नवी दिल्ली : शिखर धवनच्या भारतीय संघाने दुसरी एकदिवसीय मालिका जिंकत ३ सामन्याची एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली आहे. यामध्ये दुसऱ्या सामन्यात एकीकडे महत्त्वाचे खेळाडू तंबूत परतले असताना दीपक चाहरच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला विजय मिळाला. यावेळी आठव्या विकेटसाठी भुवनेश्वर कुमारसोबत त्याने ८४ धावांची विक्रमी भागीदारी रचली. यावेळेस चाहरने नाबाद ६९ धावा केल्या. गोलंदाजी करतानाही त्याने ५३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. विक्रमी ८४ धावांची नाबाद भागीदारी रचली.
श्रीलंकन संघाच्या डावाची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. ५० षटकांमध्ये ९ गडी गमावून श्रीलंका संघाची धावसंख्या २७५ वर पोहोचली. अविष्का फर्नांडो याने ७१ चेंडूत ५० धावा केल्या. मिनोद भानुका याने ३६, धनंजय डिसिल्वा ३२,वनायंडू हसरंगा ८, तर दसून शानाका याने १६ धावा काढल्या. चरित अस्लन्का याने ६५ धावांची दमदार खेळी केली. चमिका करुनरत्ने यानेही चिवटपणे खेळत नाबाद ४४ धावा बनवल्या. युजवेंद्र चहलने ३ गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमारनेही ३ गडी तंबूत परतवले. दीपक चहरने २ गडी बाद केले.
भारतीय संघासाठी २७६ धावांचे आव्हान सोपे वाटत असले तरी सुरवातीचे फलंदाज पृथ्वी शाह १३ धावावर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार शीखर धवनच्या खात्यावर २९ धावांवर बाद झाला. इशान किशनही झटपट १ धावावर बाद झाला. यानंतर मनीष पांडेने ३७ धावांची अमूल्य खेळी केली. तर सुर्याकुमार यादवने ५३ धावांची खेळी केली. मात्र, हार्दिक पांड्या ०वर बाद झाल्यानंतर कृणालने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर दीपक चाहरने संयमी खेळी करत भूवीच्या साथीने आठव्या विकेटसाठी ८४ धावांची नाबाद भागीदारी केली. यावेळी त्याने ८२ चेंडूंमध्ये ६९ नाबाद धावा केल्या. ही ३ सामन्याची एकदिवसीय मालिका भारताने २ - ० अशी खिशात घातली आहे.