आधारवेल : रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई

    01-Oct-2022   
Total Views |
झाशीची राणी

 
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक मोठमोठ्या राजकीय आणि सामाजिक उलाढाली घडल्या आणि उत्तरार्ध नवीन सामाजिक बदल घडत होते. दोन्हीं विभागांत कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वांत आणि कर्तृत्वांत कालानुरूप फरक दिसून येतो. राणी लक्ष्मीबाई यांनी पहिले अर्धशतक आपल्या अद्वितीय गुणांनी गाजविलें. झाशी संस्थानचे प्रमुख सुभेदार गंगाधररावांचे निधन झाल्यावर झाशीची रणरागिणी लक्ष्मीबाई या आधारवेलीने संस्थानाची नव्याने घडी बसवली.
 
राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८३५ मध्ये बनारस येथे झाला. इ. स. १७४३ मध्ये पेशव्यांनी निर्माण केलेल्या झांशी संस्थानचे प्रमुख सुभेदार गंगाधरराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. इ. स. १८५३ साली सुभेदार गंगाधरराव वारल्यानंतर त्या वेळच्या गव्हर्नर-जनरलने लक्ष्मीबाईस दत्तक पुत्र घेण्याची परवानगी नाकारली. कंपनी सरकारविरुद्ध दावा लावण्यासाठी राणीने जॉन लँग याला आपला वकील नेमले.
 
 
लँग याने राणीचें वर्णन पुढील शब्दांत केले आहे "मध्यम बांध्याची अतिशय सुदृढ अशी ही स्त्री होती. माझ्या मते तिचा चेहरा सौंदर्यदृष्टीने विचार केल्यास जरा जास्त गोल होता. एवढी गोष्ट सोडल्यास या वयातही तिच्या चेहऱ्यांत भरपूर आकर्षण आहे. लहानपणी तिची गणना सौंदर्यवती स्त्रियांत होत असली पाहिजे. तिच्या चेहऱ्यावरून कोणीही तिच्या कुशाग्र बुद्धीची कल्पना करू शकेल. तिच्या नाकाची ठेवण व टपोरे आणि बोलके डोळे हे तिच्या सौंदर्याचे विशेष म्हणून सांगता येतील. "
 
राणीने इंग्लंडच्या कोर्टात त्यावेळी लावलेला दावा निष्फळ ठरला आणि झांशी राज्य विलीन करून राणीला महिना पांच हजार रुपये पेन्शन देण्याचे ठरले. पूर्वीचा लवाजमा बाळगून त्यावेळी जगण्यास ही रक्कम अगदीच अपुरी होती. राणीच्या स्वाभिमानी स्वभावास हे नियंत्रण दिवसेंदिवस असह्य होऊ लागले. " मी माझी झांशी सोडणार नाहीं " या एकाच वाक्याचा जप करीत राणी आंतल्या आंत धुमसत होती. पण बराच काळ तिला कांहीही करतां आलें नाहीं.
 
१० मे १८५७ रोजी मेरठ आणि दिल्ली या ठिकाणी फौजेंतील कांहीं शिपायांनीं ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड पुकारले. हळूहळू हा वणवा सर्व उत्तर भारतांत पसरला. ५ जूनला झांशी बंडात सामील झाली आणि ९ जूनला सर्व संस्थानांत राणीची सत्ता प्रस्थापित झाल्याचे जाहीर करण्यांत आलें. या दिवसापासून ४ एप्रिल १९५८ पर्यंत सर रोज याच्याशी राणीने यशस्वी रीतीनें सामना देऊन झांशीचें स्वातंत्र्य टिकविले.
 
 
शत्रुसैन्यापुढे टिकाव धरणे अशक्य झाले तेव्हां ब्रिटिश सैन्याची फळी फोडून ती निसटली. वाटेंत बुंदेलखंडांत काल्पी व कूंच येथे ब्रिटिश सैन्याशी तिनें घनघोर संग्राम केला. यानंतर तिची तात्या टोपेशीं गांठ पडली. दोघांनी परत सैन्याची जमवाजमव सुरू केली. रजपूत आणि ब्राह्मण सैनिकांचे पायदळ व रोहिले आणि मुसलमान यांचीं घोडदळे सज्ज झाली. बरोबरीनें सर्व कष्ट राणीने हंसतमुखानें सहन केले आणि स्वतः युद्धांत भाग घेतला. तिच्या एका नोकरानें ग्वाल्हेरच्या मेजर मॅक्फसेनला यासंबंधी सांगतांना असे म्हटले आहे कीं, "राणीची अशी पद्धतच असे की स्वतः घोडदळाचे नेतृत्व करायचे आणि किरमिजी रंगाची विजार, त्याच रंगाचे जाकीट आणि पांढरा फेटा बांधून ती घोड्यावर चढली कीं ' हा पुरुष की स्त्री' हे कोणालाहि ओळखतां येत नसे."
२३ मे १८५८ ला ग्वाल्हेरच्या पूर्वेस १०० मैलांवर असलेले
 
यमुनेच्या कांठावरील काल्पी हे ठिकाण जनरल रोझने जिंकले. तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी जंगलाचा आश्रय घेतला. ह्यू रोझला वाटले की बंडाचा बीमोड झाला. म्हणून त्याने सैन्याला रजा दिली. परंतु राणी आणि तात्या टोपे यांनी अचानक छापा घालून ४ जूनला ऐन उन्हाळ्यांत ग्वाल्हेरचा प्रसिद्ध किल्ला जिंकला. ग्वाल्हेरचा राजा किल्ल्यांतून पळाला आणि बहुतेक सर्व सैनिक राणीच्या बाजूला येऊन मिळाले. त्यावेळी मध्यभारतांतील परिस्थितीचा आढावा घेतांना सर ह्यू रोझनें असें म्हटलें आहे कीं, "राणीची उच्च कुलीनता, सैनिकांना ती दाखवीत असलेलें औदार्य आणि तिचें धैर्य यामुळे ती एक प्रबळ व धोकेबाज शत्रु बनली आहे. ग्वाल्हेरच्या सैन्यांत उत्कृष्ट शिस्तीचे आणि शिक्षण घेतलेले शूर शिपायी असल्याने या प्रथम श्रेणीच्या सैन्यानिशीं राणीचा पाडाव करणे ही अत्यंत कठीण कामगिरी होऊन बसलेली आहे "
 
 
ग्वाल्हेरच्या किल्ल्याजवळ मोरार या ठिकाणीं जनरल रोझ १६ जूनला पोहोचला. कँपचा कांहीं भाग व दारूगोळ्याचा सांठा त्यानें आपल्या ताब्यात घेतला. दुसऱ्या दिवशीं ब्रिटिश सैन्यानें फूलबाग येथें राणीच्या घोडदळावर हल्ला केला. ब्रिटिश सैनिकांजवळ आधुनिक पद्धतीच्या तोफा आणि बंदुका होत्या. त्यामुळे तलवारी आणि जुन्या पद्धतीच्या बंदुकांनी सज्ज अशा राणीच्या सैन्याचा पाड लागेना. राणी स्वतःच लढाईचे नेतृत्व करीत होती. तिनें शौर्याची शिकस्त केली. पण दुर्दैवानें ती या लढाईत मारली गेली.
 
लढाई प्रत्यक्ष पाहिलेल्या एका माणसानें असें लिहून ठेवलें आहे कीं, "राणी,तिच्या पतीची एक प्रेयसी जी तिच्यासारखाच वेष करी व नेहमी तिच्याजवळ राही, सुमारे ४०० घोडेस्वार सोबत घेतले असतांना ब्रिटिश सैन्य चालून येत असल्याची बातमी तिला मिळाली. लागोपाठ ५० निवडक आयरिश घोडेस्वार बंदुकीच्या फैरी झाडीत जवळ येऊन ठेपले. राणीजवळ फक्त १५ स्वार थांबले, बाकीचे घाबरून पळून गेले. राणी पटकन् घोड्यावर स्वार झाली. पण ओढ्यावरून उडी मारण्यास घोडा कचरूं लागला. इतक्यांत तिच्या बरगडीत एक गोळी येऊन घुसली.
 
 
लगेच एका ब्रिटिश सैनिकाने तिच्या डोक्यावर जोराचा वार केला. तशा स्थितींतही ती थोडी पुढे गेली व धाडकन् खालीं पडून तिचें १८ जून १८५८ साली प्राणोत्क्रमण झालें. शेजारी असलेल्या लोकांनीं तेथेंच तिचें दहन केलें.” अशा रीतीनें ही शूर महिला घरापासून, आपल्या नातेवाइकांपासून दूर युद्धभूमीवर शत्रूशी दोन हात करतां करता धारातीर्थी पडली. झाशी संस्थांनची ही आधारवेल सदैव तिच्या पराक्रमाने स्मरणात राहणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक, सुरुवातीला 'नागपूर तरुण भारत' येथे दोन वर्ष स्तंभ लेखन. दै. 'सोलापूर तरुण भारत'मध्ये 'गाभारा' ही मंदिरावर आधारित लेखमाला प्रकाशित. महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी विविध विषयांवर लेखन. इंदूरहून निघणाऱ्या 'मराठी गौरव' या पाक्षिकासाठी लेखन. 'प्रज्ञालोक' या त्रैमासिकात लेखन तसेच 'प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय'. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'कालजयी सावरकर' या नावाने प्रकाशित सावरकर विशेषांकात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' या विषयावर लेखन. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन. 'साप्ताहिक विवेक'मध्ये गेली दोन वर्षे झाले 'पद्मगौरव' स्तंभ सुरू. आकाशवाणी व इतरही माध्यमातून सतत लेखन.