भारतीय सैनिकांसाठी 'पिटाई' शब्द वापरणे हा बेजबाबदारपणा – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

भारतीय सैन्याचे मनोबल तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न – पियुष गोयल

    19-Dec-2022
Total Views |
एस. जयशंकर

नवी दिल्ली
: भारतीय सैनिक यांगत्से येथे १३ हजार फूट उंचीवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी 'पिटाई' असा शब्द वापरून त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांचा सन्मान करा, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षास सोमवारी लोकसभेत सुनावले.

आपले सैनिक यांगत्सेमध्ये तब्बल १३ हजार फूट उंचीवर उभे राहून आपल्या सीमेचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष टिका करणे हे अप्रस्तुत असून त्यांचा आदर आणि कौतुक केले पाहिजे. राजकीय टिकेविषयी कोणती हरकत नाही, मात्र जवानांचा अनादर कोणीही करू नये. ज्याप्रकारची वक्तव्ये कानावर येत आहेत, ती करणाऱ्यांना स्वतःची समज वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या जवानांसाठी 'पिटाई' असा शब्द वापरणे अत्यंत अनादर करणारे आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले.

भारत चीनविषयी उदासीन असल्याचा दावा धादांत खोटा असल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत चीनविषय़ी उदासीन असेल तर सीमेवर सैन्य कोणी पाठवले, याचे उत्तर द्यावे. आज भारत सीमेवरील तणा कमी करण्यासाठी चीनवर दबाव आणत आहे, दोन्ही देशातील संबंध हे तणावाचे असल्याचेही भारत जाहिरपणे सांगत आहेत. त्यामुळे पुरेशी माहिती घेऊन व्यक्त व्हावे, असाही टोला जयशंकर यांनी यावेळी लगाविला.

ससंदीय परंपरांसाठी काँग्रेसची भूमिका धोकादायक – गोयल


भारत – चीन मुद्द्यावरून काँग्रेसने राज्यसभेत गदारोळ घातला. त्याविषयी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल यांनी काँग्रेसवर टिका केली. ते म्हणाले, राज्यसभेत विरोधकांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा लष्करावरील ‘अविश्वास’ दिसून येतो. काँग्रेसचे वक्तव्य म्हणजे भारतीय सैन्याचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न आहे. संरक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच राज्यसभेत सविस्तर निवेदन केले आहे. त्यामुळे विरोधकांनी, विशेषत: काँग्रेसने भारतीय सैन्याचा, सीमेवरील जवानांचा आणि देशाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचा आदर करावा अशी अपेक्षा गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभा व राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांना गदारोळ चालविला आहे. भारत – चीन झटापटीविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन केल्यानंतर संसदेमध्ये गोंधळ कायम आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या यात्रेत असल्याने अद्याप संसदेमध्ये फिरकलेले नाहीत, मात्र त्यांनी आपल्या यात्रेमध्ये चिनी सैन्य भारतीय सैनिकांची 'पिटाई' करत असल्याचे अश्लाघ्य वक्तव्य नुकतेच केले होते.

चीनमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही – दलाई लामा


भारत – चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनमध्ये वास्तव्यास जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, चीनला परतण्याचा कोणताही विषय नाही. आपणास भारत आणि पं. नेहरू यांनी आपल्या वास्तव्यासाठी निवडलेले कांगडा हे ठिकाणी अतिशय आवडत असल्याचे दलाई लामा यांनी नमूद केले आहे.