उत्स्फूर्त गीताने मंत्री मंगलप्रभात लोढांनी जिंकली शीख बांधवांची मने

    27-Dec-2022
Total Views |
 

उत्स्फूर्त गीताने मंत्री मंगलप्रभात लोढांनी जिंकली शीख बांधवांची मने
वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
नांदेड : अध्यात्म, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन याचा सुरेख संगम नांदेड जिल्ह्यात आहे. संपूर्ण विश्वाला आवश्यक असलेल्या शांतीचे प्रतीक म्हणून नांदेडच्या पवित्र भूमीकडे पाहिले जाते. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या माध्यमातून जो शांती व एकात्मतेचा संदेश दिला जातो तो अत्यंत मोलाचा आहे. येथील हे शक्तीस्थळ भक्तीसह विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसीत करण्यावर आपण सर्व मिळून भर देऊ, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
 
 
महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन रविवार, दि. २५ डिसेंबर रोजी गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभास पंजाब विधानसभेचे सभापती स. कुलतार सिंघ संधवान, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहनराव हंबर्डे, खासदार स. विक्रमजित सिंघ साहनी, उपसभापती जयकिसन सिंघ, आमदार कुलवंत सिंघ, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. माळवदे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, प्रविण साले, लड्डू सिंग महाजन आदींची उपस्थिती होती.
 
 
“अखंड हिंदुस्थान हीच आपली आहे. आपल्या इतिहासात जर डोकावून पाहिले तर आपल्या अखंडत्वाला वेळोवेळी तोडण्याचा इतिहास आपल्या लक्षात येईल. इथे राहणार्‍या सर्व धर्मांनी एकात्मता ठेऊन राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. आपली एकात्मता यातूनच देशाची अखंडता टिकून राहिली आहे. ही अखंडता टिकवून ठेवण्यासाठी शीख धर्माने याचबरोबर साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेहसिंघजी यांचे बलिदान देश कधी विसरणार नाही,” असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. देशाच्या अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले आहे तो इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचावा या उद्देश ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक बुलंद संदेश नांदेड येथून देण्यास प्रारंभ करतांना आम्हाला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
श्री गुरूगोविंदसिंगजी यांची ही पावन भूमी आहे. श्री गुरूगोविंदसिंगजी यांनी सदैव एकात्मतेवर भर दिला. त्यांनी सहिष्णुतेवर भर दिला. त्यांनी दिलेल्या या गुरूसंदेशाला विचारात घेऊन नांदेड हे विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसीत करण्यामध्ये पर्यटन विभागाने अधिक द्यावा, अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
 
 
यावेळी सेवानिवृत्त व्हाइस चान्सलर पंजाबी युनिव्हर्सिटी पटीयालाचे डॉ. स. जसपाल सिंग, पंजाब कला परिषदेचे अध्यक्ष स. सुरजीत सिंघ पातर, पंजाबी साहित्य अकॅडमीचे सेवानिवृत्त अध्यक्ष राजन खन्ना यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेसिंघजी यांच्या साहसाबद्दल माहिती दिली. श्री गुरूगोविंदसिंगजी यांनी धर्माचा अर्थ सत्य असल्याचे सांगितले आहे. सत्याचे पालन यातच संपूर्ण जगाच्या कल्याणाचा मार्ग असून भारताचा राष्ट्रवाद हा संताचा असल्याचे प्रतिपादन राजन खन्ना यांनी केले.
 
 
ज्या इतिहासावर आपण उभे आहोत तो इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. श्री गुरूगोविंदसिंगजी धर्मानुसार चालले म्हणून आपली अखंडता टिकून राहिल्याचे प्रतिपादन पंजाब विधानसभेचे सभापती कुलतारसिंघ संधवान यांनी केले. साहिबजादा बाबा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेसिंगजी हे येणार्‍या पिढीचे आयकॉन असल्याचे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी सांगितले.
 
 
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे बाल वीर दिवसानिमित्त दोन दिवस संपन्न होणार्‍या कार्यक्रमाची रुपरेषा सांगुन प्रास्ताविक माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंग पसरीचा यांनी केले.
 
 
जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व कौशल्य विकास विभागाबाबत पर्यटनमंत्री लोढा यांनी घेतली आढावा बैठकनांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्र यांचे महत्व लक्षात घेता यावर येत्या काळात अधिक भर दिला जाईल. रोजगार व स्वयंरोजागाराच्या संधी त्या-त्या पर्यटन तीर्थक्षेत्राच्या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात यादृष्टिने आमचे नियोजन सुरू आहे. पर्यटनक्षेत्राच्या विकास कामात लोकसहभागही तेवढाच महत्वाचा असतो. पर्यटनक्षेत्राच्या संदर्भात असणार्‍या ज्या सेवासुविधा लागतात त्यात कार्य करणारे हॉटेल, गाईडस्, पर्यटनाशी काम करणार्‍या सेवाभावी संस्था यांचा सहभाग तेवढाच आवश्यक असतो. हे लक्षात घेता जिल्हा पातळीवर पर्यटनाच्या विकासासंदर्भात अशासकीय सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार उपस्थित होते.
 
जिल्ह्यातील एकूण पर्यटनक्षेत्रापैकी प्राथमिक स्तरावर क दर्जाच्या १५ पर्यटनक्षेत्रावर प्राथमिक पायाभूत सुविधा विकसीत केल्या जातील, असे पर्यटन मंत्री लोढा यांनी जाहीर केले. होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद करून या ठिकाणी जनसुविधेच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा महोत्सव एप्रिल ऐवजी फेब्रुवारी महिन्यात घ्यावा या सूचनेचा त्यांनी स्विकार करून पर्यटन विभागाला निर्देश दिले. याचबरोबर जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र यांना जोडणारे एक सर्किट निर्माण करून विकासावर भर देऊ असेही त्यांनी सांगितले. शंभर किमी परिसरातील जेवढी पर्यटनस्थळे येतील, तीर्थक्षेत्र येतील त्याचा यात समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्यात पाच लाख बेरोजगारांना देऊ रोजगार
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी ग्रामीण पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने आम्ही भर देत आहोत. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना आयटीआय केंद्राच्या मार्फत वेगळे कोर्सेस तयार करीत आहोत. यात प्रामुख्याने सौरऊर्जा, कृषिक्षेत्र याबाबींचा विचार आम्ही केला आहे. राज्यात सुमारे पाच लाख युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
 
 
वीर बालकांच्या शहिदांची आठवण करतांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गाऊन व्यक्त केल्या भावना साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा बाबा फतेह सिंघजी यांच्या वीर बलिदानाचे स्मरण करताना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आपल्या भावना व्यक्त करताना ‘कही पर्वत झुके भी है’ हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.