ठाणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक रक्कमी पाच हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन हजार कलाकारांना हे अर्थसहाय्य देण्यात येणार असून यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य, कलाक्षेत्रात १५ वर्षे काम केल्याचे पुरावे तसेच वार्षिक उत्पन्न ४८ हजार असलेल्या कलाकारांनाच शासनाचे अनुदान मिळणार आहे. तेव्हा या जाचक अटीमुळे "भीक नको पण कुत्रा आवर' अशी भावना कलाकारांची झाली आहे.
कोविड काळातील लॉकडाऊन आणि निर्बंधाचा फटका जसा उदयोग व्यवसायांना बसला होता, तसाच तो मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने एक रक्कमी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी नार्वेकर यानी अर्ज करण्याचे आवाहन केले असुन हे अर्ज नजिकच्या तहसीलदार कार्यालयात सादर करायचे आहेत. यासाठी लागणारा अर्जाचा नमुना सर्व तहसीलदार कार्यालय तसेच www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकरकमी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी शासनाने ठरविलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. एकल कलाकार सहाय्यासाठी कलेच्या क्षेत्रात १५ वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव्य आणि वार्षिक उत्पन्न ४८ हजारांच्या कमाल मर्यादेत असणे आवश्यक आहे.
'कलाकारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जावर छाननी समिती अर्जांची पडताळणी करेल. त्यानंतर पात्र यादी सांस्कृतिक कार्य संचालनाकडे अर्थ सहाय्यासाठी सादर करण्यात येईल. दरम्यान, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्यच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.', असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी स्पष्ट केले.