मनाच्या श्लोकांतही फलश्रुती सांगताना स्वामी श्रवण करणे म्हणजे ऐकणे, असा शब्दप्रयोग करतात. या ठिकाणीही श्रवण करणे म्हणजे अभ्यासपूर्ण श्रवण करणे, असा अर्थ घ्यावा लागतो आणि समर्थांना तोच अपेक्षित आहे. मनाच्या श्लोकांचा नीट अभ्यास केला, तर आपल्यात असलेले सर्व दोष नाहीसे होतात, असे स्वामींनी म्हटले आहे, दासबोधाच्या फलश्रुतीतही स्वामी ‘नाना दोष ते नासती’ असे म्हटले आहे. एकंदरीत पाहता मनाच्या श्लोकांची फलश्रुती आणि दासबोध ग्रंथाची फलश्रुती यात बरेच साम्य आढळते.
खाद्या ग्रंथाची फलश्रुती त्या ग्रंथाच्या वाचकांसाठी सांगण्याची परंपरा जुनी आहे. फलश्रुतीचा शब्दश: अर्थ त्या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने मिळणारा लाभ किंवा निष्पत्ती असा आहे. आजकाल जी पुस्तके प्रकाशित होतात, त्यातील आशयाची, विचारांची ओळख अथवा संक्षिप्त माहिती पुस्तकाच्या मलपृष्ठावर देण्याची पद्धत आहे. ती माहिती वाचून त्याच्याशी वाचकांच्या आवडीनिवडी जुळल्या अथवा त्यातील हकिगतीचे नावीन्य जाणवले, तर लोक ते पुस्तक विकत घेतात. हा प्रकार फलश्रुतीसारखा वाटला तरी त्यातील फरक म्हणजे पूर्वीच्या फलश्रुतीत वाचकांच्या हिताचा विचार करून ती सांगितलेली असते, तर आजकालच्या पुस्तकांच्या मलपृष्ठावर दिलेली माहिती लेखकाविषयी किंवा लेखनाविषयी, पुस्तकाचे नावीन्य सांगणारी असते. त्या वाचकांच्या हिताचा विचार असलेच असे नाही.
पूर्वापार परंपरेला अनुसरून समर्थांनी मनाच्या श्लोकांची फलश्रुती शेवटच्या श्लोकात सांगितली आहे. मनाच्या श्लोकांच्या अध्ययनातून सद्विचार, सदाचाराचे महत्त्व सज्जनांच्या संगतीची महती अहंकार दूर सारणे, परमेश्वराच्या भक्तीसाठी लागणारी समर्पण वृत्ती, लोककार्यासाठी चंदनाप्रमाणे झिजणे, वगैरे अनेक सद्गुण ‘राघवाचा पंथ’ स्वीकारण्यासाठी आचरणात आणावे लागतात, हे मनाच्या श्लोकांतून मिळणारे लाभ हितोपदेश पाहिले की, पुन्हा फलश्रुती ऐकण्याची गरज उरत नाही. पण, तरीही या सद्विचारांचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवून त्यांना अभ्यासात प्रवृत्त करावे, असे स्वामींना वाटले असावे, म्हणून शेवटच्या श्लोकात स्वामींनी फलश्रुती सांगितली आहे. दासबोध ग्रंथात मात्र स्वामींनी फलश्रुती सुरुवातीसच सांगून वाचकांना ग्रंथ वाचण्यास अभ्यासास प्रवृत्त केलेे आहे. स्वामींनी दासबोध ग्रंथ वाचनाचे फलित सुरुवातीस स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. दासबोधाच्या ‘ग्रंथारंभ लक्षण नाम’ या पहिल्या समासात स्वामींनी ग्रंथश्रवणाचे फळ मोजक्या शब्दांत सांगितले आहे.
आता श्रवण केलियाचे फळ।
क्रिया पालटे तत्काळ।
तुटे संशयाचे मूळ। येकसरा॥ (१.१.२८)
या ठिकणी स्वामी ‘श्रवण केल्याचे फळ’ असे म्हणत असले, तरी खर्या अर्थाने ‘या ग्रंथाचा अभ्यास केल्याचे फळ’ असे स्वामींना सांगायचे आहे. अर्थबोध न होता केलेले श्रवण समर्थांना मान्य नाही. अर्थ न जाणारा जे एखाद्या ग्रंथाचे नुसते श्रवण करतात, त्यांना समर्थांनी ‘मनुष्यवेशधारी पाषाण’ म्हटले आहे. समर्थ दासबोधात सांगतात की,
अर्थांतर पाहिल्यावीण। उगेेंचि करी जो श्रवण।
तो श्रोता नव्हे पाषाण। मनुष्यवेषें॥(८.६.७)
दासबोधातील विचारांचे जे लोक अभ्यासपूर्ण श्रवण करतात, त्यांचे वागणे एकदम बदलते. या श्रवणाने, अभ्यासाने अध्यात्मविषयक भगवंताविषयी मनातील संशय समूळ नाहीसे होतात. दासबोध ग्रंथाची फलश्रुती स्वामींनी दासबोधातील दशक १- समास १ यातील २८ ते ३६ या ओव्यांतून मार्मिकपणे सांगितली आहे. त्या फलश्रुतीचा थोडक्यात आशय असा आहे की, या ग्रंथाच्या अभ्यासाने परमार्थविषयक, भगवंतप्राप्तीविषयी सोपा व सुखाचा मार्ग सापडतो. कष्टप्रद साधनांची जरुरी राहत नाही. मनातील अज्ञान, दु:ख, भ्रम नाहीसे होऊन साधकाला ज्ञानप्राप्ती होते. त्यांच्या अंगी वैराग्य बाणते. अंत:करणात विवेक जागा झाल्याने व्यवहारात, प्रपंचात कसे वागावे ते नीट समजते. दुर्गुणी माणसे उत्तमलक्षणी होतात. त्याचा व्यवहारात फायदा असा होतो की, दुसर्याची लबाडी ओळखण्याइतपत धूर्तता व चातुर्य अंगी बाणते. आळशी माणसे आळस टाकून उद्योगी होतात. भक्तिमार्गाची निंदा करणारी माणसे या ग्रंथाच्या वाचनाने भगवंतभक्तीचा आदर करु लागतात. या ग्र्रंथांच्या अभ्यासाने माणसे कशी अंतर्बाह्य बदलतात, याचे सुरेख वर्णन फलश्रुतीत पाहायला मिळते. दासबोध श्रवणाने म्हणजे अभ्यासाने कशाप्रकारे अंतरंगात फरक पडतो, हे सविस्तर सांगून झाल्यावर स्वामी थोडक्यात सार सांगतात की,
ऐसी याची फलश्रुती। श्रवणे चुके अधोगती।
मनास होय विश्रांती। समाधान॥ (१.१.३७)
क्षणभरही निश्चल न राहणारे चंचल मन स्थिर होणे ही मनाला मिळालेली खरी विश्रांती, ज्यांनी अनुभवली त्यांना समाधान म्हणजे काय, ते समजते.
मनाच्या श्लोकांतही फलश्रुती सांगताना स्वामी श्रवण करणे म्हणजे ऐकणे, असा शब्दप्रयोग करतात. या ठिकाणीही श्रवण करणे म्हणजे अभ्यासपूर्ण श्रवण करणे, असा अर्थ घ्यावा लागतो आणि समर्थांना तोच अपेक्षित आहे. मनाच्या श्लोकांचा नीट अभ्यास केला, तर आपल्यात असलेले सर्व दोष नाहीसे होतात, असे स्वामींनी म्हटले आहे, दासबोधाच्या फलश्रुतीतही स्वामी ‘नाना दोष ते नासती’ असे म्हटले आहे. एकंदरीत पाहता मनाच्या श्लोकांची फलश्रुती आणि दासबोध ग्रंथाची फलश्रुती यात बरेच साम्य आढळते. मनाच्या श्लोकांची फलश्रुती सांगणारा शेवटचा 205वा श्लोक असा आहे.
मनाचीं शतें ऐकतां दोष जाती।
मतिमंद ते साधनायोग्य होती।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।
म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी॥
समर्थ हे एक अलौकिक ग्रंथकार आहेत. लोकजीवनाचा उद्धार व्हावा, लोकांचे अज्ञान नाहीसे व्हावे, त्यांच्यातील दुर्बलता, त्यांचे दु:ख नाहीसे व्हावे, असे उदात्त हेतू मनात ठेवून समर्थ ग्रंथ लिहायला अथवा सांगायला घेतात. मूर्तिमंत वैराग्य असलेले समर्थांसारखे निरिच्छ संत केवळ हौस म्हणून किंवा लोकप्रियता, प्रसिद्धी, पैसा, नेतेपण मिळवण्यासाठी ग्रंथलेखन करीत नाहीत. या निरिच्छ संतांची एवढीच अपेक्षा असते की, लोकांच्या अंतरंगात जाणवणारी अपूर्णता, त्यांच्यातील वैफल्य, अज्ञान, दौर्बल्य नाहीसे करून लोकांना मुक्त स्वातंत्र्याचा अर्थात मुक्तीचा लाभ मिळवून घ्यावा. हा प्रयत्न इतर समर्थवाड्.मयाप्रमाणे मनाच्या श्लोकांतूनही स्वामींनी केला आहे. फलश्रुतीच्या या प्रस्तुत श्लोकात स्वामी सांगतात की, या श्लोकांच्या श्रवणाने श्रोत्यांचे सर्व दोष निघून जातील, चित्त निर्दोेष झाल्याने मनाची प्रसन्नता वाढेल. सामान्य दर्जाची अक्कल अथवा शहाणपणा अंगी असणारी माणसे थोडी आळशी असतात. कुठल्याही गोष्टीत त्यांना स्वारस्य नसते. आपल्याला काय करायचे आहे, उगीच बुद्धीला विचारांना ताण देऊन हे जाणण्याची आवश्यकता आहे का, असा विचार करुन सामान्य वकुबाची माणसे अभ्यासाच्या किंवा साधना करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. समर्थ अशा माणसांना ‘मतिमंद’ म्हणतात. मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने अशा ‘मतिमंद’ माणसांनाही आपण अभ्यास करावा, साधना करावी असे वाटू लागते. त्यांच्यातील निष्काळजीपणा जाऊन ते साधना करण्यास योग्य होतात. या श्लोकांतील विचारांवर विश्वास ठेवला, तर वाचक खर्या स्वातंत्र्याची मुक्तीची स्थिती अनुभवू शकतात. त्यांच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य व सामर्थ्य जाणवू लागेल आणि ते वाढत्या श्रेणीतील म्हणजे ‘चढे’ असे असेल. हे सारे गुण सतत वाढत आहेत, अशी प्रचिती मनाच्या श्लोकांच्या अभ्यासकांना येईल. ज्ञान-वैराग्य-सामर्थ्य हे सतत ‘चढे’ ठेवणारे उच्चप्रतीचे गुण प्राप्त झाल्यावर वाचक त्यापासून मागे फिरणार नाही. स्वामींनी ही फलश्रुती अत्यंत थोडक्या शब्दांत परिणामकारकरीत्या मांडली आहे. मनाच्या श्लोकांतील विचारांसंबंधी उत्सुकता वाढावी म्हणून फलश्रुतीचा हा खटाटोप अगोदर घेतला. नंतर श्लोकांचा आस्वाद घेऊ.
सुरेश जाखडी
7738778322
svjakhadi@gmail.com