मुंबई : खासदार संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या निलंबनावरुन आता भाजपवर टीका केली आहे, सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केलं होतं. महाविकास आघाडी सरकारला हा मोठा दणका दिल्याचे सांगितले जात आहे. हे निलंबन बेकायदेशीर असल्याचे सांगत हा ऐतिहासिक निकाल दिला. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात आता राज्यसभा खासदारांच्या निलंबनाचा आणि राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
राऊत म्हणाले, "आमदारांना निलंबित करणे हा निर्णय पूर्णपणे विधानसभेचा आहे. राज्यसभेतील काही खासदार निलंबत झालेत. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निकाल दिलेला नाही. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त १२ आमदार दोन वर्षांपासून वाट पाहत आहेत. राज्यपालांकडे फाईल पडून आहे. त्याबद्दल ते काहीच निर्णय घेत नाहीत. याबद्दलचे सर्वस्वी अधिकार राज्यपालांकडेच येतात. त्यात सर्वोच्च न्यायालय दखल घेणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, "मला याबद्दल आश्चर्य वाटते आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी धिंगाणा घातला होता. विधानसभेत गदारोळ घातला आणि शिस्तभंगाची कारवाई झाली त्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूती दाखवली.", असेही राऊत म्हणाले.