नवी दिल्ली : करोनाची जागतिक साथ, त्यामुळे प्रभावित झालेली पुरवठा व्यवस्था आणि युक्रेन संघर्षामुळे जगापुढील आव्हाने वाढली आहेत. त्यावर तोडगा काढण्यास संयुक्त राष्ट्रांसारखी बहुपक्षीय संघटना कुचकामी ठरल्या आहेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी २०’ राष्ट्रांच्या बैठकीस संबोधित करताना व्यक्त केले. दरम्यान, युक्रेन संघर्षाविषयी मांडलेली “सध्याचा काळ युद्धाचा नाही”, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका बैठकीच्या केंद्रस्थानी असल्याचे पहावयास मिळाले आहे.
इंडोनेशियामधील बाली येथे सुरू असलेल्या ‘जी २०’ राष्ट्रांच्या बैठकीत खाद्य आणि उर्जा सुरक्षा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केल. ते म्हणाले, हवामान बदल, कोविड महामारी, युक्रेनमधील घडामोडी आणि संबंधित जागतिक समस्या. या सर्वांनी मिळून जगात हाहाकार माजवला आहे. जागतिक पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली आहे. संपूर्ण जगात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे संकट उभे राहिले आहे. प्रत्येक देशातील गरीब नागरिकांसमोर आव्हान अधिक गंभीर आहे. ते आधीच दैनंदिन जीवनात संघर्ष करत होते, त्यामुळे दुहेरी त्रासाला सामोरे जाण्याची आर्थिक क्षमता त्यांच्याकडे नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांसारख्या बहुपक्षीय संस्था कुचकामी ठरल्या असल्याचे आणि त्यात आवश्यक सुधारणा करण्यास आपण सर्वजण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे आज जग जी २० गटाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
महामारीच्या काळात भारताने आपल्या १.३ अब्ज नागरिकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारताने अनेक गरजू देशांना अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. अन्नसुरक्षेच्या संदर्भात सध्या खतांचा तुटवडा ही देखील मोठी समस्या आहे. आजची खतांची टंचाई हे उद्याचे अन्न संकट आहे, ज्यासाठी जगाकडे उपाय नाही. खत आणि अन्नधान्याची पुरवठा साखळी स्थिर आणि खात्रीशीर ठेवण्यासाठी देशांनी परस्पर करार केला पाहिजे. भारतात, शाश्वत अन्नसुरक्षेसाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहोत आणि बाजरीसारख्या पौष्टिक आणि पारंपारिक अन्नधान्याला पुन्हा लोकप्रिय करत आहोत. बाजरी जागतिक कुपोषण आणि भूक देखील सोडवू शकते. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताची ऊर्जा सुरक्षा देखील जागतिक विकासासाठी महत्त्वाची आहे. ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नये, असे भारताचे मत आहेभारत स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणासाठी वचनबद्ध आहे. भारतात २०३० पर्यंत आपली निम्मी वीज अक्षय स्रोतांमधून निर्माण केली जाणार आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यानुएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत संवाद साधला.
भारतीय समुदायास केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाली येथे परदेशस्थ भारतीय समुदाय आणि फ्रेंड्स ऑफ इंडियाच्या ८०० हून अधिक सदस्यांना संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधानांनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांवर भाष्य केले. दोन्ही देशांमधील मजबूत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध अधोरेखित करण्यासाठी त्यांनी बाली जत्रेच्या जुन्या परंपरेचा संदर्भ दिला.
त्याचप्रमाणे डिजिटल, वित्त, आरोग्य, दूरसंचार आणि अंतराळ यासारख्या विविध क्षेत्रात भारताने केलेली प्रगती, भारताच्या विकासाचा प्रवास प्रगती याविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली. भारताच्या विकासाच्या रोडमॅपमध्ये जगाच्या राजकीय आणि आर्थिक आकांक्षांचा समावेश आहे आणि स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनात जागतिक सुधारणेची भावना समाविष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले.
युद्धविराम आणि मुत्सद्देगिरी हाच युक्रेन संघर्षावर उपाय
युक्रेनमध्ये युद्धविराम आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचा मार्ग जगाने शोधला पाहिजे. गेल्या शतकात दुसऱ्या महायुद्धाने जगावर हाहाकार माजवला. त्यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी शांततेचा मार्ग अवलंबण्याचा गंभीर प्रयत्न केला. आतादेखील तेच करण्याची गरज आहे. करोनानंतरच्या युगासाठी नवीन जागतिक व्यवस्था तयार करण्याची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी २०’ परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्य जो बायडेन यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी यावेळी अत्यंत महत्त्वाच्या तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानांचे प्रकार, अत्याधुनिक गणना, कृत्रिम बुद्धीमत्ता यांसारख्या, भविष्याभिमुख क्षेत्रांमध्ये सहकार्यासह भारत-अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. क्वाड, आय2यु2 इत्यादींसारख्या नव्या गटांच्या उभारणीदरम्यान भारत आणि अमेरिकेमध्ये दिसून आलेल्या घट्ट सहकारी संबंधांबाबत या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी यावेळी विशिष्ट मुद्यांच्या संदर्भात जागतिक तसेच प्रादेशिक पातळीवरील घडामोडींबाबत चर्चा केली. भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. ‘जी २०’ समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे असण्याच्या काळात दोन्ही देशांदरम्यान सखोल सहकार्य कायम राखले जाईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.