"गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरेंची पदयात्रा पाहून स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल..."

    17-Nov-2022
Total Views |
देवेंद्र फडणवीस
मुंबई : कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. यानंतर आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यातच आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांनी गळाभेट घेतल्याचे फोटो समोर आले.या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत असताना राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "तुम्हाला बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा अधिकार नसल्याचं" म्हणत आदित्य ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.

उपमुख्यमंत्री म्हणाले, "कॉग्रेस नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतके वाईट बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात. याचे मला अतिशय वाईट वाटते. याबाबत मी विचार केल्यास मला वाटते की स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल की त्या राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करताहेत." असे प्रतिपादन फडणवीसांनी केले.


पुढे ते म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा धागा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जो अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता आणि ज्यावेळी कोणीही सावकरांच्या विरुद्ध एक शब्दही बोलला, तर त्याला चपखल अशाप्रकारचे उत्तरही मिळत होतं. ते कृतीतूनही मिळत होत आणि शब्दातूनही मिळत होतं. पण आता कॉग्रेस नेते राहुल गांधी हे हिंगोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतके वाईट बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात. याचे मला अतिशय वाईट वाटते." असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर ही निशाणा साधला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.