उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका : केशव उपाध्ये

शिवसेना उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे केशव उपाध्ये यांच्यात ट्विटर वॉर

    28-Jan-2022
Total Views |

Twitter
 
 
मुंबई : एकीकडे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. तर, दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडी सरकावर टीका करण्यास सुरुवात केली. यावर आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप नेते केशव उपोध्ये यांच्यात चांगलेच ट्विटर वॉर पाहायला मिळाले.
 
 
 
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी 'आज लोकशाहीचे संरक्षण झाले' असेदेखील म्हंटले. यावर उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत म्हंटले की, "अभिनंदन! आनंद आहे “लोकशाही” वाचली याचा, पण अध्यक्षमहोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासुन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे. त्यावरही शोभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त ५०लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम १२ करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे."
 
 
 
 
उर्मिला मातोंडकर यांच्या या ट्विटवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले की, "थोडी माहिती घ्या. आपलं वाचन चांगलं आहे, असे ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय, तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितलं नाही."
 
 
 
 
यावर पुन्हा उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर देताना ट्विट केले की, "अर्थातच विषय पुर्णतः वेगळे आहेत म्हणूनच 'आनंद/अभिनंदन'. पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे आणि लोकशाहीचा तर आहेच आहे. त्यामुळे 'वडाची साल' ऐवजी 'आपला तो बाब्या' जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी. त्याने माझे काम थांबलेले नाही."
 
 
 
 
यावर टीका करताना केशव उपाध्ये यांनी सांगितले की, "आपली जळजळ, तळमळ ही केवळ 'आमदारकी'साठीच आहे. हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील 'प्रतिक्रियावादी' भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा." असे सडेतोड उत्तर दिले.