समर्थ रामदासस्वामींनी दासबोधाच्या समास १४.३ मध्ये कवित्वाचे चार प्रकार सांगितले आहेत. मनास येईल ते धीटपणे सांगून बळेच कविता रचली, ते ‘धीटकाव्य’ होय. अनेक ग्रंथ पाहून त्यातील काही भाग पाठ करून त्याप्रमाणे रचना असलेली कविता लिहिणे हे झाले ‘पाठकाव्य.’ सरावाने कुठल्याही विषयावर लगेच कविता रचता येते, असे ‘शीघ्रकवित्व’ आल्यावर मनात येईल, त्याविषयावर लगेच कविता करणे याला ‘धीटपाठ काव्य’ म्हणतात.
हे झाले तीन काव्यप्रकार. या सर्व काव्यप्रकरांत शब्द चमत्कृती, शृंगारादी रस असले, तरी त्यात भक्तीरस असत नाही. हे आपण मागील काही लेखांतून पाहिले. आता काव्याचा चौथा प्रकार म्हणजे ‘प्रासादिक काव्य.’ या काव्याची रचना करणारा ‘प्रासादिक कवी’ या तिघांपेक्षा वेगळा असतो. तत्कालीन मान्यतेनुसार संतांच्या अंतःकरणात भगवंतकृपेने शारदा प्रतिभाशक्तीच्या रुपाने प्रगट होते. ही प्रतिभाशक्ती भगवंताकडून आलेली असल्याने ती अत्यंत पवित्र असते.
त्यामुळे ‘प्रासादिक’ कवीच्या अंतःकरणात सर्वोत्तमाचे ध्यान लागलेले असते. प्रापंचिक गोष्टीत त्याला रस वाटत नाही. त्यामुळे ‘प्रासादिक’ काव्यात भौतिक अथवा व्यावहारिक भावभावनांना किंमत उरत नाही. ‘प्रासादिक’ कवी परमेश्वराच्या पायी लीन झालेला असतो. तो भक्तिरंगात तल्लीन झालेला असतो. अशावेळी भगवद्कृपेने त्याच्या मुखातून जी नादमयी शब्दबद्ध वाणी बाहेर पडते, ते ‘प्रासादिक काव्य’ होय. ही वाणी हरिप्रसादाने आलेली असल्याने काव्यातून आत्म-अनात्म विवेक प्रगट होतो. त्यातून जनसामान्यांना विवेक समजतो. स्वामी सांगतात,
त्याचे भक्तीचे कौतुक। तया नाव प्रासादिक।
सहज बोलता विवेक। प्रगट होय॥
‘प्रासादिक काव्य’निर्मितीच्या अगोदर कवी असो वा संत, सर्वांना साधना करावी लागते. त्याव्यतिरिक्त कविता करणार्या व इतर कवींच्या बाबतीत सांगायचे, तर ते कवी शब्दज्ञान सांगतात. त्यांच्या काव्याचा भर केवळ शब्दज्ञानावर असतो. या शब्दज्ञानाला अनुभवाची जोड नसेल, तर त्या नुसत्या कोरड्या शब्दज्ञानाला संतजनांच्या, सज्जनांच्या दृष्टीने किंमत नसते. कारण, त्या काव्यात स्वानुभूती नसल्याने कवितेचा आत्माच हरवतो.
यासाठी स्वामी सुचवतात की, कवीने प्रथम साधना करुन भगवंताला भक्तीप्रेमाने आपलासा करून घ्यावा. त्यानंतर भगवंताची शक्ती शारदेच्या रुपाने कवीची प्रतिभा जागृत करते. अशावेळी त्या भक्ताच्या संताच्या मुखातून ‘प्रासादिक काव्य’ बाहेर पडते. सज्जनांच्या दृष्टीने सामान्य कवीच्या काव्यातील शब्दचमत्कृतीला अथवा अनुभव नसलेल्या शुष्कशब्द ज्ञानाला किंमत नसते. स्वामी ‘प्रासादिक काव्या’चे लक्षण पुढीलप्रमाणे सांगतात-
देवाचेन प्रसन्नपणे। जें जें घडे बोलणें।
तें तें अत्यंत श्लाघ्यवाणें। या नाव प्रासादिक॥
असे हे प्रासादिक कवी एक प्रकारे, आपल्या काव्यातून भगवंताची पूजा करीत असतात. या त्यांच्या काव्यपूजाविधीत ते वाचकांनाही सामील करून घेतात. त्यांनाही असल्या काव्यातून भगवंताच्या प्रसन्न प्रेमाचा अनुभव येतो. अशा काव्यावर संतसज्जनही लुब्ध असतात. समर्थांनी याचे सुरेख वर्णन केले आहे.
कवित्व शब्दसुमन माळा। अर्थ परिमळ आगळा।
तेणे संतषट्पदकुळा। आनंद होये॥
स्वामी म्हणतात, कवित्व ही शब्दांची गुंफण करून तयार केलेली ‘शब्दसुमनमाळा’ आहे. या शब्दांतून व्यक्त होणारा अर्थ हा या पुष्पांचा परिमळ आहे. फुलांचा हा सुगंध इतका अप्रतिम आहे की, संतरुपी भुंगे शब्दरुपी सुवासित फुलांवर लुब्ध होऊन त्यातील अर्थरुपी सुगंधाचा आस्वाद घेत आहेत. स्वामी हे रुपक पुढे चालवत असे सांगतात की, अशी ही काव्यमाला कवीने अंत:करणात गुंफावी आणि ती हृदयस्थ आत्मारामाला अर्पण करावी. मात्र, या पुष्पमालेचा दोरा ॐकारतंतू कधी तुटू देऊ नये. अध्यात्मात ॐकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ॐकार हा सर्व शब्दांचे व वाणीचे मूळ आहे. वैखरी, मध्यमा, पश्यन्ती आणि परा या चार वाणी आहेत. परावाणी ही ईशस्वरुपाच्या जवळ असल्याने निर्मळ आणि स्फूर्तिरूप असते.
शास्त्रकारांनी ॐकाराला ‘शब्दब्रह्म’ म्हटले आहे. तसेच, तो नादब्रह्मही आहे. त्यामुळे काव्यात ॐकाराचा धागा कायम ठेवून शब्दसुमनमाळा बांधावी, असे स्वामी म्हणतात. ॐकार साधनेने काव्यनादमधुर होते. तसेच, तो धागा कायम ठेवल्याने काव्य परमार्थापासून, अध्यात्मापासून दूर जात नाही. या काव्याने आत्मोन्नती होते व ते जगदोद्धार करते. व्यास, वाल्मिकीसारख्या कवींनी आपल्या काव्यातून जगाला विवेक शिकवला आहे. या संदर्भात प्रा. के. वि. बेलसरे लिहितात, “प्रासादिक वाणी असलेला हा पुरुष साधनकाळात अनुतापयुक्त व प्रार्थनाप्रधान काव्य करतो, तर सिद्धपणाच्या अवस्थेत स्वरुपानुभूतीचे रम्य वर्णन करतो आणि उपदेशपर रचना करतो, अशी कविता स्थलकालाच्या बंधनापलीकडे असते.
” या प्रासादिक काव्यांतून विवेक प्रगट होत असल्याने जगाला उपयोगी असे व्यास-वाल्मिकींचे काव्यवाड्.मय आज हजारो वर्षे टिकून आहे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या समकालीन संत आणि नंतरचे संत या कवींच्या रचना ७००-५०० वर्षांपूर्वीच्या असल्या, तरी त्या नादमयी प्रसन्न चैतन्यदायी भक्तिपूर्ण वातावरण तयार करतात. अनेक वर्षांचा काळ उलटून गेला, तरी तोच आनंद देण्याचे सामर्थ्य या काव्यात आहे आणि पुढेही तो आनंद अनेक पिढ्यांना मिळत राहील.या समासात स्वामींनी आपल्यासाठी कवित्व कसे असावे आणि कसे नसावे, यावरही चर्चा केली आहे. स्वामी सांगतात, कवित्व हे निर्मळ असावे. कवित्व सोपे असले पाहिजे. उगीच क्लिष्टरचना करत शब्दांच्या कोलांट्या मारत श्रोत्यांना संभ्रमित करू नये. काय सांगायचे, ते कवितेतून प्रांजळपणे सांगावे. त्यातील अर्थ दुरान्वयाने स्पष्ट होणारा नसावा. कवित्व मृदू, मंजुळ, कोमल तसेच आणखी कसे असावे, हे स्वामींच्या शब्दांत पाहा.
मृदू, मंजुळ, कोमल। भव्य, अद्भुत, विशाल।
गौल्य, माधुर्य, रसाळ। भक्तिरसे॥
कवित्व गोड मधुर भक्तिरसयुक्त असेल, तर त्याच्या वाचनाने मनात प्रेम उत्पन्न होते. त्यातून ज्ञान प्राप्त होते. माणसाच्या ठिकाणी ‘मी देह’ ही भावना पक्की असते, ही देहबुद्धी कवित्वाने नाहीशी झाली पाहिजे. उत्तम कविता हा अहंकार नाहीसा करते. देहबुद्धी नाहीशी झाल्यावर आत्मबुद्धी प्रकट होते. आत्मबुद्धीने संसारसागर आटू लागतो म्हणून उत्तम कवित्वाने प्रपंचाची बाधा नाहीशी होते. अंतःकरणात भगवंत प्रगट होऊ लागतो. या कवित्वाने माणसात सद्बुद्धी निर्माण होते. आपण अनेकदा अनेकांच्या तोंडून आत्मज्ञानविरोधी मते ऐकलेली असतात. ती सर्व या काव्याने भंग पावतात. मनातील त्यासंबंधीचा घोटाळा नाहीसा होतो. आत्मअनात्म विवेक जागा होतो. हे सर्व ज्याने साधते त्यालाच कवित्व म्हणावे, असे स्वामी सांगतात.
जेणे सद्बुद्धी लागे। जेणे पाषांड भंगे।
जेणे विवेक जागे। या नाव कवित्व॥
ज्या कवित्वाने जीवाचे समाधान होते, संसारबंधन तुटून जाते, अशा कवित्वाला सज्जन मान्यता देतात. या समासाच्या शेवटी समर्थ सांगतात की, तसे पाहिले तर उत्तम काव्याचे लक्षण सांगणे कठीण आहे. तथापि उत्तम काव्य ओळखता यावे, यासाठी थोडेसे वर्णन या समासात केले आहे.
ऐसे कवित्वलक्षण। सांगतां तें असाधरण।
परंतु काहीयेक निरूपण। बुझावया केले॥
-सुरेश जाखडी