कोरोना महामारीचा फैलाव जगभरात सुरु झाल्यापासून साधा ताप जरी आला तरी लोकांना धास्ती वाटू लागली. तसेच डॉक्टरच्या पातळीवरही हल्ली 'आरटीपीसीआर' चाचणीचा सल्ला दिला जातो. या पार्श्वभूमीवर डेंग्यू हादेखील 'व्हायरल' साथीचा आजार आहे व तो दुर्लक्ष केल्यास प्राणघातक ठरू शकतो, याचा आम्हाला विसर पडला. त्याविषयी...
आधुनिक वैद्यकशास्त्रात ताप येण्याची अनेक कारणे दिली आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे साथीचे आजार. मलेरिया, डेंग्यू, कोरोना, चिकनगुनिया, गोवर, कांजिण्या, गालगुंड, रुबेला, कावीळ या सर्वच आजारांची सुरुवात तापाने होते. या प्राथमिक लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास किंवा त्याचा उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने न केल्यास, या आजारांमध्ये गुंतागुंत निर्माण होते व प्रकृती गंभीर होण्याचा धोका निर्माण होतो.गेली दोन वर्षे आपण सर्व कोरोना महामारीच्या संकटाशी झुंजतो आहे. या दोन वर्षांत कुठल्याही कारणाने ताप आल्यास कोरोनाची शंका रुग्णाच्या मनात आधी येत होती. ताप अंगावर काढणे, 'केमिस्ट'मधून औषध घेऊन स्वत: उपचार करणे, घरात औषधाचा जुना डोस असेल तर तो घेऊन वेळ मारून नेणे, मित्राला डॉक्टरांनी लिहून दिलेले कोरोनाचे औषध कुठलीही चाचणी न करता घेणे व आराम न करणे, या सर्व गोष्टींमुळे काही रुग्णांमध्ये आजार बळावतो व पुढे गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागते. गेली दोन वर्षे कोरोना महामारीने प्रचंड दहशत निर्माण केली होती.
'आरटीपीसीआर' टेस्ट, 'क्वारंन्टाईन', 'आयसीयु', 'व्हेंटिलेटर', 'ऑक्सिजन' याच गोष्टींची भीती तापाच्या रुग्णांच्या मनात असायची. आपला ताप हा कोरोनाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे असू शकतो व त्यासाठी चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेतला, तर या सर्व भीतींतून त्याची मुक्ततात होऊ शकते, याबद्दल तो साशंक होता. या काळामध्ये डॉक्टरांची उपलब्धीदेखील कठीण झाली होती. माध्यमांच्या प्रभावामुळे आणि हा झपाट्याने पसरणारा आजार असल्यामुळे 'सोशल डिस्टन्सिंग', 'पीपीई किट' घालणे रुग्णांशी लांबून बोलणे, त्याला सहसा हात न लावणे इत्यादी अनेक बंधने डॉक्टरांवर आली. त्यामुळे ताप नेमका कुठल्या आजारामुळे आहे, हे कळणे कठीण होऊन गेले. साथीच्या सुरुवातीच्या काळात 'फॅमिली डॉक्टर'ने तापाचे रुग्ण तपासू नये, असे धोरण ठरविण्यात आले. भारतातील शहरी व ग्रामीण भागातील तापाच्या रुग्णांच्या ९० टक्के रुग्णांचे उपचार 'फॅमिली डॉक्टर' किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत केला जातो. या दोघांनाही तापाचे रुग्ण 'कोविड सेंटर'ला पाठविण्याचे सांगण्यात आले. या सर्वांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ लागले. चांगली 'हिस्ट्री' घेऊन व्यवस्थित तपासणी करुन व जरुर पडल्यास जुजबी प्राथमिक चाचण्या करुन तापाच्या आजाराचे निदान करुन त्याप्रमाणे उपचार करणे दुर्मीळ झाले. प्रत्येक तापाचा रुग्ण हा कोरोनाचा संभाव्य रुग्ण म्हणून समजण्यात येऊ लागला. त्यास 'आरटीपीसीआर' टेस्ट करणे क्रमप्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर डेंग्यू हादेखील 'व्हायरल' साथीचा आजार आहे व तो दुर्लक्ष केल्यास प्राणघातक ठरू शकतो, याचा आम्हाला विसर पडला. २०१४ साली पावसाळ्यात डेंग्यूची साथ सुरू झाली. अनेक रुग्णांचे त्यात निधन झाले. यात बऱ्याच तरुण रुग्णांचादेखील समावेश होता. पावसाळा संपला, पण डेंग्यूची साथ संपली नाही. त्याही वेळेस प्रत्येक तापाच्या रुग्णामध्ये डेंग्यूबद्दल प्रचंड भीती निर्माण झाली होती. डेंग्यू या आजाराचा थोडक्यात आढावा घेऊया.
डेंग्यू हा 'फ्लॅवी व्हायरस'मुळे होणारा साथीचा आजार आहे. या 'व्हायरस'चे चार मुख्य प्रकार आहेत. 'टाईप १, २, ३ आणि ४. एका प्रकारच्या 'व्हायरस'ने आजार झाल्यास उरलेल्या तीन प्रकारच्या 'व्हायरस'पासून संरक्षण न होता उलट दुसऱ्या 'व्हायरस'ची काही आठवड्यात लागण झाल्यास ती अधिक त्रासदायक ठरते. या 'व्हायरस'चा मनुष्याच्या शरीरात प्रवेश हा 'एडिस इजिप्ती' या डासाची मादी चावल्याने होतो. या डासांची उत्पत्ती ही सांडपाणी व तुंबलेले पाणी यावरच न होता ती स्वच्छ पाण्यावरही होते. घरातील फ्लॉवर पॉट, झाडांच्या कुंड्याखालील बश्या, पाण्याचा पिंप, पाण्याच्या टाक्या, टायरमध्ये साठलेले पाणी यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. हे डास दिवसा चावतात. शरीरात 'व्हायरस'चा प्रवेश झाल्यावर साधारणत: १० ते १४ दिवसांत लक्षणे दिसू लागतात.
डेंग्यूची लक्षणे
ताप येणे. ताप १०० डिग्री फॅरनहाईटच्या आसपास असतो. रुग्ण तापाच्या पहिल्या दिवशी डॉक्टरकडे आल्यास 'हिस्ट्री' आणि तपासणीवरुन तापाचे कारण शोधणे कठीण असते. पहिल्या दिवशी चाचण्या केल्या, तरी त्यातून निदान होण्याची शक्यता कमी असते. प्रथम दोन दिवसांची संपूर्ण विश्रांती हा सल्ला तापाच्या सर्व रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो, अगदी कोरोना आजारासाठीसुद्धा. यामुळे आजार पसरत नाही. 'व्हायरल' तापात पहिले दोन दिवस संपूर्ण विश्रांती म्हणजे अगदी ५० टक्के उपचार. तापासाठी डॉक्टरांनी दिलेल्या किंवा त्यांच्या सल्ल्याने गोळ्या घेणे. हलगर्जीपणा करू नये. पहिल्या दोन दिवसांत ताप जास्त असल्यास, थंडी भरुन येत असल्यास अनेक डॉक्टर 'क्लोरोक्विन'चा कोर्स देतात. या उपचाराचा फायदा म्हणजे ४८ तासांत दहा गोळ्यांचा कोर्स पूर्ण होतो आणि त्यानंतरही ताप उतरत नसेल किंवा इतर लक्षणे कमी होत नसतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जुजबी चाचण्या करुन घेता येतात.
इतर लक्षणे
डोके दुखणे, अंग दुखणे, अंगावर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, आजार बळावल्यास नाकातून रक्त येणे, लघवी लाल होणे. शौचातून रक्त जाणे, ही लक्षणे दिसतात.
लॅबोरेटरी चाचण्या
तापाच्या पहिल्या दोन दिवसांत शक्यतो चाचण्या करणे टाळणे, दोन दिवसांत ताप न उतरल्यास 'सीबीसी', 'एमपी', 'सीआरपी', 'युरीन' या चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्या. लक्षणे जास्त असल्यास डेंग्यूची 'एनएस-१' ही चाचणी करावी. आजाराच्या तीन ते सहा दिवसांत ही चाचणी 'पॉझिटिव्ह' येते. आजारास सहा दिवस होऊन गेले असतील व डेंग्यूची शंका येत असल्यास डेंग्यू 'आयजीएम' ही चाचणी करावी.डेंग्यूच्या रक्त तपासणीत 'हिमोग्लोबिन' वाढलेले आढळते, तर 'प्लेटलेट' या पेशींचे प्रमाण कमी झालेले असते. 'प्लेटलेट'चे प्रमाण फार कमी झालेले असेल, अंगावर पुरळ दिसत असेल किंवा गुंतागुंत वाढलेली दिसली, तर अशा रुग्णास रुग्णालयात भरती करण्यात येते. फक्त 'एनएस-१' किंवा 'आयजीएम' टेस्ट 'पॉझिटिव्ह' आहे आणि रुग्णाचा ताप उतरुन त्यास बरे वाटत असल्यास त्यास रुग्णालयात भरती करण्याची गरज नसते.
डेंग्यूच्या तीन अवस्था
पहिली अवस्था - एक ते तीन दिवस. तापात चढउतार होतो. ताप १०४ डिग्री फॅरनहाईटपर्यंत जातो. नाडीचे ठोके जलद होऊन ते १४० प्रतिमिनिटपर्यंत जातात. अंगावर लालसर पुरळ दिसू लागतात. रुग्णाच्या चेहऱ्यावर आजारपण (सिक लूक) दिसू लागतो.दुसरी अवस्था - तीन ते सहा दिवस. गुंतागुंत होण्याचा व आजार वाढण्याचा हा काळ आहे. व्यवस्थित लक्ष न दिल्यास या अवस्थेत आजार बळावतो. किडनी, लिव्हर फेल्युअर, शॉक, नाका-तोंडातून रक्त येणे यासारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या काळातील डॉक्टरांचा सल्ला टाळू नका.तिसरी अवस्था - सात ते दहा दिवस. रुग्णास बरे वाटू लागते, भूक वाढते. 'प्लेटलेट काऊंट' वाढू लागतो.उपचार - गुंतागुंत नसल्यास रुग्णास विश्रांती घेण्याचा सल्ला देऊन त्यावर घरी उपचार करणे सोयीचे असते. या काळात तापासाठी गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.
आहार
रुग्णास साधा घरगुती आहार द्यावा. उलट्या, जुलाब होत असल्यास फळांचा रस द्यावा. 'किवी' आणि 'ड्रॅगन फ्रूट' ही फळे हे आजार बरे होण्यास मदत करतात, असा समज आहे. पपईच्या पानाचा रस आयुर्वेदिक गोळ्यांच्या रुपात उपलब्ध आहे. त्याचादेखील काही डॉक्टर उपयोग करतात.
प्रतिबंधात्मक उपाय
या आजारावर लस उपलब्ध नाही. याविरुद्ध लस बनविण्याचा प्रयत्न झाला, पण तांत्रिक कारणांमुळे शास्त्रज्ञांना त्यात यश आले नाही. तोपर्यंत 'एडिस इजिप्ती' या डासांची उत्पत्ती थांबविणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे.पाण्याचा पिंप व टाक्या नियमित रिकाम्या करणे, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित करणे, फ्लॉवर पॉट, झाड्यांच्या कुंड्या इत्यादींमध्ये पाणी साठू न देणे, घरात व बाथरुममध्ये घरगुती कीटकनाशकांची नियमित फवारणी करणे.तापावर घरगुती उपाय करत बसू नये. पहिल्याच दिवशी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.डासांपासून प्रतिबंध करण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, 'मॉस्क्युटो रिपेंलंट' क्रिम लावणे, धूप, अगरबत्तीचा वापर करणे, 'हिट', 'गुडनाईट', 'मॉस्क्युटो कॉईल' इत्यादींचा उपयोग करणे.'लोक शिक्षण - स्वच्छ भारत अभियाना'ने अगदी कोरोनासह सर्वच साथीच्या रोगांवर आळा बसू शकेल. आपले घर, आपल्या घराच्या सभोवतालचा परिसर, सार्वजनिक शौचालये, आपले गाव स्वच्छ ठेवण्याची सवय लावा. आहारात ऋतूप्रमाणे योग्य बदल करा. नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार करा, मुख्य म्हणजे शरीर आणि मन स्वच्छ ठेवा. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येक भारतीयाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
- डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३