॉटेलमध्ये त्यांच्याच स्टेजवर या अरब लोकांना आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकायला लावणारं हे ‘जीएमबीएफ ग्लोबल’ नावाचं मराठी वादळ! हा फोटो बंदिस्त करण्यासाठी मी माझ्या जागेवरून स्टेजकडे अक्षरशः पळत सुटलो. तेथील ‘प्रोटोकॉल’च्या विरुद्ध होतं हे. लोक वेड्यासारखे माझ्याकडे पाहत होते. मला पर्वा नव्हती. फोटो काढून मी माझ्या जागेवर येऊन बसलो. पण ‘काय बावळट माणूस आहे हा’ अशीच तेथील प्रत्येकाची नजर होती.
‘आता राष्ट्रगीतासाठी उठून उभे राहा’ असा सूत्रसंचालिकेचा प्रेमळ आदेश आला आणि स्पीकरवर आवाज आला... ‘जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता...’ राष्ट्रगीताच्या पहिल्या चारच शब्दांनी खुर्चीचा आधार सुटला. मान ताठ झाली. कणा ताठ झाला. हाताच्या मुठी वळल्या गेल्या. पावलं आपोआप सावधान झाली. नजर आकाशात गेली आणि जीवाच्या आकांताने ओरडलो ‘भारतमाता की जय!’ मराठी माणसाची, एका भारतीयाची अस्मिता परदेशातही उंचावणार्या ‘जीएमबीएफ ग्लोबल’ला माझा मानाचा मुजरा! यानंतर अरब देशाच्या राज्यकर्त्यांकडून मी आणि डॉ. मनीषाने पुरस्कार घेतला. हा पुरस्कार होता महाराजांच्या मावळ्यांना! २० तारखेला परतीच्या प्रवासासाठी शारजाह येथे विमानतळावर आलो. शारजाहच्या विमानतळावर मी मोठ्या दिमाखात फिरत होतो, पण तेथील साध्यातली साधी गोष्टसुद्धा ५० दिरहामच्या वर होती. असाच शारजाह विमानतळावर फिरत फिरत एका ड्रायफ्रूटच्या दुकानात गेलो. बहुदा तेथील ‘लंच टाईम’ झाला असावा. याशिवाय प्रवासीसुद्धा अगदी कमी होते. दुकानात कोणीच नव्हतं.
हे सर्व सुरू असताना, त्याच दुकानामध्ये एक मळकट झब्बा कुर्ता घातलेले, दाढी वाढलेले एक गृहस्थ आत आले आणि मला म्हणाले, ‘’मिया, ड्रायफ्रूट क्या रेट हैं?” ते मला म्हणाले, “मिया, ऐसे देखते क्या हो? ड्रायफ्रूट का रेट बताओ भाई!” ते बहुतेक मला ‘सेल्समेन’ समजत होते. मलाही भरपूर वेळ होता. गंमत करायची लहर आली. आधीच पाहून ठेवलेल्या पाकिटांचे रेट मी त्यांना सांगितले. “अजी इतना मेहंगा क्यू हैं?” मलाही त्यांना हेच सांगायचं होतं, “कुछ १०-१५ दिरहाम वाला बताओ जी।” ते म्हणाले. खरंतर मीसुद्धा १०-१५ दिरहाममध्ये काही मिळते का, तेच बघायला आलो होतो. मी दुकानातली पाकिटे वरखाली करून १०-१५ दिरहामला काही सापडते का, ते बघायला लागलो. पण मला काही सापडेना! “नया जॉब मिला हैं क्या मिया?” ते म्हणाले. कसनुसा हसत मी “हो” म्हणालो. “इंडियन लगते हो।” ते म्हणाले. “जी, आपको कैसे पता चला?” मी बावचळून विचारलं. ‘’मिया दुबई में नौकरी जो कर रहे हो।” ते उद्गारले. “मैं कुछ समझा नही भाई साब...” मी बोललो. “अजी, अब कैसे समझाऊ मिया। तुम हिंदुस्तानीयोंको तो नौकरी झट से मिल जाती हैं। हम पाकिस्तानी। हमको तो जल्दी से नौकरी कही नही मिलती।” “मतलब?” मी वेड्यागत तोंड करून विचारलं. ’‘अरे भाई, हम पाकिस्तान से हैं। हमारी मुल्क में कुछ लोग ऐसे हैं जो कुछ गैर कानुनी काम करते हैं, इस वजह से पुरे पाकिस्तान की तरफ गलत नजर से देखा जाता हैं, लेकिन यकिन मानो मिया, हर पाकिस्तानी ऐसा नही हैं।” प्रत्यक्ष पाकिस्तानी बंदा माझ्यासमोर होता. मी बरा त्याला असा जाऊ देईन ? सवयीप्रमाणे मी त्याला छेडत गेलो. पेशावर, पाकिस्तानमध्ये तो छोटं-मोठं काम करायचा. घरात वृद्ध आई-वडील, बायको आणि तीन लहान मुलं होती. ‘कोविड’ काळात नोकरी गेली. घरादाराला जगवण्यासाठी जमीन विकली. एकाने त्याला सांगितलं, “दुबईमध्ये नोकरी देतो, इतके इतके पैसे लागतील.” त्याने राहतं घर विकून पैसे जमवले.
विमानाने दुबईला आला, इथे आल्यानंतर तो फसवला गेला. परत जाण्यासाठीसुद्धा पैसे उरले नाहीत. विसा संपत चालला. आता अटक! दुबईत एका गृहस्थांच्या तो पाया पडला. त्यांना झालेली हकिकत सांगितली. दुबईच्या त्या गृहस्थांनी याचे विमानाचे तिकीट काढून वर २० दिरहाम खर्चासाठी दिले. त्याने मला खाली मानेने सांगितले, “जिसने फसाया वो हमारा पाकिस्तानी था।” पण वर मान करून म्हणाला, “लेकीन दुबई में जीस खुदा के बंदे ने, बिना जान पहचान हमारी मदद की वो तो हिंदुस्थानी था! आप लोग ऐसे हो, इस लिये आपको हर जगह सन्मान मिलता हैं, लेकीन हमारे कौम मेंही कुछ लोग ऐसे काम करते हैं, जो असली पाकिस्तानीयोंको नीचा दिखाते हैं। लेकीन मैं कहना चाहुंगा, आप जैसे समजते हो, हर पाकिस्तानी ऐसा नही होता। बिल्कुल नही होता।” तो जीव तोडून सांगत होता. हे ऐकून मी अवाक झालो. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. पुढे तो म्हणाला, “आपके देश का राजा तो सिवाजी था। कल उनका जनमदिन था। हमारे पाकिस्तान के व्हॉट्सअॅप पे भी उनकी सन्मान में बहुत सारी चीजे आई थी। हमने वो पढी। आपको ऐसा राजा मिला इसलिये शायद हर हिंदुस्तानी इमानदार होता हैं।” हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आणि तितक्यात या दुकानातली सेल्स गर्ल आली. “मे आय हेल्प यू सर?”या बाईने आमच्या या संवादाला कात्री लावली. पाकिस्तानी बंधूचा आणि माझा हा सर्व संवाद पाच-सात मिनिटांचा, पण असं वाटलं युगा-युगाचा. दुबईत जाण्याअगोदर ‘बुर्ज खलिफा’ नावाची इमारत जगातली सर्वात उंच इमारत आहे, असा माझा गैरसमज होता. दुबईला जाऊन आल्यानंतर हा गैरसमज पूर्णपणे कोसळला. हिंदुस्थानी माणसाच्या मान सन्माना इतकं या जगात उंच काहीच नाही.
- डॉ. अभिजीत सोनवणे
abhisoham17@gmail.com