प्रेम एकालाप नहीं, संवाद हैं!

    22-Feb-2022
Total Views |

love 
 
 
 
दोन माणसांत जर प्रामाणिकपणा असेल, आदर असेल, जिव्हाळा असेल, तर प्रेमाची परी कुठेच जात नाही. प्रेम आयुष्यातील अनेक किचकट समस्यांचे उत्तर आहे. जितकं वाटतं तितकं प्रेम कुठल्याही प्रकारचं असो, वा कुणासाठीही असो ते अद्भुत अपरिचित वा प्रवाही नाही, ते आपुलकीत, जाणिवेत, अनुभूतीत आणि सदिच्छेत आहे. रजनीश ओशोंनी वर्णिल्याप्रमाणे ‘प्रेम एक एकालाप नहीं एक संवाद हैं। एक बहुत सांमजस्यपूर्ण संवाद...!’
 
 
 
‘तेरे घर के सामने’ या देव आनंद-नूतनच्या प्रसिद्ध चित्रपटात हसरत जयपुरी यांनी लिहिलेल्या ‘एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने’ या गाण्यात ‘उल्फत में ताज छुटे, ये भी तुम्ही याद होगा, उल्फत मे ताज बने, ये भी तुम्हे याद होगा’ हे शब्द आपण ऐकले आहेत आणि इतिहासात असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. या प्रेमाचे अनेक प्रकार संशोधकांनी मानसशास्त्रात वर्णिले आहेत. रॉबर्ट स्टनबर्ग यांनी जो सिद्धांत मांडला आहे, त्यानुसार आत्मियता किंवा जीवलग मैत्री, आर्तता वा आवेग आणि भावनिक बांधिलकी या तीन घटकांच्या बेरीज वजाबाकीतून प्रेमाचे प्रकार घनिष्ट नात्यांमध्ये दिसून येतात, सर्वसामान्य माणसांना ते सहज समजूही शकतात.
 
 
१) स्वारस्य प्रेम : या प्रेमात आत्मियता असते. जवळीक असते. बुद्धी, कला यासारख्या अभिरुचींमुळे हे प्रेम जुळते. स्त्री-पुरुषांमध्ये असे प्रेम असते, तेव्हा ते ‘रोमँटिक’ नसेल, यावर लोकांचा विश्वास बसत नाही, पण असं विशुद्ध प्रेम असतं.
 
 
२) मोहक प्रेम : पहिल्या नजरेत घडत जाणारे हे प्रेम भावनाप्रवण असते. यात तीव्र आर्तता असते, पण आत्मियता वा बांधिलकी असत नाही, भुरळ असते. त्यात चांद-तारे असतात, दिवाने-मस्ताने असतात, ते प्रेम ‘हर खुशी से हर गम से बेगाना होता हैं।’

३) रिते प्रेम : ‘तोच चंद्रमा नभात’ या गाण्यात शांता शेळकेबाईंनी असं प्रेम सुंदर शब्दांत रेखाटलं आहे.
 
सारे जरी ते तसेच,
धुंदी आज ती कुठे?
मीही तोच, तीच तूही,
प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात,
स्वप्न ते न लोचनी...
 
या प्रेमात भावनिक बांधिलकी असली, तरी आत्मियता आणि आवेग ओसरलेला असतो. बर्‍याच वेळा आपण अशी यंत्रवत प्रेम जगणारी दम्पत्ती पाहतो.
 
 
४) अनुरागी प्रेम : यात जीवलग मैत्र आणि अधीर मन यांचा सुंदर संगम दिसून येतो. तन आणि मन या प्रेमात व्यक्त होत राहते. रफी यांनी गायलेले एक सुंदर गाणं - ‘बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया हैं’ याचं सुंदर उदाहरण आहे. हे बहुधा प्रितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येतं.
 
 
५) साहचर्य प्रेम : हे प्रेम दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात राहिल्याने निर्माण होते. यात आत्मियता असते, बांधिलकी असते, ममत्व असते, विश्वास असतो, आस्था असते, चिंता असते. यात धुंदी वा प्रणयाधीरता नसते. कवी दासू यांच्या ‘हात हाती हा विश्वासाचा, अर्थ सांगतो सहवासाचा’ या ओळी समर्पक वाटतात.
 
 
६) जुजबी प्रेम : या प्रेमात अधीरता खूप असते, आकर्षण असते, काही प्रमाणात बांधिलकी असू शकते, पण यात आत्मियता किंवा जिव्हाळा नसतो. त्यामुळे हे प्रेम अनेकदा नैसर्गिक वाटत नाही. पाहणार्‍या लोकांनासुद्धा या प्रेमात काहीतरी खटकत राहतं.
 
 
७) बृहत प्रेम : हे सर्वगुणसंपन्न प्रेम आहे. आत्मीयता, आर्तता आणि बांधिलकी याचा उत्तम संयोग या प्रेमात असतो. पण हे प्रेम टिकवण्यासाठी दोघांनाही परिश्रम घ्यावे लागतात. या प्रेमात परिपूर्णता असते. अशा प्रेमात पडू शकू, अशी कल्पना दूरवरुनसुद्धा करू शकत नाहीत. शिवाय एकमेकांशिवाय प्रेमाचा सूरही आळवू शकत नाहीत. कितीही कठीण परिस्थिती असो, अशा व्यक्ती एकमेकांना सोडत नाहीत. खर्‍या अर्थाने त्या ‘एक दुजे के लिये’ असतात.


८) शून्य प्रेम : यात प्रेमाचे कुठलेही घटक नसतात. मुळात प्रेमच नसते, ना जिव्हाळा, ना आर्तता, ना बांधिलकी. हे मुळात नसतेच. अर्थात, या त्रिकोणी सिद्धांत रुपकात्मकदृष्ट्या समजण्यासारख्या आहेत. तरीसुद्धा सगळ्याच प्रेमाच्या नात्यात जसे की, अपत्य प्रेम, मैत्रीचे प्रेम, दम्पती प्रेम, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम यामध्ये समतोलपणा वेगवेगळा असू शकतो. मैत्रीच्या नात्यात आत्मियता व भावबंध महत्त्वाचे असतात. प्रणयप्रेमात अधीरता आणि शारीरिक आकर्षण अधिक तीव्र असते. आपण मीरेचं प्रेम पाहिलं आहे. ‘मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई’ हे भक्तीचे प्रेम आहे. ते अवीट आहे आणि दैवी अनुभूतीचे प्रेम आहे.
 
 
 
प्रेमाचा जो घटक कमी पडतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रेमभाव कमी झाला आहे वा आयुष्य रुक्ष, रटाळ आणि कोरडे वाटले, त्या दाम्पत्यांनी आपल्या प्रेमाकडे थोडं गंभीरपणे व बारकाईने पाहायला हवे. प्रेमीयुगुलांनी आणि अतूट भावबंध असलेल्या मैत्रीतूनसुद्धा प्रेम का कमी झाले आहे, याचं अवलोकन करायला हवे. बर्‍याच वेळा प्रेमातली आर्तता व धुंदी कमी झाली की, ते प्रेम पोकळ व रसहीन वाटायला लागतं. काहींना असं वाटतं की, प्रेम एकदा संपलं की, ते पुन्हा परत मिळत नाही. पण, ते खरं नाही. कारण, जेव्हा ते निर्माण झालं तेव्हा ते त्या प्रेमात असणार्‍या मंडळींच्या मनातूनच निर्माण झालेलं असतं. त्याची एक पार्श्वभूमी असते, ती जर दुबळी-विकल नसेल, तर प्रेम पुन्हा जागवता येते. दोन माणसांत जर प्रामाणिकपणा असेल, आदर असेल, जिव्हाळा असेल, तर प्रेमाची परी कुठेच जात नाही. प्रेम आयुष्यातील अनेक किचकट समस्यांचे उत्तर आहे. जितकं वाटतं तितकं प्रेम कुठल्याही प्रकारचं असो, वा कुणासाठीही असो ते अद्भुत अपरिचित वा प्रवाही नाही, ते आपुलकीत, जाणिवेत, अनुभूतीत आणि सदिच्छेत आहे. रजनीश ओशोंनी वर्णिल्याप्रमाणे ‘प्रेम एक एकालाप नहीं एक संवाद हैं। एक बहुत सांमजस्यपूर्ण संवाद...!’
 
 
- डॉ. शुभांगी पारकर