कल्याण : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता उ. बा. ठा. गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. "गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील, तर चांगली गोष्ट आहे. आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ वापरावा लागतो." असे त्या म्हणाल्या.
महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्वमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या आधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "सुडाचे राजकारण सुरु आहे. तुम्ही काही बोलला तर आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो. जसे कल्याणमध्ये अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. या पद्धतीचे राजकारण ते करू शकतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं आम्हाला फार काही वाटत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला