राज्यात रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; तर २,२२४ कोटींची आवश्यकता – अशोक चव्हाणांचे बदलते अंदाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2021   
Total Views |



33_1  H x W: 0


1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 30 जुलै रोजी वर्तविला होता


मुंबई, दि. 2 (सोमेश कोलगे): पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 30 जुलै रोजी वर्तविला होता. विशेष म्हणजे त्यावेळी राष्ट्रीय महामार्गांच्या अनुषंगाने नितिन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली होती. मात्र आज एकूण २२२४ कोटींची आवश्यकता असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीचा आज सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विभागनिहाय आढावा घेतला. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, राज्यातील हानीग्रस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 2 हजार 224 कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता असल्याचे श्री. चव्हाण यांनी आज सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढावा बैठकीस विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव (बांधकामे) अनिलकुमार गायकवाड, मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगळे, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह सर्व विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंते हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्यात एकूण 4138 रस्ते/कॉजवे, पुल व मोऱ्यांची हानी झाली आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण रस्ते/पूल वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी कमी हानी झाली आहे. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी साधारण 290 कोटी तर कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी 1935 कोटी असे एकूण 2 हजार 224 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@