मी बोलेन तेव्हा अनेकांना ब्लर्ड प्रेशरचा त्रास होईल! : नितेश राणे
10-Feb-2022
Total Views | 61
सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा दाखविण्यास सुरुवात केली. नितेश राणेंनी पहिल्याच दिवशी राणे पॅटर्नची चुणूक दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. ज्यावेळी मी बोलेन तेव्हा अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल, असेही राणे म्हणाले.
भाजप आमदार नितेश राणे यांना ९ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर झाला. त्यानंतर कोल्हापुरच्या राजर्षी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवार, दि. १० फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना, '"हे सरकार मला अजूनही अटक करू शकलं नाही!', असं म्हणत राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की; "१८ डिसेंबर पासून ते आजपर्यंत पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती देऊन मी त्यांना मदत करत आलोय. यापूर्वीही सगळ्या तपासकार्यात सातत्याने मदत करत होतो. तशीच मदत यापुढेही होईल. न्यायालयाने सांगितलेल्या अटींचे पालन करून त्यांना मी कालही मदत केलेली, आजही करणार आणि पुढेही करत राहणार आहे. मी कुठल्याही तपासकार्यातून लांब गेलो नव्हतो. कुठल्याही तपासकार्यात मी माहिती लपवलेली नाही."
"ज्यादिवशी मी न्यायालयापुढे शरण आलो; त्यावेळी असे लक्षात आले की, पुढचे आणखी चार दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण होतं. सिंधुदुर्गच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको, कायदा-सुव्यवस्था कुठेही भंग होऊ नये म्हणून मी स्वतः न्यायालयाला शरण आलो. हे सरकार मला अजूनही अटक करू शकलेलं नाही."
"एखाद्या व्यक्तीच्या आजाराला खोटं समजून त्याला राजकीय आजाराची भूमिका देणं हे चूकीचं आहे. याबाबतीत प्रश्न विचारायचे असतील तर आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, ईडीच्या कारवाया सुरू होतात किंवा अधिवेशन सुरु होतं तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात पट्टा का घालतात? मविआच्या नेत्यांवर ईडीच्या चौकशीची वेळ येते, तेव्हाच त्यांना कोरोना कसा होतो? असे प्रश्न आम्ही विचारले तर चालतील का? कोणाच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे नैतिकतेच्या चौकटीत बसतं का? यावरून राजकारणाचं स्तर किती खालावू शकतं; यावर सगळ्यांनी आता विचार करण्याची वेळ आहे.", अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.