मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या नवीन प्रभाग पुनर्रचनेच्या आराखड्यावर १०० हरकती सूचना आत्तापर्यंत आल्या आहेत. यामध्ये दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्यामुळे काही आक्षेप तर प्रभागांच्या सीमा विभागणीविषयी मतेही देण्यात आली आहेत. परंतु अजूनपर्यंत संपूर्ण प्रभाग रचनेविषयी आक्षेपार्ह सूचना, मते, हरकती घेण्यात आलेल्या नाहीत.
पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणारे विविध पक्षांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उमेदवार इत्यादींचा समावेश तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये आहे. पालिकेच्या नवीन प्रभाग रचनेनुसार आधीच्या प्रभागांमध्ये आता ९ प्रभागांची भर पडल्यामुळे आत २३६ प्रभाग तयार झाले आहेत. आणि याच प्रभाग रचनेवरून पालिकेने मुंबईकरांकडून हरकती, सूचना मागवल्या होत्या. मागील १० दिवसांत १०,००० हरकती, सूचनांची नोंद झाली असून अंतिम मुदतीस केवळ ४ शिलक्क आहेत.
झोपडपट्टी भागाची विभागणी, रस्त्यांचे बदल, पूर्वीच्या रचनेतील बदल इत्यादींवर हरकती - सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. पालिकेकडे आलेल्या सूचना - हरकती राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात येणार असून यावर वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, दोन्ही उपनगर जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त इत्यादी अधिकाऱ्यांच्या समितीकडून ४ मार्च रोजी यावर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.