७५ वर्षांनंतर सुरक्षेची आव्हाने ; सद्यस्थिती आणि उपाययोजना (भाग-१)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2021   
Total Views |

china_1  H x W:
 
 
सध्या चीनचे भारताविरुद्ध एक नवीन प्रकारचे युद्ध सुरु आहे. त्याला ‘हायब्रिड वॉर’, ‘झोन वॉर फेअर’ किंवा ‘अनरिस्ट्रिक्टेड वॉर’ किंवा ‘अनियमित युद्ध’ म्हणून ओळखले जाते. हे युद्ध ३६५ दिवस सुरू असते आणि वेगवेगळ्या स्तरावरती लढले जाते. या युद्धाचा उद्देश आहे की, भारतात हिंसाचार वाढवून, अराजकता माजवून, भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग कमी करायचा, त्यामुळे भारत हा चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येणार नाही आणि कायमचा चीनच्या अधिपत्याखाली राहील.
 
 
पारंपरिक युद्धाचे आव्हान
 
 
 
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पुढची २४ वर्षे म्हणजे १९७१ पर्यंत आपण चार पारंपरिक युद्धे लढलो. १९४७चे पाकिस्तानशी युद्ध एक वर्ष चालले. दुसरे पारंपरिक युद्ध चार आठवडे चीनशी १९६२ साली झाले. तिसरे युद्ध १९६५ साली चार आठवडे पाकिस्तानशी झाले. शेवटचे पारंपरिक युद्ध तीन आठवडे १९७१ साली झाले. या पारंपरिक युद्धामध्ये भारताचे सैन्य हे चीन, पाकिस्तानच्या सैन्याशी लढत होते. देशातील जनतेचा या युद्धांशी फारसा संबंध नव्हता.
 
 
काराकोरम युद्धाचे तीन भाग
 
 
१९७१ सालचे युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळले की, पारंपरिक युद्धात भारताशी लढून जिंकणे शक्य नाही. म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचे युद्ध १९७२ नंतर सुरू केले. ज्याचे नाव होते ‘ऑपरेशन काराकोरम.’
 
 
काराकोरम युद्धाचे तीन भाग होते. ‘काराकोरम-एक’ म्हणजे खलिस्तानी दहशतवाद, ‘काराकोरम-दोन’ म्हणजे कश्मीरमध्ये छुपे युद्ध किंवा दहशतवाद आणि ‘काराकोरम-तीन’ म्हणजे देशाच्या इतर भागात दहशतवाद.
 
 
‘ऑपरेशन काराकोरम’ची परिस्थिती
 
 
खलिस्तानी दहशतवादाचे कंबरडे मोडले गेले आहे. मात्र, त्यापेक्षा भयानक अफू, गांजा, चरसचा दहशतवाद (नार्को टेररिझम), पंजाब आणि सीमावर्ती भागात सुरू आहे. आज पंजाब आणि सीमावर्ती भागातील जवळपास ५० टक्के युवक हे नशेच्या आहारी गेले आहेत. या युवकांना जर वाचवायचे असेल, तर ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ला सीमा सील कराव्या लागतील. राजकीय पक्ष, पोलीस, सामाजिक संस्था आणि समाज यांना अफू, गांजा, चरस दहशतवादाच्या लढाईमध्ये एकत्रित लढावे लागेल.
 
 
काश्मीरमधे दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात आले आहे. लडाखमध्ये, जम्मू-उधमपूरमध्ये दहशतवाद नाही. परंतु, काश्मीरच्या खोर्‍यामध्ये आजही २०० दहशतवादी आहेत. भारतीय सैन्य अविरत ऑपरेशन्स लॉन्च करून त्यांना मारत असते. मात्र, सध्या अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्याच्या वापसीमुळे, अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात गृहयुद्ध सुरू आहे. तालिबानला पाकिस्तान, चीन मदत करत आहे. तालिबान सत्तेमध्ये आले, तर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने भारतात दहशतवाद वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, म्हणून दहशतवादाच्या लढाईकरिता भारतीय सैन्याला अजून रक्त सांडण्याकरिता तयार राहावे लागेल.
 
 
भारताच्या इतर भागात दहशतवादी हल्ले करण्यापासून थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. मात्र, समुद्राकडून तस्करी, बेकायदेशीर व्यापार आणि बांगलादेशी घुसखोरी सुरू आहे. येत्या काळात नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांना डोळ्यात तेल घालून सागरी सुरक्षा मजबूत करावी लागेल.
 
 
भारतात नक्षलवाद/डावा दहशतवाद/माओवाद संपत नाही. माओवाद संपविण्याकरिता अर्धसैनिक दले आणि पोलिसांना दंडकारण्य, अबुजमाड जंगल आणि सरंदा जंगलांमध्ये घुसून माओवाद्यांचे ट्रेनिंग, इतर कॅम्प आक्रमक कारवाई करून उद्ध्वस्त करावे लागतील. तसे झाले तरच माओवाद्यांवर आपल्याला विजय प्राप्त करता येईल.
 
 
बाह्य सुरक्षेची आव्हाने
 
 
सीमेवर पाकिस्तान दहशतवादी भारतात घुसवण्याचा प्रयत्न करतो. याला आपण चांगले प्रत्युत्तर देत आहोत. भारताने चीनला लडाखमध्ये चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. गलवानच्या लढाईमध्ये आपण चीनचे 70हून जास्त सैनिक मारले होते.
 
 
चीनने ५ मे, २०२०ला अतिक्रमण केले. चीन पाच जागांपैकी तीन जागांपासून परत गेला आहे. मात्र, डेपसांगमधून परत जायला तयार नाही. विविध प्रकारे दबाव टाकून चीनला मागे ढकलण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. चीनबरोबर पारंपरिक लढाईची आपल्याला चिंता नको, चिंता आहे ती ३६५ दिवस चालणार्‍या ‘हायब्रिड वॉर’ची.
 
 
नवीन युद्ध, ‘अनरिस्ट्रिक्टेड वॉर’/‘हायब्रिड वॉर’
 
 
2014 नंतर नवीन युद्ध सुरू झाले, ज्याला ‘ अनरिस्ट्रिक्टेड वॉर’/ ‘हायब्रिड वॉर’ किंवा नियम नसलेले युद्ध असे म्हटले जाते. या युद्धामध्ये चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. याचे अनेक पैलू आहेत, आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, मानसिक युद्ध, प्रपोगंडा वॉर, ‘सायबर’ युद्ध, सोशल मीडियात घुसखोरी आणि अजून अनेक पैलू.
 
 
‘हायब्रिड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, जे पारंपरिक युद्ध, राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध, मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रिड वॉरफेअर’ मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या युद्धांत अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. सतत हे केल्याने सर्वसामान्यांचा विचार बदलू लागतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे.
 
 
आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध
 
 
चीनने भारतात केलेली आर्थिक घुसखोरी, भारताशी चाललेले आर्थिक युद्ध किंवा व्यापार युद्ध हा एक महत्त्वाचा आयाम आहे. आर्थिक युद्ध लढण्याकरिता आपण ‘आत्मनिर्भर भारत’च्या कार्यक्रमाने चीनची आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये झालेली घुसखोरी कमी करत आहोत. ‘मेक इन इंडिया’ला महत्त्व देऊन चीनमधून येणार्‍या गोष्टी भारतात बनवत आहोत, बनवणार आहोत. मात्र, ही लढाई अनेक वर्षे चालणार आहे, ज्याकरिता भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक दर्जाचे बनण्यासाठी मेहनत करावी लागेल.
 
 
मानसिक युद्ध, प्रपोगंडा वॉर
 
 
मानसिक युद्ध, प्रपोगंडा वॉर, दुष्प्रचार युद्धाकरिता चीनने भारतात अनेकांना विकत घेतले आहे. त्यांचे हस्तक भारताच्या प्रिंट, ‘इलेक्ट्रॉनिक’ आणि सोशल मीडियावर चीनच्या बाजूने प्रचार करतात. हे युद्ध सामान्य माणसाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहे. हे युद्ध कसे जिंकायचे? त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशभक्ती, देशप्रेमाची भावना जागृत व्हायला पाहिजे, त्यांनी चीनच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये.
 
 
प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाचे कान आणि डोळे बनलं पाहिजे. भारताचे शत्रू कुठलाही दुष्प्रचार करत असतील, मानसिक युद्ध करत असतील, अशांना शोधून त्यांची माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणांना दिली पाहिजे. ज्यामुळे हे युद्ध जिंकण्यात मदत मिळेल.
 
 
सायबर युद्ध
 
 
 
चीन आपल्यासोबत ‘सायबर’ युद्ध लढत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे मुंबईतील ‘इलेक्ट्रिसिटी ग्रीड’वरती झालेला हल्ला. ‘सायबर’ युद्ध जिंकण्याकरिता आपल्याला देशाची ‘सायबर’ यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल आणि हे काम सतत सुरू राहणार आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कॉप्युटरमधील ‘अ‍ॅण्टिव्हायरस’ अपडेट करत असतो, त्याचप्रमाणे ‘सायबर वॉर’पासून वाचण्याकरिता आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा यंत्रणा अपडेट करावी लागणार आहे.
 
 
सोशल मीडियात घुसखोरी
 
 
चीनने आपल्या सोशल मीडियात घुसखोरी केली आहे. पण, आपण मात्र चीनच्या सोशल मीडियात घुसखोरी करू शकत नाही. कारण, सोशल मीडियावर चिनी कंट्रोल आहे. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्या दुष्प्रचाराला कसे प्रत्युत्तर द्यायचे?
 
 
चिनी सोशल मीडियामध्ये घुसखोरी करण्याकरिता आपण भारतातील आणि तिबेटमधील तिबेटी नागरिकांचा वापर करू शकतो का? याशिवाय चीनच्या बाहेर असलेले अनिवासी चिनी नागरिक यांचा वापर आपण करू शकतो का?
 
 
‘हायब्रिड’ युद्धाला प्रत्युत्तर
 
 
स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, ‘हायब्रिड ऑपरेशन्स’ आपणसुद्धा चीन, पाकिस्तानमध्ये करू शकतो. तुम्ही आमच्या राजकीय पक्षांमध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा पाकिस्तानमध्ये असलेले राजकीय पक्ष किंवा पाकिस्तानातील, सिंध, बलुचिस्तान किंवा वजिरिस्तानमधील वेगवेगळ्या मानवाधिकार संस्थांशी मिलाप करून, त्यांना भारतामध्ये येण्याकरिता निमंत्रण देऊ शकतो. चीनच्या विरुद्ध असलेले काही प्रांत म्हणजे तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग. इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना आम्ही राजकीय मदत करू शकतो. चीनला ‘जशास तसे’ हीच भाषा कळते, म्हणून आवडत नसेल तर तुम्ही भारताच्या राजकीय जीवनामध्ये ढवळाढवळ करणे थांबवा.
 
 
पारंपरिक युद्धामध्ये भारतीय सीमांचे रक्षण करण्याकरिता भारतीय सैन्य नक्कीच सक्षम आहे. चिनी आर्थिक आणि लष्करी ताकद भारतापेक्षा जास्त असली, तरी चीन भारताशी पारंपरिक युद्ध करायला घाबरतो. मात्र, ‘हायब्रिड’ युद्धाच्या विविध प्रकारांमध्ये चीन भारताच्या पुष्कळच पुढे आहे. म्हणून ‘हायब्रिड’ युद्धाच्या प्रत्येक प्रकारच्या लढाईमध्ये प्रत्युत्तर देण्याची क्षमता, भारताला निर्माण करावी लागेल.
 
 
‘हायब्रिड’ युद्धात प्रत्येक भारतीय ‘फ्रंट लाईन’ सैनिक आहे, कारण हे युद्ध बंदुकीने नाही. आता प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, देशाला सुरक्षित करण्याकरिता मी काय करू शकतो? प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून, या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.
 
 
अजून एक युद्ध म्हणजे चिनी घातपाताचे युद्ध. लेखाच्या शब्दमर्यादेमुळे युद्धाचे इतर प्रकार दुसर्‍या भागांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू. (क्रमश:)
 
 
@@AUTHORINFO_V1@@