मुंबई : पुण्यात एमपीएससीचा २४ वर्षीय विद्यार्थी स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली आणि सध्या महाराष्ट्राचे यावरून चांगलेच तापले आहे. घरची परिस्थिती आणि एमपीएससीचे रखडलेले वेळापत्रक याला कांटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. विधानसभेमध्येदेखील हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून आता अभिनेते प्रवीण तरडे यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले आहेत की, "फुटपाथ कामातून पैसे खाणाऱ्या, त्यासाठी पैसे उकरणाऱ्या माणसांना आपण आयडॉल मानून बसलो आहोत, मग असेच तरुण मारणार!" असा संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता प्रवीण तरडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हंटले आहे की, " १९९७ आणि २०००च्या दरम्यान मीसुद्धा एमपीएससीची तयारी करत होतो. मात्र त्यावेळी सलग २ वर्षे पेपर फुटत होता. तसेच त्या मुलांचे कष्ट मी जवळून पाहिले आहे. ते हॉस्टेलवरच राहणे आणि कित्येकवेळा फक्त एकवेळच्या जेवणावरच दिवस काढावा लागत असे." पुढे त्यांनी म्हंटले आहे की, " परीक्षा वेळापत्रक जोपर्यंत माहिती असते तोपर्यंतचे मुलांकडे जेवायला पैसे असतात. मात्र परीक्षेचा वेळापत्रक २-३ दिवस जरी पुढ गेले तरी त्यांच्याकडे जेवायला पैसे नसतात. खूप हलाखीत त्यांना हे दिवस काढावे लागतात."
तसेच, पुढे ते म्हणाले की, "फुटपाथच्या कामातून पैसे खाणाऱ्या आणि ते खाता यावे यासाठी रस्ते उकरणाऱ्या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलो मग असेच तरुण मरत राहणार. एमपीएससी- युपीएससी करणारे मरणार, शेतकरी मरणार, कलाकार मरणार, लेखक मरणार. काही दिवसांपूर्वी एका कला दिग्दर्शकाने आत्महत्या केली. जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारण आणि त्यांच्याशी संबंधित लोक जिवंत राहणार. या देशात आणि राज्यात फक्त हेच लोक जिवंत राहणार आहेत."