राणे मंत्री झाल्याने कोकणच्या विकासाला गती मिळेल : सीताराम राणे

    08-Jul-2021
Total Views |

Rane _1  H x W:



ठाणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री झाल्याने आता कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले.
 
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रीपदावर ना.राणे यांची नेमणुक केल्याने ठाण्यात सीताराम राणे यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि लाडु वाटप करून भव्य जल्लोष केला.त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीत बुधवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात कोकणचे नेते भाजप खा.नारायण राणे यांची वर्णी कॅबिनेट मंत्रीपदी लागल्याने कोकणसह मुंबईत मोठा जल्लोष करण्यात आला.
 
 
ठाण्यातही शिवाईनगर येथे भाजपचे राष्ट्रीय परिषद सदस्य सीताराम राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाके फोडुन लाडु वाटप करीत ना.राणे यांच्या नियुक्तीबद्दल दिवाळी साजरी केली.यावेळी बोलताना सीताराम राणे यांनी,मराठा आणि ओबीसी या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नारायण राणे आणि ना.कपिल पाटील यांच्या पदाचा उपयोग होणार असल्याचे सांगितले.
 
 
तसेच,मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली भागात ना.नारायण राणे यांना मानणारा वर्ग आहे.त्याचप्रमाणे आगरी,कोळी समाजदेखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या क्षेत्रातील आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये याचा लाभ भारतीय जनता पार्टीला होईल.दरम्यान,नारायण राणे संपले असे म्हणणाऱ्यांना ही जबरदस्त चपराक असून ना.राणेंच्या मंत्रीपदामुळे येत्या काळात कोकणात थांबलेली विकासाची गती पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे.असा विश्वास सीताराम राणे यांनी व्यक्त केला.