मुंबई : ''तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये दिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित महत्त्वाचे पुरावे नष्ट करणे आणि इतर सर्व बेकायदेशीर कामे झाली आहेत. दिशा सालियनच्या मृत्यूची केस सीबीआयकडे कधीही नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सीबीआय देणार तरी कशी ? ही केस सीबीआयकडे न देण्याचे न्यायालयाने देखील म्हटले होते. त्यामुळे दिशांच्या मृत्यूबाबत सीबीआयने अहवाल दिल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या असून केवळ फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न होता,' असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'एका सीबीआय अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर एक वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत असा स्पष्ट उल्लेख केला आहे की दिशा सालियनची केस सीबीआयकडे कधीही दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत सीबीआयने क्लोजर रिपोर्ट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.' असे राणेंनी म्हटले आहे.
दिशा सालियन प्रकरणावरून गोंधळाची स्थिती
दरम्यान, बुधवारी काही माध्यमांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने अहवाल दिला असून त्यात दिशाचा मृत्यू हा केवळ अपघाताने झाल्याचे दावे करण्यात आले होते. काही माध्यमांनी केलेल्या दाव्यांवर नितेश राणे यांनी टीका केली असून हा केवळ खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनचा ८ आणि ९ जूनच्या दरम्यान रात्री मृत्यू झाला होता. दिशाच्या मालाड येथील घरी ती मित्रांसमवेत पार्टी करत असताना चौदाव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. याबाबत नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यूला महाविकास आघाडीतील एक मंत्री जबाबदार असल्याचे दावे सातत्याने केले होते. त्यामुळे नितेश राणेंनी केलेल्या दाव्यानंतर दिशा सालियन प्रकरणावरून पुन्हा एकदा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
आरोपांवर ठाम असल्याचा नितेश राणेंचा दावा
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र सीबीआय चौकशीतील निष्कर्षानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, 'सीबीआयने आपला अहवाल दिल्याचे आता समोर आले आहे. परंतु, काही गोष्टींवर आम्ही आजही ठाम असून त्या त्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहणार हे निश्चित आहे. दिशाच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले ? इमारतीत येणाऱ्यांची नोंद करणारे व्हिजिटर बुकमधील काही पाने का फाडली गेली आहेत ? दिशाच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल बाहेर का येत नाही ? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ही सर्व बेकायदेशीर कामे झाली असून एकप्रकारे पुरावे नष्ट केल्याचा आम्हाला संशय आहे. काहीही झाले तरी आम्ही आमच्या आरोपांवर ठाम आहोत, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.