भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) पुरोगामित्व आणि नरबळी

    15-Oct-2022   
Total Views |
 
केरळ
 
 
 
केरळमधील पथानामथिट्टामध्ये रोसलीन आणि पद्मा या दोघींचा नुकताच अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. आर्थिक संपन्नता यावी म्हणून या दोघींचा नरबळी देण्यात आला. या भयंकर हत्याकांडाचा सूत्रधार मोहम्मद शफी आणि भगवल सिंग आणि त्याची पत्नी लैला आहे. भगवल आणि लैला दोघेही भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) कट्टर कार्यकर्ते. या घटनेची भयानकता पाहता अंधश्रद्धा, केरळ आणि भाकपबद्दल काही प्रश्न आपुसकच उपस्थित होतात. त्याचा या लेखात घेतलेला मागोवा...
 
 
 
केरळमधील पथानामथिट्टामध्ये रोसलिन आणि पद्मा या दोघींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आर्थिक संपन्नता यावी म्हणून या दोघींचा नरबळी देण्यात आला. रोसलिन हिचा गळा चिरण्यात आला. तिच्या गुप्तांगामध्ये शस्त्र खुपसण्यात आले. इतके कमी की काय म्हणून मृत्यूनंतर तिचे स्तनही कापण्यात आले, तर पद्माचे हातपाय बांधून ती अर्धवट बेशुद्धावस्थेत असतानाच तिच्या शरीराचे 56 तुकडे करण्यात आले. दोघींनाही भयंकर यातना दिल्या गेल्या. या अत्यंत हिडीस आणि भयंकर हत्याकांडाचा सूत्रधार मोहम्मद शफी हा आहेच आणि त्याच्या सांगण्यानुसार, या दोन महिलांचा विकृतपणे खून करणारे दोघेजण आहेत. भगवल सिंग (वय वर्षे 68) आणि त्याची पत्नी लैला (59). या सगळ्या घटनेने केवळ केरळच नव्हे तर अख्खा देश हादरला आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अंतरंगही यानिमित्ताने उघडे पडले आहेत. कारण, भगवल सिंग हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) पक्षाचा कट्टर स्थानिक नेता. तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक शाखा सचिव पदावरही कार्यरत होता. सध्या तो केरळ राज्य ‘कार्शका थोझिलाली संघ पंचायत समिती’चाअध्यक्ष आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याने तेथील बूथ क्र. 142 वर ‘एलडीएफ’चा एजंट म्हणून कामही केले आहे, तर त्याची पत्नी लैलासुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कार्यकर्ती.
 
 
केरळमध्ये सध्या मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात भाकपची सत्ता आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी स्वतःला अत्यंत पुरोगामी आणि प्रगतीशील दृष्टिकोनाची, मानवतावादी वगैरे समजते. नव्हे, आपल्या महाराष्ट्रात या पक्षाला आडून आडून समर्थन देणारी ‘डफली गँग’ही स्वतःला मानवतावादी पुरोगामी समजते. भाजपशासित राज्यात जरा काही खुट्ट झाले तरी ही गँग आणि भाकपचे राष्ट्रीय पातळीवरचे तथाकथित नेते लागलीच भाजपशासित राज्यात कशी असहिष्णूता आहे, जंगलराज आहे, माणसाला राहण्याजोगे वातावरण नाही, हे सांगायला पुढे सरसावतात. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये निष्पाप मुलीचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा नि:ष्पक्ष वार्तांकन आणि जनजागृतीसाठी कप्पन सिद्दीकी हा ‘पीएफआय’चा हस्तक म्हणून संशयित असलेला व्यक्ती केरळमधून हाथरसला गेलेला, हे आठवले. पण, त्याच केरळमध्ये आज भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राज्यात केरळच नव्हे, तर देशाला नव्हे, मानवतेलाच कलंक फासणारे हत्याकांड घडले. मात्र, यावर सारे पुरोगामी, सारे निधर्मी आणि अन्याय-अत्याचाराविरोधातील लढाईचे ठेकेदार असल्याच्या अविभार्वात असलेले सगळे शाहीनबागसदृश्य आंदोलनकारी मात्र गप्प आहेत. रोसलीन आणि पद्मा काय माणूस नव्हत्या? की त्यांचा विकृतपणे खून करणारा भगवल सिंग आणि लैला हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी-मार्क्सवादीचे कार्यकर्ते आहेत म्हणून सगळे तोंडात मूग गिळून बसले आहेत? की या दोघांनाही असले राक्षसी कृत्य करण्यास प्रवृत्त करणार्‍याचे नाव मोहम्मद शफी आहे. हा सूत्रधार नावावरूनच विशिष्ट समाजगटाचा आहे हे कळते. त्यामुळे तर हे सगळे निधर्मी असे गपगार झाले नाहीत ना? जे काही आहे, ते सगळे संतापजनक आहे, हे निश्चित!
 
 
 
मुद्दा होता की, या दोघींची हत्या ज्या प्रकारे झाली, त्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या घटनेची कारणमीमांसा करताना जे जे काही समोर येते, त्याचेही अनेक पैलू आहेत आणि तेसुद्धा तितकेच भयंकर आहेत. भगवल सिंग आणि लैला हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते. भगवल हा आयुर्वेद चिकित्सक आणि डॉक्टर अशीही उपाधी लावायचा. भगवल आणि लैलाची आर्थिक परिस्थिती तितकीशी वाईट नसणारच. पण, तरीही त्यांना आणखीन पैसे हवे होते. या दोघांचा संपर्क क्रूर गुन्ह्याचा मास्टरमाईंड मोहम्मद शफी याच्याशी कसा झाला? तर फेसबुकच्या माध्यमातून मोहम्मद शफीची भगवल सिंगशी मैत्री झाली. ती कशी तर त्याचीही चक्रावून टाकणारी घटना. या घटनेमुळे फेसबुक आणि इतर समाजमाध्यमातून मैत्री आणि पुढची सगळी क्रियाकर्म उरकणार्‍यांनी काही तरी शिकावे अशी किमान अपेक्षा...
 
 
 
तर मोहम्मद शफी याने फेसबुकवर श्रीदेवी असे महिलेचे नाव घेऊन अकाऊंट उघडले. तीन वर्षांपूर्वी या अकाऊंटच्या माध्यमातून त्याचे आणि भगवल सिंगचे सूत जुळले. भगवल सिंग मोहम्मद शफी याला श्रीदेवी समजून स्वतःची सुखदुःख सांगू लागला. श्रीदेवी उर्फ मोहम्मद शफीने सांगितले की, ती अशा एका व्यक्तीला ओळखते, जो जादूटोणा करून भगवल सिंगची आर्थिक तंगी दूर करेल. श्रीदेवीने मोहम्मद शफीशी म्हणजे स्वतःशीच भगवल सिंगशी प्रत्यक्ष भेट करून दिली. मोहम्मद शफीने भगवल आणि लैलाला सांगितले की, नरबळी दिला तर देव प्रसन्न होईल आणि भगवलच्या घरी संपत्ती येईल. नरबळी मिळवून देण्यासाठी स्वत: शफीने पुढाकार घेतला. त्याने रोसलीन आणि पद्माला कसे संपर्कात आणले, याबाबत प्रसारमाध्यमात जे समोर आले ते पाहून तर वाटले की, ही इतकी अधोगती...एकीला ‘ब्ल्यू फिल्म’मध्ये काम देतो म्हणून तर दुसरीला देहविक्री केली तर 15 हजार रुपये देईन, या प्रलोभनाने मोहम्मद शफीने या दोघींना जाळ्यात ओढले होते.
 
 
 
बरं, मोहम्मद शफी रोसलीन आणि पद्माच्या संपर्कात कसा आला तर तेही फेसबुकच्या माध्यमातून. या दोघी रस्त्याच्यावर लॉटरी विकायच्या, हे विशेष. वय वर्ष 50च्या पुढच्या दोघी. पण, मोहम्मद शफीशी फेसबुकवर त्यांचा संपर्क झाला. प्रलोभनामुळे या दोघी शफीच्या जाळ्यात अडकल्या. रोसलीन जून महिन्यात तर पद्मा सप्टेंबर महिन्यात. मान्य आहे त्याही गरिबीला कंटाळल्या असतील. झटपट पैसे कमावण्यासाठी कदाचित पहिल्यांदाच त्यांनी हे पाऊल उचलले असेल. नव्हे, मोहम्मद शफीने त्यांना भरीस पाडले असेल. शफी हा विकृत गुन्हेगार होताच. 2020 साली 75 वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करून तिच्या गुप्तांगावर शस्त्राने हल्ला केला, म्हणून त्याला तुरूंगवास झाला होता. प्रसारमाध्यमातल्या एका बातमीनुसार, हा शफी संपत्ती लवकर यावी म्हणून भगवल समोरच त्याच्या पत्नीशी लैलाशी लैंगिक संबंध ठेवायचा.
 
 
तसेच रोसलिनचा नरबळी देताना तिला जास्त यातना दिल्या नाहीत, म्हणून देव प्रसन्न झाला नाही, असे शफीने भगवलला सांगितले. त्यावरही त्याचा विश्वास बसला. त्यामुळे पद्माचा खून अत्यंत भयानक यातना देऊन करण्यात आला. तिच्या शरीराचे तुकडे तर करण्यात आलेच, पण अवयव खाल्ले सुद्धा! जर रोसलीन आणि पद्मा या महिलांनी अभासी तंत्रज्ञानाद्वारे संपर्क झालेल्या अनोळखी शफीवर विश्वास ठेवला नसता तर त्या आज जीवंत असत्या. आजकाल बहुसंख्य लोक आपल्या जवळ दृश्यमानाने असणार्‍या नातेवाईकांपेक्षा अनोळखी लोकांशी आभासी स्वरूपाच्या प्रसारमाध्यमाद्वारे संवाद साधण्यात मग्न असतात. ज्या व्यक्तीबद्दल त्यांना शून्य माहिती असते, त्या व्यक्तीसमोर आपले भावविश्व उघड करतात. का? इतका विश्वास अनोळख्या व्यक्तीवर? रोसलिन आणि पद्माच्या भयानक मृत्यूने तरी समाजाने धडा घ्यायला हवा!
 
 
 
या घटेनेने देश हादरला असतानाच या घटनेच्या दोन-तीन दिवसांनंतर पुन्हा केरळच्या या पथानामथिट्टामध्ये दुसरी घटना घडली. गुन्हेगार शोभना उर्फ वसंता हिच्यावर पोलीसही कारवाई करायला कचरत होते. पोलीस तिच्यावर कारवाई करायला का घाबरत होते, तर शोभना हिने अंधश्रद्धेमुळे एका बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. त्याचा बळी घेण्याआधी ती विचित्र हातवारे करत असल्यामुळे मुलगा भेदरला आणि आरडाओरडा करू लागला. त्या आवाजाने लोक जमा झाले. यापूर्वी कुणी तिच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण, ती म्हणे जो कोणी तिच्या विरोधात जाईल, त्याला ती शाप देणार. त्यामुळे पूर्वी कुणीही तिच्या विरोधात गेले नाही. मात्र, आता तिने एका चिमुकल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लोक संतापले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र, पोलीसही तिच्यावर कारवाई करायला धजावत नव्हते. कारण, त्यांनाही भीती वाटत होती की, त्यांनी कारवाई केली आणि शोभनाने शाप दिला तर? पण, लोकांच्या आंदोलनामुळे शेवटी तिला अटक करावी लागली.
 
 
 
2018 सालीही केरळ असेच हादरले होते. इडुक्की, केरळ येथे कृष्णन आणि त्याची पत्नी सुशीला आणि त्यांच्या दोन अपत्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. कारण काय तर कृष्णन हा परिसरात जादूटोणा, काळी जादू वगैरे करणारा म्हणून प्रसिद्ध होता. या सगळ्या माध्यमातून त्याने खूप पैसेही जमवले होते. कृष्णनकडे अनिष नावाचा व्यक्ती कामाला होता. त्याच्या अंधश्रद्धा तंत्रमंत्रामध्ये तो पडेल ते काम करायचा. अनिषला असे वाटायचे की, कृष्णनला मारून टाकले, तर कृष्णनची शक्ती त्याला येईल आणि तोही कृष्णन सारखाच काळ्या जादूचा शक्तिमान आणि श्रीमंत होईल.त्याने कृष्णनचा खून केला. खून करताना पाहिले, म्हणून कृष्णनच्या पत्नीचा आणि मुलीचा तसेच गतिमंद मुलाचाही खून केला. काय म्हणावे या अंधश्रद्धेला अन् गैरसमजाला? देवभूमी म्हणवणार्‍या आणि 100 टक्के साक्षर असलेल्या आणि पुरोगामित्वाचे गोंदणच भाळी आहे, असा अविर्भाव असलेल्या केरळमधील या सगळ्या घटना!
 
 
इथे आणखीन एक नमूद करावेसे वाटते की, जेव्हा या घटना घडत होत्या तेव्हा काँग्रेसचे नेते आणि केरळच्या वायनाड जिल्ह्याचे खासदार राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ यात्रा करत होते. केरळमधल्या अनेक अबालवृद्ध स्त्रिया त्यांना भेटत होत्या. राहुल गांधी किंवा त्यांच्या यात्रेत सहभागी असलेल्यांना केरळमधील या काळ्या जादूचा गंभीर प्रश्न कुणीही सांगितला नसेल का? कारण, याच यात्रेदरम्यान केरळमध्ये हे क्रूर हत्याकांड घडत होते. राहुल यांनाच का, तर केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आणि स्थानिक कार्यकर्त्यांना कुणालाच केरळमधील या काळी जादू वगैरे अंधश्रद्धेबाबत कधीच माहिती मिळाली नाही का? तसेही धर्म आणि अधर्म याची सीमारेषा मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तर केव्हाच ओलांडली आहे. केरळमध्ये दरवर्षी रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्याही अशाच क्रूर हत्यांचे सत्र अजूनही कायम आहे. त्यात भाकपचे कार्यकर्ते-पदाधिकारी गुन्हेगार असल्याचेही निष्पन्न होते.
 
 
 पण, त्याची खंत किंवा लाज या मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कधीही व्यक्त केली नाही आणि हो, त्यांच्या पिलावळींनीही याबाबत मौनच बाळगले. तेच आता केरळच्या या विकृत हत्याकांडाबाबत होताना दिसते. विकृत भयानक हत्याकांडाबद्दल मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे प्रवक्ते पीआर प्रदीप यांनी काय प्रतिक्रिया द्यावी? तर या प्रवक्त्या महाशयांचे म्हणणे की, ”भगवल सिंग हा पार्टीचा कार्यकर्ता होता, त्याच्यासोबत आम्ही पार्टीचे कार्यक्रमही केले. पण, तो पूर्वी पुरोगामी होता. दुसरा विवाह केल्यानंतर तो धार्मिक झाला. कदाचित हा त्याच्या पत्नीचा प्रभाव असेल.” आता काय म्हणावे? म्हणजे पीआर प्रदीप या मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या प्रवक्त्याचे म्हणजे अर्थातच पर्यायाने मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे म्हणणे असे आहे की, भगवल सिंगने रोसलीन आणि पद्माचा क्रूर यातना देऊन नरबळी दिला. कारण, भगवल सिंग धार्मिक झाला होता. पण, तसे असेल तर भगवलची दुसरी पत्नी लैला हीसुद्धा या पक्षाची सक्रिय कार्यकर्ताच होती. धार्मिक आणि अधार्मिक याचा अर्थ तरी या पक्षाच्या प्रवक्त्याला आणि खुद्द पक्षाला माहिती आहे का? केरळमधील या हत्याकांडाचा आणि करोडो धार्मिक लोकांच्या श्रद्धेचा आणि धर्मसंवेदना विचारांचा अपमान करणार्‍या या प्रवक्त्याचा आणि त्याच्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादीचा निषेध करावा, तेवढा कमीच!
 
 
जगभरातील अंधश्रद्धेचा भयानक पगडा
 
 
हे काय केरळमध्येच आहे? देशभरात अशा जादूटोण्यामुळे वर्षाला शंभरच्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात. जगभरात अंधश्रद्धेचा भयाण पगडा आहे. त्याचा आढावा इथे जागेअभावी घेणे शक्य नाही. मात्र, काही घटना उदाहरणादाखल घेऊ. मागे एक बातमी वाचली होती की, कॅथलिक समुदायाच्या मागणीनुसार व्हॅटिकन चर्चने एक कोर्स सुरू केला. 50 देशातील 250 पादरी 24 हजार रुपये शुल्क भरून जादूटोणा शिकण्यासाठी रोमला गेले. या कोर्सचे नाव आहे ‘एंटाईटल्ड एक्सॉर्सिजम अ‍ॅण्ड द प्रेयर ऑफ लिबरेशन.’ हा कोर्स 2005 साली सुरू झाला. या कोर्समध्ये म्हणे जादुटोण्याचे धार्मिक, मनोवैज्ञानिक आणि मानवशास्त्रीय आयाम शिकवले जातात. असो. खरे खोटे तर देवच जाणो! याच जादूटोण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघटनेकडून एक विधान केले गेले. संयुक्त राष्ट्र संघाने सांगितले की, नायजेरीयातल्या गरीब महिलांना देहविक्रीकरिता पाश्चात्य देशात नेले जाते. या महिलांनी देहविक्री स्वखुशीने करावी, यासाठी त्यांच्यावर जादूटोणा झाला असल्याचे भासवले जाते. दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान त्यांच्या तिसर्‍या पत्नी बुशरा बीबी आणि तिने पाळलेला जिनच इमरान खान यांना सातत्याने यश देत होता, हे बहुसंख्य पाकिस्तानी शपथेवर सांगतात.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.