नवी दिल्ली : “मुस्लीम -बिगरमुस्लीम यांच्यामध्ये होणारे विवाह समाजाच्या दृष्टीने वैध असले, तरीही ते ‘शरियत’च्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहेत. त्यामुळे असे विवाह होणार नाहीत, याकडे मुस्लीम कुटुंबांनी लक्ष द्यावे,” असा फतवा ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने (एआयएमपीएलबी) काढला आहे.
‘एआयएमपीएलबी’ कार्यकारी सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी हा फतवा जारी केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “इस्लाममध्ये मुस्लीम आणि बहुईश्वरवाद मानणार्या बिगरमुस्लिमांमध्ये होणार्या विवाहास परवानगी नाही. असे विवाह समाजाच्या दृष्टीने वैध वाटत असले तरीही शरियतच्या दृष्टीने ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचे आहे,” असे फतव्यात नमूद करण्यात आले आहे.
याविषयी मुस्लिमांसाठी दिशानिर्देशही जारी करण्यात आले आहेत. एकत्र काम करणे, धार्मिक शिक्षणाचा अभाव आणि माता-पित्यांच्या पालनपोषणामुळे सध्या बिगरमुस्लिमांसोबत आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रकरणांमध्ये मुस्लीम मुलींना त्रास सहन करावा लागत लागल्याचे समोर आले आहे. यासाठी माता-पिताच जबाबदार असून त्यांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही फतव्यात सांगण्यात आले आहे. माता-पित्यांनी आपल्या मुलांच्या मोबाईल फोनकडे लक्ष ठेवावे, प्रामुख्याने मुलींना सर्वसामान्य शाळांमध्ये पाठवू नये, मशिदींच्या इमामांनी धर्मांतच विवाह होण्याविषयी धार्मिक शिक्षण द्यावे आणि असे विवाह होत असल्यास धार्मिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, मदरशातील शिक्षक आणि जबाबदार नागरिकांनी अशा घरी जाऊन तरुण - तरुणींनी शिकवावे, असेही फतव्यात म्हटले आहे.