मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाचा प्रश्न असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासावरून खा. गोपाळ शेट्टींचा पुन्हा आक्रमक पवित्रा मुंबईकरांना पाहायला मिळाला. मालाडमधील एका झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील ३ रहिवाशांच्या बाबतीत प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी पात्र असलेल्या झोपडी धारकांना खोली खाली करण्याचे आदेश दिल्याचा दावा करत रहिवाशांनी स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांना तक्रार केली.
मालाड येथील स्थानिकांच्या तक्रारींवर तात्काळ दखल घेत खासदार गोपाळ शेट्टी आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकरांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांची भेट घेतली आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेत आंदोलनाची भूमिका जाहीर करून टाकली. यानंतर झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
मालाड पश्चिमेतील खजुरिया टॅंक रोडवरील देवीस्मृती झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात १४ वर्षांपासून राहणाऱ्या पात्र असलेल्या ३ झोपडी धारकांना एसआरएच्या अधिकाऱ्यांनी खोली खाली करण्याचे आदेश दिल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली. यावर खा. गोपाळ शेट्टी आणि प्रवीण दरेकर घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या भावना जाणून घेतल्या आणि झालेल्या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसनाचे अधिकारी प्रशांत चौघुले यांनी खा. गोपाळ शेट्टी यांना लेखी पत्र देत सदरील प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली.
प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त
'आज झालेला प्रकार पूर्णपणे गैरसमजातून झाला आहे. या प्रकाराबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा केली असून संबंधितांना झालेल्या त्रासासाठी आम्ही दिलगीर आहोत. या प्रकरणी शासन निर्णय आणि योग्य त्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून त्याची संपूर्ण कल्पना आपणास देण्यात येईल,' असे लेखी पत्रच स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले आहे.'