राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याची गरज नाही ; ते स्वतःहूनच बुडतील

चंद्रशेखर बावनकुळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

    22-Oct-2022
Total Views |

Bavankule and pawar 
चंद्रशेखर बावनकुळे
 
 
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. तथापि, या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी असो वा इतर त्या पक्षाला फोडण्याची गरज नसून ते त्यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे स्वतःहून राजकीयदृष्ट्या बुडतील,' अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच, आगामी काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश झालेले दिसतील, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले आहे. शनिवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरेंची शिवसेना हे पक्ष सोबत आले होते. पण तीन पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या रिक्षाची तीन चाके वेगवेगळ्या दिशेला होती. हे तीनही पक्ष आपसात इतके भांडतील की त्यांची दाणादाण उडणार हे निश्चित होते. सत्तेच्या अडीच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री कोणाला भेटत नव्हते तर पालकमंत्री केवळ मतदारसंघापुरते होते. सध्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ असल्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये येत्या काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,' असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
 
उत्सव तुम्ही का साजरे केले नाही ?
 
'उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना त्यांना अडीच वर्षे काम करण्याची संधी होती पण त्यांनी त्यावेळी हिंदू सणांवर बंदी घातली गेली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळी अशा सर्व सणांवरील निर्बंध उठवले. भारतीय जनता पक्षाने हिंदू संस्कृतीतील सण धुमधडाक्यात साजरे केले म्हणून त्यावर टीका योग्य नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला हे करण्यापासून कोणी अडवलेले नाही. त्यांनी सत्तेत असताना या सणांसाठी पुढाकार घेतला नाही आणि आता विरोधी पक्ष असतानाही ते भाजपप्रमाणे मराठी दांडिया किंवा दीपोत्सव करण्यात आघाडीवर नाहीत. भाजपवर टीका करण्यापेक्षा हिंदू सण उत्सव तुम्ही का साजरे केले नाही ? याचे उत्तर द्या' असे बावनकुळेंनी म्हटले आहे.