‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून उघड झालेले भारतविरोधी धक्कादायक वास्तव (भाग-1)

    05-Nov-2022   
Total Views |
indian
 
 
 
राजीव मल्होत्रा आणि विजया विश्वनाथन यांच्या ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून काही वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. भारताची प्रगती थांबवण्यासाठी आणि त्याचे तुकडे करण्यासाठी अमेरिकेमध्येच कशा प्रकारे काम चालू आहे? ते कोण करत आहे ? आणि त्यांना कसे थांबवायचे? यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.
 
 
अमेरिकेच्या संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये चाललेल्या भारत विरोधी कारवाई
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ (गंगेतील साप : भारताला तोडणे 2.0) या इंग्रजी भाषेतील पुस्तकातून भारताला अमेरिकेकडून कोणते धोके आहेत, याची माहिती मिळते. भारताला पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून धोका असल्याचे जगजाहीर आहे. परंतु, ‘अमेरिकेतील काही संस्थांकडूनही धोका आहे, ही गोष्ट सर्वच जाणत नाही. भारतात लोकशाही आहे, तशीच ती अमेरिकेतही आहे. ‘पाश्चात्त्य देश आणि अमेरिका भारताच्या प्रगतीसाठी साहाय्य करतील, असे म्हटले जाते. परंतु, राजीव मल्होत्रा आणि विजया विश्वनाथन यांच्या ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून काही वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. भारताची प्रगती थांबवण्यासाठी आणि त्याचे तुकडे करण्यासाठी अमेरिकेमध्येच कशा प्रकारे काम चालू आहे? ते कोण करत आहे ? आणि त्यांना कसे थांबवायचे? यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.
 
 
 
 
 
राजीव मल्होत्रा हे अनिवासी भारतीय आहेत आणि ‘भारतीय संस्कृती आणि त्यांना असलेले धोके’ या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहे. यामध्ये यांचे पहिले पुस्तक होते ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ आणि ‘फ्युचर ऑफ पॉवर’. दुसरे पुस्तक होते ‘ब्रेकिंग इंडिया’. राजीव मल्होत्रा यांच्या पुस्तकांमध्ये अमेरिकेच्या मीडियामध्ये, अमेरिकेच्या संस्थांमध्ये, अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये चाललेल्या भारतविरोधी कारवाई यांची प्रचंड माहिती मिळते. ती पुढे आणणे एका भागात शक्य होणार नाही. म्हणूनच या विषयावर मी पुढचे दोन आठवडे उरलेली माहिती भाग-2 आणि भाग-3 मध्ये देण्याचा प्रयत्न करीन.
अमेरिकेतील भारतविरोधी शक्तींकडून भारताच्या विरोधात युद्ध चालू राजीव मल्होत्रा त्यांच्या पुस्तकात हेच सांगतात की, भारताच्या विरोधात एक गहन युद्ध चालू आहे. या युद्धाला त्यांनी ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’ संबोधले आहे. यात एक चांगली ‘आर्केस्ट्रटेड ग्लोबल मशिनरी (आंतरराष्ट्रीय असा एक जटील उपक्रम)’ असून तिची नवीन विचारसरणी आहे. त्यांच्या मते, भारत कधीच एक देश नव्हता. वर्ष 1947 नंतरच भारताची संकल्पना समोर आली. ब्रिटिश नसते, तर भारत नावाचा देशच नसता. जे प्रत्यक्षात हे पूर्ण खोटे आहे.
 
 
 
 
 
‘स्नेक्स इन दी गंगा’ असे पुस्तकाचे नाव का देण्यात आले आहे; कारण गंगा ही भारतीयांसाठी पवित्र नदी आहे. गंगा स्नानामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि आपले चांगले होते, अशी भारतीयांची धारणा आहे. याच नदीमध्ये साप असतील, तर ते देशासाठी धोकादायक आहे. आज ज्या गंगेला आपण सुरक्षित समजतो, ती धोकादायक झाली आहे. आज गंगेचे पाणी वरून शांत दिसत असले, तरी आतमध्ये गडबड चालू आहे. ज्याप्रकारे 200 वर्षांपूर्वी इंग्लंडने वसाहत करून भारतावर पुष्कळ वर्षे राज्य केले, त्याच प्रकारचे वैचारिक वसाहतीकरण त्यांना करायचे आहे.
 
 
 
 
 
मल्होत्रा यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाला ‘ब्रेकिंग इंडिया 1.0’ संबोधण्यात आले होते. त्यात त्यांनी देशासमोरील विविध धोके जसे ‘डावा हिंसाचार, धर्म परिवर्तन’ या विषयी सांगितले होते. अधिक संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, भारतविरोधासाठी काही तथा कथित विचारवंत गप्प राहून सर्व कृती करत आहेत. भारतात असे लोक आहेत की, ज्यांना भारताचे चांगले व्हावे, असे कधीच वाटत नाही.
 
 
 
 
 
आता ‘दलित, मुसलमान, महिला यांच्यावरील अत्याचार आदी सामाजिक समस्यांसाठी सध्याचे केंद्र सरकारच उत्तरदायी असून ते तोडले पाहिजे, याविषयी ते विविध क्षेत्रांतील लोकांना प्रभावित करतात. देशविरोधी कारवाया आणि अपप्रचार कसा चालू आहे, याविषयी हे पुस्तक योग्य प्रकारे माहिती देते. अशा देशविरोधी लोकांना भारतातीलच काही कसे साहाय्य करतात आणि भारताला अमेरिकेसारख्या लोकशाहीप्रधान देशापासून किती हानी होऊ शकते, हे या पुस्तकातून समजते.
 
 
 
 
 
 
 
अमेरिकेतील संस्थांकडून भारतविरोधी संस्थांना कोट्यवधी रुपयांचे साहाय्य अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ही माध्यमे नेहमी भारताच्या विरोधात लिहितात. त्यांना चीनने खरेदी केले आहे आणि ते स्वत:ला भारताहून श्रेष्ठ समजतात. अमेरिकेतील काही सामाजिक संस्थांना (‘एनजीओ’ना) भारताला तोडायचे आहे. यात ‘फोर्ड फाऊंडेशन’ हे प्रमुख नाव आहे. अमेरिकेत ‘फोर्ड’नावाचे एक अध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या नावावर ही संस्था आहे. ही संस्था भारतातील अनेक सामाजिक संस्थांना साहाय्य करते. यातील काही संस्था देशाचे तुकडे करण्यात व्यस्त असलेल्या जिहादी विचारांच्या आहेत, तर काही संस्थांना भारताचा विकास थांबवायचा आहे, त्या डाव्या विचारांच्या संस्था आहेत.
 
 
 
 
indian
 
 
 
 
अमेरिकेत जॉर्ज सोरोस नावाची एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे. तीही अशा संस्थांना सहस्रो कोटी रुपयांचे साहाय्य करते. अमेरिकेतील काही विद्यापीठे स्वत:ला अतिशय श्रेष्ठ समजतात. ‘अमेरिका श्वेत (गोर्‍या वर्णीयांचे) राष्ट्र आणि भारत हे ब्राऊन (गहू वर्णीयांचे) राष्ट्र असल्याने अमेरिका भारताहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे ‘आम्ही म्हटल्याप्रमाणे भारताने ऐकले पाहिजे, असे त्यांना वाटते; पण ते आपल्याला मान्य नाही. आज अमेरिकेत ‘डेमोक्रॅटिक’ आणि ‘रिपब्लिक’ हे दोन पक्ष आहेत. त्यातील ‘डेमोक्रॅटिक’ पक्ष अत्यंत उदारवादी बनून भारतातील अनेक अशा संस्थांना मदत करू मागतात, ज्यांना भारत तोडायचा आहे किंवा येथे हिंसाचार करून भारतामध्ये क्रांती करायची आहे. मात्र, रिपब्लिकन पक्ष खास तर पूर्व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या तरी भारतीयांच्या बाजूने बोलताना दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
भारतीय मूळनिवासी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस अमेरिकेत राहणारे काही अनिवासी भारतीय हे विविध उच्चस्थानी विराजमान आहेत; परंतु ते भारताचा द्वेष करतात. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस याही भारतीय मूळनिवासी आहेत. त्या उपराष्ट्राध्यक्षा झाल्यावर भारतातील अनेक लोकांना आनंद झाला. अमेरिका जगातील महासत्ता आहे. तेथे अनिवासी भारतीय उपराष्ट्राध्यक्षा झाल्यामुळे ‘भारताला सर्व प्रकारचे साहाय्य होईल, तसेच भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळेल, असे वाटले होते. परंतु, तसे काही झाले नाही. हॅरिस आल्यावर त्यांनी भारताच्या विरोधात उलटसुलट चर्चा करणे चालू केले.अर्थात गेल्या काही काळापासून कमला हॅरिस यांनी भारतविरोधी विधाने देणे बंद केले आहे आणि आता तर त्यांनी या वेळेला दिवाळी साजरी करण्यामध्ये मोठा पुढाकार घेतला होता. हा भारताचा मोठा विजय समजायला पाहिजे.
 
 
 
 
 
 
 
 
अमेरिका हा वाईट देश आहे, असे म्हणायचे नाही. अमेरिकेतील तीन-चार टक्के अनिवासी भारतीय पुष्कळ काम करतात; पण जॉर्ज सोरोस, तसेच ‘फोर्ड फाऊंडेशन’, ‘हॉवर्ड विद्यापीठ’यांसारख्या संस्थांकडून भारत विरोधी उलटसुलट कामे केली जातात. त्यांना भारतातील तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ करून भारतातील विविध भागांमध्ये पसरवायचे आहे. यामुळे भारतात क्रांती होईल. तसे पाहिले, तर मार्क्सवाद आणि साम्यवाद हे रशिया अन् चीन यांच्याशी संबंधित आहेत; पण अमेरिकेतील काही लोकांनी मार्क्सवादाचे अमेरिकिकरण केले आहे.
 
 
 
 
 
 
 
या संशोधनासाठी आपण राजीव मल्होत्रा यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. हे ‘प्रोवोकेटिव्ह’ विचार करायला लावणारे पुस्तक आहे. ते भारतीयांचे डोळे उघडण्यासाठी साहाय्य करते. माझ्या मते ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ हे पुस्तक भारतीयांनी अवश्य वाचून त्यातील धोके समजून घेतले पाहिजेत. विशेष कारवाई करून भारत हे धोके कसे थांबवू शकतो, यावर विचार आणि कृती केली पाहिजे. जोपर्यंत आपण हे धोके समजून घेत नाही, तोपर्यंत या धोक्यांच्या विरोधात योग्य प्रकारे कारवाई करता येणार नाही. हे पुस्तक भारताच्या शत्रूंना शोधण्यासाठी साहाय्य करते. देशविरोधी लोकांची माहिती देऊन भारताच्या विरोधात कार्य करणार्‍यांना उघडे पाडा, मग ते कितीही मोठे असो किंवा माध्यमांनी त्यांना मोठे बनवलेले असो.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.