मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे रुळांना लागून असलेल्या अनधिकृत झोपड्यांचा रेल्वेला मोठा धोकाअसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षा क्षेत्रात( सेफ्टी झोन ) मध्ये तब्बल ४ हजार ४९४ अनधिकृत झोपड्या आहेत. त्या झोपड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चूल, गॅस इ. ज्वलनशील पदार्थांमुळे रेल्वेला धोका उत्पन्न होऊ शकतो व भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते असे रेल्वेचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेवर कुर्ल्यावरून जाणाऱ्या हार्बर मार्गाला लागून राजीव गांधी नगर परिसरात सर्वाधिक २ हजार ५० झोपड्या आहेत. भायखळ्यातील संजय गांधी नगर मध्ये ८०० झोपड्या आहेत. यानंतर डॉकयार्ड रोड, सँडहर्स्ट रोड, कुर्ला- सीएसटी मार्ग, डोंबिवली अशा सर्व मिळून पावणेअकरा हेक्टर वर सुमारे ४००० झोपड्या आहेत. पश्चिम रेल्वेवरीळ सुरक्षा क्षेत्रात सुद्धा ४९४ झोपड्या वसलेल्या आहेत.
"स्थानिक राजकारण्यांशी संगनमत करून या झोपड्या उभ्या राहतात. यामुळे रेल्वेने या झोपड्यांवर कारवाई सुरु केली तर हे हे राजकारणी निव्वळ मतपेटीच्या राजकारणासाठी या झोपड्यांवरील कारवाई थांबवतात. यांना याच राजकारण्यांमुळे महापालिकेकडून नळ- वीज जोडणी सुद्धा मिळते. या सर्व गोष्टींमुळे या झोपड्यांवर कारवाई करणे कठीण होऊन बसते." असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या झोपडयांचा प्रश्न मार्गी न लागल्यास ते भविष्यातील मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण ठरू शकते आणि तो रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असेल असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.