मविआच्या मोर्चाला परवानगी मिळाली पण...

    16-Dec-2022
Total Views |
Maha Vikas Aghadi march


मुंबई :
महाविकास आघाडीच्यावतीने दि.१७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चासाठी बैठका झाल्या. तयारी अंतिम टप्प्यात आली. बसेस बुक झाल्या मोर्चाचा मार्गही ठरला पण मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती. मात्र, दि. १६ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी काही अटीशर्थींसह परवानगी दिली.

तर दुसऱ्या बाजूला भाजपतर्फे शनिवार, दि .१७ डिसेंबर मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघात निदर्शने केली जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप ‘माफी मागो’ आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा सकाळी ११ वाजता भायखळ्यातून सुरू होईल. त्यानंतर जिजामाता उद्यान मोहम्मद अली रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा निघेल.

मुंबई पोलिसांनी काय अटी घातल्या ?


१) 'रिचर्डसन्स क्रुडास मिल' ते 'टाइम्स ऑफ इंडिया' आयोजित मोर्चा शांततेने काढावा.

२) मोर्चामध्ये कुणीही प्रक्षोभक अथवा कुणाच्याही भावना दुखावतील, असे वक्तव्य करणार नाही. कुणाच्याही भावना दुखावतील असे लिखाण असलेले बोर्ड सोबत घेणार नाही किंवा घोषणा देणार नाही.

३) मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन जाण्यास मनाई आहे.

४) मोर्चामध्ये प्राण्यांचा करण्यात येऊ नये.

५) कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेस बाधा येणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.

६) कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या कायदेशीर आदेशाचे पालन मोर्चामधील लोकांनी करावे.

७) मोर्चामध्ये फटाके वगैरे वाजवण्यास प्रतिबंध राहिल.

८) मोर्चामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी घ्यावी.

९) मोर्चा दिलेल्या मार्गावरूनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये.

१०) मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.

११) मोर्चामध्ये वापरण्यात येणारी वाहने ही सुस्थितीमध्ये असावीत. वाहन चालकाकडे उचित परवाना आहे, वाहन चालकाने मादक पदार्थांचे सेवन केलेले नाही, वाहन चालक पूर्ण वेळ वाहनासोबत राहिल या बाबींची खातरजमा व पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांची राहील.

१२) मोर्चादरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे.

१३) मोर्चादरम्यान अश्लील हावभाव, अंगविक्षेप करू नये अथवा पादचाऱ्यांना वाहन चालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये.

१४) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (3) अन्वये तत्कालीन कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी.

या सर्व अटीचे तंतोतंत पालन मोर्चामधील सर्वजण करतील याची जबाबदारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र राणे, शिवसेना दक्षिण विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ या व्यक्तींवर राहिल, असेही मुंबई पोलिसांनी आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.