काँग्रेसने शिक्षण व्यवस्था साम्यवादी लोकांच्या हातात दिली. परिणामी, संपूर्ण समाजाला एक ‘स्लो पॉयझनिंग’ सुरू झाले. त्याची पूर्वतयारी इंग्रजी राजवटीत केली गेली. हिंदू समाज आपल्या परंपरा, संस्कृती, मूल्यव्यवस्था, स्वत्व, स्वाभिमान, प्रेरणास्थाने, आदर्श विसरून जाऊन, सतत पाश्चिमात्य देशांच्या पद्धतीने विचार करू लागेल, याची तजवीज इंग्रजांनी तेव्हाच केली होती.
या देशाला गुलाम बनविण्यासाठी इंग्रजांना फार कालावधी लागला नाही. प्लासीची लढाई, पानिपतच्या लढाईच्या जेमतेम तीनच वर्षे आधी झाली. प्लासीची लढाई १७५७ मध्ये झाली तर मराठे अब्दाली पानिपतावर १७६१ मध्ये लढले. पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले गतवैभव आणि दबदबा अवघ्या आठ वर्षांत पुन्हा स्थापित केला. पण, थोरल्या माधवराव पेशव्यांच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्ता आपसातील भाऊबंदकी आणि मतभेदांमुळे कमजोर होत गेली आणि अखेरची भारतीय सत्ता म्हणून मराठी वा पेशवाई १८१० मध्ये संपुष्टात आली.
म्हणजे इंग्रजांना जवळजवळ संपूर्ण भारत घशात घालण्यासाठी जेमतेम ५० वर्षे लागली. तेही एक व्यापार करणार्या ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या माध्यमातून. अर्थात, त्या आधी संपूर्ण भारतभर व्यापाराच्या निमित्ताने त्यांनी आपले जाळे विणले होते. याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हे पतन इतक्या वेगाने का झाले, याची कारणं इतिहासात विस्ताराने वर्णिली आहेत. या पतनानंतर एक सर्वांगीण संघर्ष करीत हा देश स्वतंत्र झाला. या संघर्षात काहीजण सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने लढले, तर काही शांततामय घटनात्मक अहिंसेच्या मार्गाने लढले. या सर्वंकष लढ्याचा परिणाम म्हणून देश स्वतंत्र झाला. परंतु, त्यानंतरदेखील, आम्ही राष्ट्र म्हणून का उभे राहू शकलो नाही, याची कारणमीमांसा मात्र एकसुरी आणि बर्याच प्रमाणात किडक्या साम्यवादी नजरेतूनच केलेली आढळते. त्यामुळे नसलेली कारणं देण्यात आली. काँग्रेसने शिक्षण व्यवस्था साम्यवादी लोकांच्या हातात दिली.
परिणामी, संपूर्ण समाजाला एक ’स्लो पॉयझनिंग’ सुरू झाले. त्याची पूर्वतयारी इंग्रजी राजवटीत केली गेली. हिंदू समाज आपल्या परंपरा, संस्कृती, मूल्यव्यवस्था, स्वत्व, स्वाभिमान, प्रेरणास्थाने, आदर्श विसरून जाऊन, सतत पाश्चिमात्य देशांच्या पद्धतीने विचार करू लागेल, याची तजवीज इंग्रजांनी तेव्हाच केली होती. याकरिता त्यांनी अत्यंत विचारपूर्वक व्यूहरचना केली. हे करताना त्यांच्या लक्षात आले की, हिंदू समाजाची त्याच्या परंपराशी नाळ तोडणे आवश्यक आहे. ही नाळ जर तोडायची असेल, तर या समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या, या समाजाच्या जहाजाचे जे सुकाणू आहे, ते पहिल्या प्रथम तोडले पाहिजे.
हे सुकाणू, दिशादर्शक म्हणजे हिंदू समाजातील ब्राह्मण लोकं आहेत. मग हिंदूंचेसर्व आदर्श, प्रथा यांना बदनाम करीत त्या समाजातील ब्राह्मणांना लक्ष्य केले पाहिजे. मग त्यांनी आमच्या इथे मुळातूनच नसलेल्या प्रथांना त्या हिंदू धर्म आणि समाजात अस्तित्वात आहेत, असे सांगत त्या बदनाम करायला सुरुवात केली. या देशात कोणत्याही स्त्रीवर सती जाण्याची सक्ती होत नव्हती. पण, काही तथाकथित सुधारणावाद्यांना हाताशी धरत सतीच्या प्रथेला एक सामाजिक प्रश्न म्हणून मांडले गेले. सतीप्रथा कायद्याने बंद करण्यात आली. जे ही प्रथा सक्तीची नाही, असे म्हणत होते, त्यांच्यावर ब्राह्मणी प्रवृत्ती, सनातनी म्हणून प्रछन्न टीका करण्यात आली. इंग्रज सत्ताधार्यांनी याला संपूर्ण पाठिंबा देताना, हिंदू धर्माला, ब्राह्मणी प्रवृत्ती म्हणून बदनाम केले.
दुसरे स्पष्ट उदाहरण येथे देता येईल ते युरोपातील ख्रिस्तपूर्व अस्तित्वात असलेल्या, मूर्तिपूजा करणार्या धर्मांचे. ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीला या मूर्तिपूजक धर्मीयांच्या मंदिरांशी वेश्याव्यवसाय जोडून, ख्रिश्चन धर्म अनुयायांनी बदनाम केले होते. तेच सूत्र भारतात वापरले गेले ते देवदासी प्रथेकरिता. देवदासी प्रथेला वेश्यावृत्तीशी जोडले गेले. मग मंदिरांचे पावित्र्य वेश्यावृत्तीने नष्ट करतात म्हणून मंदिराचे पुजारी आणि त्याची देखभाल करणारे, यांना पद्धतशीरपणे बदनाम करण्यात आले. (लेखक: साई दीपक; पुस्तक : इंडिया दॅट इज भारत; पृष्ठ क्रमांक : २७८,२७९.) हळूहळू हिंदू धर्म, त्यातील पुराणं, श्रृती आणि स्मृती, विविध गुणांची प्रतीकं असणारे देव आणि समाजाला सातत्याने योग्य मार्गावर ठेवणारा ब्राह्मण यांना लक्ष्य करीत बदनाम करण्यात आले.
परिणामी, हिंदू समाजाला आपली प्रतीकं, मूल्यव्यवस्था, आदर्श ग्रंथ, परंपरा-प्रथा या सगळ्या गोष्टींची घृणा वाटू लागली. आमची शिक्षण पद्धती संपवण्यासाठी गुरुकुलांऐवजी इंग्रजी शाळा सुरू केल्या. त्यांच्या मूल्यव्यवस्थेवर चालणार असतील, तर सरकारी अनुदान देणे सुरू केले. गुरुकुल पद्धतीची सर्व बाजूंनी गळचेपी सुरू झाली. त्यातच इंग्रजी भाषा जाणणार्या लोकांना लगेचच प्रशासनात नोकरी, अधिकार देण्यात येऊ लागले. परिणामी, आधुनिक शिक्षण म्हणून लोकं त्या शाळांमध्ये जाऊ लागले. त्यांच्या विचारांना, मनोव्यापाराला हवी ती दिशा देणे, त्यामुळे सहज साध्य झाले. यातही ब्राह्मण वर्गच हे आधुनिक शिक्षण घेऊन सरकारी नोकर्या मिळवण्यात आघाडीवर राहिला.
सामान्य माणसाच्या मनात या वर्गाप्रति दुहेरी (भारतीय समाजाचे दिशादर्शकही तेच आणि इंग्रजी राज्याचे प्रशासकही तेच) असूया आणि राग निर्माण करणे अजूनच सोपे झाले. मग तुमच्या श्रद्धा या अंधश्रद्धा, तुमच्या प्रथा-परंपरा या चुकीच्या, तुमची उपासना पद्धती ही अर्थहीन, हे समाज मनावर बिंबवणं सोपे झाले. त्यात ऐहिक विज्ञानाचे प्रत्येक ठिकाणी ’कारण आणि परिणाम’ हे प्रमेय आध्यात्मिक बाबतीतही लावण्याची समाजाला सवय लावली गेली. वैज्ञानिक कारणमीमांसा करणं चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. परंतु, अध्यात्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांना सतत त्याच तराजूने मोजणे अयोग्य असते, याचादेखील समाजाला विसर पडला.
समाजात मग काही लोकं मोठ्या खुबीने पेरली गेली. ती माणसं मग पदोपदी भारतीय समाजाचा मानभंग करण्याचेच काम करू लागली. युरोप, तेथील संस्कृती आणि धर्म कसे चांगले आहेत आणि आमचे भारतीय असलेले सगळेच कसे टाकाऊ आहे. एवढंच इमानेइतबारे समाजात पसरवू लागली. हळूहळू आमच्या संस्कृतीवर विविध प्रकारे आघात केले जाऊ लागले. देश स्वतंत्र झाला, पण यात कोणताही बदल झाला नाही. उलट यात वाढ होत गेली. एका बाजूने मुस्लीम, ख्रिश्चन धर्मांचं उदात्तीकरण केले जाऊ लागले आणि हिंदू धर्मावर मात्र सतत आघात केले जाऊ लागले. हे करणारेदेखील आमचेच बंधू होते. आमच्या इतिहासाचं विद्रुपीकरण केले गेले. हळूहळू आमचं मानसिक खच्चीकरण होत गेले. आमचं रूपांतर ‘काळ्या वर्णाचे इंग्रज’ असं करण्यात ब्रिटिशांना जवळपास यश मिळाले होते.
आजही आमच्यात एक अश्रद्ध लोकांचा गट अस्तित्वात आहे, जो आपल्या सर्व प्रथा-परंपरा, संस्कृती याला नाकं मुरडत असतो. त्याचवेळी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीय लोकांच्या प्रथा-परंपरा, श्रद्धा हे मात्र काही वेळा नकळत, तर काही वेळा सहर्ष स्वीकारताना दिसतो. (उदाहरणार्थ : हलाल प्रथा, मेणबत्ती पेटवणं, आर्थिक वर्ष) आमचं वसाहतीकरण एवढ्या टोकाचे झाले आहे की, आमच्या कालगणनेनुसार, असलेले १२ महिने सोडून देऊन, आज ७५ वर्षे स्वातंत्र्याला झाली, तरी आम्ही इंग्रजी कॅलेंडरनुसारच चाललो आहे. सुसंगत असे आर्थिक वर्षदेखील आम्ही सुरू करू शकलो नाही. कुणी यावर भाष्य जरी केले, तरी त्याने असा काय फरक पडणार आहे, अशी भूमिका बुद्धिवादी तसेच सर्वसामान्य घेताना दिसतात.
यातूनच मग कोणी आमच्या देवीदेवतांची खिल्ली उडविली, तरी तथाकथित सेक्युलर, धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेतून त्याकडे दुर्लक्ष करणं आम्ही श्रेयस्कर मानतो. अनेकदा आमच्या उदारतेचा फायदा कुणी चित्रकार, कुणी चित्रपटात काम करणारा, कुणी राजकीय नेता, तथाकथित बुद्धिवादी घेताना दिसतात. खरोखर अभ्यास करून जेव्हा काही सुधारणा सुचवल्या जातात, तेव्हा हिंदू समाजाने त्या सहर्ष स्वीकारल्या आहेत, हे इतिहास सांगतो. पण, वसाहतवादी विचारसरणी अवलंबिली की, आमचे स्वत्व, स्वाभिमान वाटावा अशा प्रथा-परंपरेकडेदेखील आम्ही दुर्लक्ष करू लागतो, नव्हे त्याचा धिक्कार करू लागतो. हळूहळू मग आम्ही कोणतेही अभिमान, परंपरा, प्रतीके, प्रतिमा, संस्कृती नसणारा लोकसमूह बनून जातो. आमच्याकडे आमचं असं काहीही उरत नाही. मग समाजाचं रूपांतर एका बुळ्या, तेजोहीन लोकसमूहात होते. मग कोणताही इतिहास ज्ञात नसताना,प्रतीकं, प्रतिमा यांचा कोणताही अभ्यास न करता रावणदहनाला विरोध केला जातो. महिषासुराची पूजा करण्याचा पुरस्कार केला जातो. अकारण कुणा संघटनेच्या पथ संचलनाला विरोध केला जातो.
या सर्व गोष्टी आता कडेलोटाच्या दिशेने जात आहेत. सुदैवाने आज या देशात हिंदुत्व समजणारे शासन विराजमान आहे. हिंदू समाज जागृत झालेला दिसतो आहे. जर थोडी अधिक एकता, एकात्मता, समरसता आम्ही दाखवू शकलो, तर एक यशस्वी देश म्हणून, यशस्वी आणि सर्जनशील समाज म्हणून जगात या देशाची मान उन्नत झालेली नजीकच्या भविष्यात आपण अनुभवू हे निश्चित.
- डॉ. विवेक राजे