नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी लोकसभेत २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. येत्या तीन वर्षात ४०० 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 'प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय या योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च मंजूर करण्यात आला. याने वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार असून प्रवासाची वेळ कमी होणार आहे.', असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. यामुळे इंधनाचा खर्चही वाचणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
यासोबतच अर्थमंत्र्यांनी चार प्राधान्यक्रमही निश्चित केले आहेत. येत्या ३ वर्षांत १०० 'पीएम गति शक्ती' कार्गो टर्मिनल विकसित केले जाणार असून देशात मेट्रोचं जाळं विस्तारणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.
"भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करत आहे. मात्र या परिस्थितीतसुध्दा भारतानं कोरोनो महासाथीच्या आव्हानांचा चांगला सामना केला. भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील २५ वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. यावरून देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर लक्षकेंद्रीत केलं जाईल.", असंही त्या म्हणाल्या.
काय आहे 'वंदे भारत एक्स्प्रेस'?
भारताची सेमी हायस्पीड ट्रेन 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला ओळखले जाते. 'मेक इन इंडिया' अंतर्गत १८ महिन्यात १०० कोटी खर्चून या सेमी हायस्पीड ट्रेनची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात यश आले. चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये या एक्स्प्रेसची निर्मिती करण्यात आली. 'वंदे भारत एक्सप्रेस' ही प्रति ताशी १३० किमी वेगाने चालते. फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आली.